Monday 22 August 2011

अक्षयपात्राचे प्रणेते मधुपंडित दास!

कृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहात न्हाऊन निघण्यासाठी आपण सर्वच तयार झालेले असाल. अनेकांना ओढ लागली असेल ती गोपाळकाल्याची.  दहीहंडी उत्सवाची. आपल्या छोट्याछोट्या लिलांमधून मोठे मोठे आशय सरल करून सांगत असल्यामुळेच 'कृष्णम वंदे जगदगुरू' असं आपण भक्तीभावाने म्हणतो.  भगवान श्रीकृष्णाचा संदेश जगाच्या कानाकोप-यात पसरवण्याचं काम  आज अनेक संस्था करत आहेत. मात्र यांमध्ये निःसंदेह अग्रणी म्हणुन 'ईस्कॉन'चं नाव घेता येइल. 'ईंटरनॅशनल सोसायटी फॉर क्रिष्णा क़ॉन्शसनेस' या संस्थेची स्थापना अभयचरणारविंद भक्तीवेदांतस्वामी प्रभुपाद यांनी केली. श्रीमदभगवद्गीता ईंग्रजीमध्ये लिहून जागतीक समुदायाच्या समोर आणण्याचं महान कार्य स्वामींनी केलं. आज त्यांनी लावलेल्या या ईवल्याश्या रोपाचा वेलु गगवावरी गेलेला आहे.
ईस्कॉनच्या जगभर असलेल्या शेकडो केन्द्रांच्या माध्यमातून श्रीकृष्ण सगळ्यांना कळतो आहे. यमुनेच्या वाळवंटात सर्व गोपांनी बरोबर आणलेल्या अन्नाचा एक गोपाळकाला करून सगळे भेदभाव विसरून आपल्या सर्व मित्रांना प्रेमपुर्वक भरवणार्र्या श्रीकृष्णाचं केवळ वर्णन आणि किर्तन करून ईस्कॉन थांबले नाही. कुणीही उपाशी राहू नये हा कृष्णाचा संदेश त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा वसाच जणुकाही घेतला. 'अक्षयपात्र' या अभिनव योजने अंतर्गत आज शाळेत जाणार्र्या तब्बल १३ लाख मुलांना दुपारचं जेवण पुरवलं जातंय. या योजनेचे शिल्पकार म्हणजे ईस्कॉनच्या बंगलोर केन्द्राचे अध्यक्ष मधुपंडित दास!
इस्कॉनची अक्षय पात्र योजना ही सरकारच्या मिड-डे मील योजनेपेक्षा जुनी आहे. ह्या योजनेची सुरवात २००० साली बंगलोर मधे पाच शाळांतील १५०० मुलांना जेवण पुरविण्यापासून झाली. पण २००१ साली सरकारची योजना जाहिर झाल्यावर इस्कॉनने आपली अक्षय पात्र योजना ह्या योजनेला जोडली. आज अक्षय पात्र योजने अंतर्गत ९ राज्यांतील १९हून अधिक शहरं, नगर इ. शाळांमधल्या १३ लाखहून अधिक मुलांना रोज दुपारचे अन्न पुरविले जाते. अक्षय पात्र योजना चालवणा-या सेवाभावी संस्थेचे मधुपंडित दास हे अध्यक्ष आहेत.
दास यांचं पुर्वाश्रमीचं नाव एस मधुसुदन. नागरकॉल या केरळमधील गावातील वैष्णव परिवारात १९५६ मध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची लहानपणापासूनच आवड होती. महाविद्यालयात  असतांना राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध परिक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड आय आय टी मुंबई साठी करण्यात आली. आय आय टी तुन बिटेक आणि एम टेक करत असतांनाच श्री भक्तीवेदांतस्वामींच्या साहित्याशी परिचय झाला. ईस्कॉनच्या कार्याने प्रभावीत होउन या सिव्हील ईंजिनियरने आपलं जीवन कृष्णार्पण करायचा निश्चय केला. एस मधुसुदन चा मधुपंडित दास झाला. ते वर्ष होतं १९८१.
त्रीवेन्द्रम या त्यांच्या मुळगावीच ईस्कॉनचं कार्य करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. त्रीवेंद्रमचं मंदिर हे ईस्कॉनच्या बंगलोर केंन्द्राच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येत असे. केंद्राचा कारभार मात्र भाड्याने घेतलेल्या एका छोट्याश्या फ्लॅटमधून चालायचा. बंगलोर केन्द्राची एक प्रशस्त वास्तू असावी, असा सर्वांचा प्रयत्न होता. सरकार कडे जमिनीसाठी पाठपुरावा सुरू होता. १९८३ सालापासून मधुपंडित दास यांनी बंगलोर ईस्कॉनच्या जागेसाठी वाटाघाटी सुरू केल्या. अनेक बर्ष पाठपुराव्यानंतर सरकारने गावाबाहेरची एक टेकडी संस्थेला देऊ केली. ती जंगली, नापीक आणि खडकाळ जमीन मधुपंडित दास यांनी सहर्ष स्विकारली आणि आज त्याच हरे कृष्णा टेकडीवर बंगलोर ईस्कॉनची टुमदार ईमारत डौलाने उभी आहे. या कार्यासाठी शंभरहून अधीक ईस्कॉन सदस्यांनी तीन वर्षापर्यंत अखंड श्रमदान केलं.
भरदिवसाही दुर्गम भासणा-या, विषारी काट्यांनी भरलेल्या या टेकडीवर ईस्कॉनच्या सदस्यांनी केलेल्या या भिमपराक्रमाचे श्रेय मधुपंडित दास यांच्या नेतृत्त्वालाच जातं. १९९४ मध्ये मैसुर आणि मंड्या जिल्ह्यातील शेतक-यांसाठी  त्यांनी अभिनव अशी नैसर्गिक शेतीची संकल्पना राबवली. किटकनाशक आणि रसायनांनी नासवलेली आपली शेतजमीन पुर्वीप्रमाणे कसदार झाली पाहिजे यासाठी ईस्कॉनच्या माध्यमातून त्यांनी अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासक, आणि जाणकार सोबत जोडले. ईस्कॉनच्या केन्द्राच्या आसपासची जवळपास सगळी शेती आज नैसर्गिक पद्धतीने केली जाते. अभिनव योजना राबवण्याचा आणि ती यशस्वी करून दाखवण्याचा अनुभव या दोन प्रयत्नांतून आल्यानंतर सन २००० मध्ये आपले गुरू श्री भक्तीवेदान्तस्वामी यांचं एक स्वप्न पुर्ण करायचा वसा मधुपंडित यांनी घेतला.
अन्नदानाचा संकल्प आपल्या संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ट मानला जातो. भक्तीवेदान्तस्वामी प्रभुपाद मायापूर या कलकत्त्याजवळील गावात असतांना त्यांनी एकदा भाकरीसाठी कुत्र्याबरोबर भांडणारी मुलांची टोळी पाहिली. घटना हृदयद्रावक होती. स्वामींनी मनोमन ठरवलं की निदान ईस्कॉन मंदिराच्या दहा मैलांच्या परिसरात तरी कुणीच उपाशी रहायला नको. स्वामीजींच्या प्रेरणेने अन्नदान योजनेचे बिजारोपण झाले. नाव ठेवण्यात आलं -- अक्षयपात्र योजना.
वनवासात असताना पांडवांना अन्न-धान्याची टंचाई भासू नये आणि आलेल्या ऋषी-मुनी आणि अथितींना उपाशी परत पाठवायला लागू नये, म्हणून युधिष्ठिराने सूर्यदेवाकडून अक्षय पात्र मिळवले होते. ह्या पात्राची ख्याती अशी होती की ह्यातील अन्न कधीच संपत नसे. अक्षय पात्रामुळे पांडवांनी अनेक भुकेलेल्या अथितींना जेवण वाढून तृप्त केलं होतं. आता पांडवही गेले आणि ते अक्षय पात्र सुद्धा. पण भारतातील कोट्यावधी लोकांची जठराग्नि अजूनही धगधगत आहे. ह्या जठराग्निला शमविण्याकरिता अनेक लहान मुलांना आपल्या आयुष्यातील कोवळी वर्षं शाळेत न जाता मजूरी मधे घालवावी लागतात.
ईस्कॉनचं 'अक्षयपात्र' मात्र आता मुलांना सकस आहाराबरोबरच शिक्षणाची संधीही देते आहे. अक्षयपात्र योजने अंतर्गत अन्न शिजवणारी ईमारत हा देखील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या तीन मजली ईमारतीमध्ये गुरुत्त्वाकर्षणाच्या सिद्दांताचा वापर करून अन्न शिजवले जाते, ते अग्नी नव्हे, तर वाफेच्या भरवश्यावर. दिवसभरात एक लाख डबे तयार करण्याची क्षमता एका युनिटची असते. विस मिनिटात ११० किलो तांदळाचा भात तर दोन तासात १२०० लिटर सांबर तयार होतं. दिवसभरात एक युनिट तब्बल सहा हजार किलो तांदळाचा भात बनवतं. शिवाय हजारो लिटर सांबर, आणि तब्बल दोन लाख चपात्या. आणि हे सगळंकाही अत्याधुनिक मशिन्सच्या मदतीने. मानवी स्पर्षही या अन्नाला होत नाही. त्यामुळे ते अत्यंत शुद्ध आणि सकस असतं. २०२० सालापर्यंत ५०लाख मुलांना ह्या योजनेचा लाभ व्हावा हे मधुपंडित दास आणि इस्कॉनचं ध्येय आहे.
अक्षयपात्राचं हे सगळं साम्राज्य लोकांनी दिलेल्या दानावर अवलंबलेलं आहे. सरकारच्या माध्यान्नभोजन योजनेमुळे हल्ली सरकारी मदतही मिळत आहे. त्यामुळे अनेक नवे युनिटस उभारले जात आहेत. मात्र योजनेची व्याप्ती बघता ती चालण्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचं आहे. त्यामुळे सामान्य जनतेकडून देणग्या स्विकारण्याचं काम अक्षयपात्र फाउंडेशन करते. केवळ ६७५ रूपये दान करून आपण एका मुलाच्या वर्षभराच्या जेवणाचा खर्च करू शकतो. आपण दान केलेल्या पैशां मधून मुलांना वर्षभरासाठी जेवायला पौष्टिक अन्न मिळत आहे, आणि त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती सुद्धा होत आहे, हे पहाण्यात किती तरी समाधान आहे. त्यामुळेच मधुपंडित दास यांचा आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि करोडो रूपये फाउंडेशनजवळ जमा झाले. पैसा आला की बदनामी ही बरोबर येतेच.
दान म्हणुन प्राप्त झालेल्या या पैशाचा दास यांनी भ्रष्टाचार करून तो स्थावर मालमत्ता घेण्याच्या कामात गुंतवला असल्याचा आरोप आश्रमातीलच काही असंतुष्टांनी त्यांच्यावर केला आहे. अनेकांनी तर ईस्कॉनचे बंगलोर केंन्द्राच्या अस्तीत्त्वावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. अनेकांनी मधुपंडित दास आणि बंगलोर ईस्कॉन या संस्थेला न्यायालयात आवाहन दिले आहे. बरेच खटले सध्या न्यायालयात सुरू आहेत. खरंखोटं काय ते न्यायदेवता स्पष्ट करेलच, मात्र, कुणीतरी वावड्या उठवल्या म्हणुन बारा लाख मुलांच्या तोंडी सकस अन्नाचा घास भरवणारं मधुपंडित दास यांचं कार्य लहान होत नाही.

Wednesday 17 August 2011

चाचा चौधरींचे "प्राण"

ज्यांचा १५ ऑगस्ट या दिवशी वाढदिवस येतो , त्यांच्यासाठी तर या दिवसाचं महत्त्व अधीकच! प्राणकुमार शर्माचा वाढदिवसही स्वातंत्र्यदिनीच येतो. त्यांनी आपल्या नवव्या वाढदिवसापासुन पुढचे सगळे वाढदिवस देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणुनच साजरे केले आहेत. उद्या त्यांचा ७३ वा वाढदिवस आहे. केवळ नावावरून प्राणकुमार शर्मा कोण हे अनेकांना लक्षात येणार नाही. असो.
लहानपणी एखाद्या कॉमिक्सच्या शेवटी 'चित्रकथा: प्राण' असं वाचल्याचं आपल्याला आठवत असेल. 'प्रा' या अक्षरापुढे शुन्य आणि उद्गारवाचक चिन्ह या स्वरूपात '' हे  अक्षर काढण्याची त्यांची लकब अनेकांच्या लक्षात राहून गेलेली असेल. आता थोडंफार आठवू लागलं असेल, मात्र अजुनही नक्की प्राणकुमार शर्मा कोण हे काहिंच्याच लक्षात येइल. असो.
चाचा चौधरी! -- बस! या दोन शब्दानंतर आता काही सांगायची गरजच उरलेली नाही! गेल्या साडेचार दशकांपासुन भारतातील बालविश्वाला समृद्ध करणार्र्या 'कंप्युटर से भी तेज चलनेवाला दिमाग' लाभलेल्या चाचा चौधरींचे रचनाकार  'कार्टुनिस्ट प्राण' म्हणजेच प्राणकुमार शर्मा! चाचा चौधरीच काय, पण कॉमिक्सच्या वाचकवर्गाच्या गळ्यातले ताईत असलेल्या पिंकी, बिल्लू, श्रीमतीजी, रमन, साबु, राका, चिन्नी चाची आणि ईतर अनेक पात्रांमध्ये 'प्राण' ने प्राण फुंकले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या-माझ्या भावविश्वातही !!
भारतीय कॉमिक्सचे जनक मानल्या गेलेल्या प्राण यांनी सामान्य लोकांपुढे त्यांच्यासारखीच सामान्य पात्रे सुपर हिरो म्हणुन ठेवण्याचा आगळा-वेगळा विचार केला, तेव्हा कॉमिक्स जगतावरती फॅण्टम आणि सुपरमॅनसारख्या तगड्या आणि आकर्षक हिरोंचं राज्य होतं. मात्र धोपटमार्गाने जायचे नाही हे जणु काही त्यांनी लहानपणापासुनच ठरवून ठेवलं होते. म्हणुनच पंजाबमधील कसुर (आता पाकिस्तान) या छोट्याश्या गावातुन दिल्लीला येऊन त्यांनी राज्यशास्त्रात एम ए केलं. वडिल शास्त्री-पंडित असल्यामुळे घरी धार्मिक आणि शैक्षणिक वातावरण होतं. कलेची कदर होती. म्हणुन मग राज्यशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच चित्रकलेचाही छंद जोपासला. या छंदानेच अनेकदा पोटापाण्याची सोयही केली.
 'मिलाप' नावाच्या छोट्याश्या हिंदी दैनिकासाठी 'डब्बु' नावाचं एक पात्र बनवून दररोज एक व्यंगचित्र देणं सुरू केलं. हे पात्रं बरंच लोकप्रियही होतं. मात्र अजुनही हात हवा तसा शिताफिने फिरत नव्हता. त्यासाठी औपचारिक प्रशिक्षणाची गरज होती. मग 'एम ए राज्यशास्त्र' असलेल्या शर्माजींनी थेट मुंबई गाठली, आणि सर जे जे स्कुल ऑफ फाईन आर्टसला प्रवेश घेतला. पुढची चार वर्षे ही लाखमोलाची ठरली. बरंच शिकायला मिळालं. आयुष्यभरासाठीची शिदोरीच जणु! पण हाताला काम नव्हतं. साल होतं १९६६!
दिल्ली-मुंबई वार्र्या सुरु झाल्या. व्यंगचित्रकार, रेखाचित्रकार, ईल्युस्ट्रेटर म्हणुन काम शोधणं सुरू झालं. तो काळ आर के लक्ष्मण, क़ृपाशंकर भारद्वाज, ईत्यादिंचा होता. एका वर्तमानपत्रात केवळ एक व्यंगचित्र दररोज प्रकाशित होत असे. त्यामुळे या क्षेत्रात हवी तशी संधी नव्हती. दरम्यान दादा माखन लाल चतुर्वेदी या हिंदी साहित्यातील जुन्याजाणत्या कवीच्या काही कवीतांवर रेखाचित्रे काढण्याचं काम मिळालं.
'एक भारतीय आत्मा' या नावाने चतुर्वेदीजी कवीता लिहत. दिल्लीपासुन दूर खंडवा येथे त्यांचं वास्तव्य होतं. तीशीच्या आसपास असलेल्या प्राणकुमारला त्यांचा सहवास लाभला. "मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर तुम देना फेंक| मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ जाएँ वीर अनेक||" असे प्रेरक बोल लिहणारे चतुर्वेदी हिंदी साहित्य आणि पत्रकारितेतील भिष्म पितामहच!. त्यांच्याबरोबरच्या छोट्याश्या वास्तव्यातच साहित्याची, संगीताची गोडी प्राणला लागली. वाचनात लक्षणिय वाढ झाली. चतुर्वेदींच्या व्यक्तीमत्त्वातुनच 'चाचा चौधरी' हे पात्र त्यांच्या डोक्यात आले असावे.
या दरम्यान जागतीक पटलावर व्यंगचित्र किंवा कॉमिक्स क्षेत्रात काय सुरू आहे याचा अभ्यासही प्राणने केला. फ्रान्समध्ये निर्माण झालेली 'ऍस्ट्रेरिक्स आणि ऑबेलिक्स' कॉमिक सिरिज त्या काळात खुप लोकप्रिय होती. यातील ऍस्ट्रेरिक्स हा शिडशिडित बांध्याचा पण हुशार माणुस ऑबेलिक्स या आपल्या ताकदवान मित्राच्या मदतीने रोमन आर्मीचा मुकाबला करतांना दाखवला आहे. चाचा चौधरींची एक झलक प्राणला या पात्रांतुन मिळाली असं मानतात. मात्र प्राणने स्वतः कधी याची पुष्टी केली नाही.
१९६९ मध्ये मायापुरी गृप एका हास्य-व्यंग नियतकालीकाची योजना बनवत होते - 'लोटपोट' त्याचं नाव. या नियतकालिकासाठी एक व्यंगचित्राची स्ट्रीप काढण्याचं काम प्राणला मिळालं. लाल पगडी घातलेले चाचा चौधरीं कागदावर उतरले ते याच वर्षी. मात्र लोटपोट मध्ये तेव्हा कृपाशंकर भारद्वाज यांच्या 'मोटू-पतलू' मालिकेचा माहोल होता, त्यामुळे चाचा चौधरींना प्रकाशित होण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पहावी लागली. सन १९७१ साली पहिल्यांदा चाचा चौधरी 'लोटपोट' च्या पानांमधून जनतेपुढे आले.
चाचा चौधरी एक सामान्य, म्हातारा, शिडशिडित बांध्याचा माणुस! मात्र प्राणने त्यात असे काही रंग भरले, की भारताचं सगळ्यात आवडतं कार्टुन कॅरॅक्टर म्हणुन चाचा नावारूपाला आले. साबुच्या रूपाने त्यांनी जादूई शक्तीही त्यात आणली. 'चाचा चौधरी का दिमाग कंप्युटर से भी तेज चलता है', किंवा 'साबु को गुस्सा आता है, तब ज्वालामुखी फटता है' सारखी वाक्यं परवलीची झाली. सामान्य जनतेशी सहज एकरूप होणारे पात्रं असल्यामुळे लोकांनी चाचा चौधरींना डोक्यावर घेतलं. पुढे डायमंड कॉमिक्सने चाचा चौधरींचे वेगळे कॉमिक्सच काढायचे हक्क विकत घेतले, आणि मग  ईतीहास बनला!
डायमंडबरोबरचा हा करार आजही सुरू आहे. हजारो, अगदी हजारोंच्या संख्येने कॉमिक्स आजवर आले आहेत. पुढे पिंकी, बिल्लू, श्रीमतीजी, रमन ही पात्रं आली. या सगळ्या सकारात्मक पात्रांबरोबरच राका, गोबरसिंग, धमाकासिंग, चक्रम आचार्य ही सगळी पात्रंही लोकप्रिय झाली. ईतकंच काय, तर चाचा चौधरींचा कुत्रा 'राकेट'देखील! सहारा टिव्हीने चाचा चौधरींवर मालिका काढली. त्यात रघुविर यादवने चाचा चौधरींची भुमिका केली होती. मालिकेनेही तब्बल ६०० भाग पुर्ण केले. लवकरच चाचा चौधरींची थ्री-डी ऍनिमेशन फिल्मही येते आहे.
केवळ ठरल्या मार्गाने नं जाता वेगळ्या वाटा शोधायच्या आणि नवं काहितरी करायचं या एका जिद्दीच्या भरवश्यावर भारतामध्ये अस्सल भारतीय कॉमिक्सचं साम्राज्य प्राणने उभं केलं. यासाठी त्यांचं नाव लिम्का बुकमध्येही नोंदवल्या गेलेलं आहे. या साम्राज्याच्याच प्रेरणेने मग 'राज कॉमिक्स' सारखी प्रकाशनसंस्था सुरू झाली आणि १९८३ मध्ये 'नागराज' बरोबर अस्सल भारतीय 'ऍक्शन सुपरहिरो' चा जन्म झाला. मात्र त्याला उत्तर म्हणुन ऍक्शन हिरोच देइल तर तो 'प्राण' चा विचार कसला? त्याने 'रमन' चं 'हम एक है' नावाचं राष्ट्रीय एकात्मतेवरील कॉमिक्स आणलं. पंतप्रधान ईंदिरा गांधींच्या हस्ते या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. कार्टुनकलेला भारत देशात जनमान्यतेबरोबरच राजमान्यता मिळवून देण्यात प्राण चा सिंहाचा वाटा आहे.
सध्या वयाच्या ७३ व्या वर्षीही प्राण पुर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाने -- निखिलने -- त्यांच्याच नावाने दिल्लीला 'प्राण्स मिडिया ईन्स्टीट्युट' या जनसंवाद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. वृत्तपत्रकारीतेपासुन ते ऍनिमेशन- वेबमिडियापर्यंत सर्व आधुनिक अभ्यासक्रम या विद्यालयामध्ये शिकवले जातात. विद्यालयाचे संचालक असलेले प्राण स्वतः विद्यार्थ्यांना व्यंगचित्रकलेचे धडेही देतात. ईंडियन ईन्स्टीट्युट ऑफ कार्टुनिस्ट या संस्थेमध्येही त्यांना पितामहाचं स्थान आहे. जगभरातल्या कार्टुन संग्रहालयात आज चाचा चौधरीच्या स्ट्रीप्स लागलेल्या आहेत.  असं एखादं कार्टुन संग्रहालय भारतातही असावं, असं त्यांना मनापासुन वाटतं.
उद्याच्या त्यांच्या वाढदिवशी त्यांची ही ईच्छा पुर्ण व्हावी, आणि अजुनही बरीच वर्षे त्यांनी आपल्याला हा वाचनानंद देत रहावे, याच शुभेच्छा या भारताच्या वॉल्ट डिस्नी ला देऊ या!

Tuesday 9 August 2011

अजय अतुल

'अजय अतुल' ही संगितकारजोडी आज मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत झालेली आहे. 'जोगवा' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यांच्यामधील संगीतकाराच्या श्रेष्टत्त्वावर शिक्कामोर्तब झालं. १९९३ साली तामीळनाडू मध्ये ऍड फिल्म्सची जिंगल्स बवनवणार्र्या एका संगीतकाराने केलेल्या पहिल्याच चित्रपटाला असाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आज त्या संगीतकाराला आपण 'ए आर रहमान' नावाने ओळखतो आणि 'रोजा' ची गाणी वारंवार ऐकतो. रहमान आणि अजय अतुल यांच्यातील हे साम्य लक्षात घेता येत्या दहा वर्षात त्यांना ऑस्कर मिळाल्यास आश्चर्य नाही!
मात्र रहमान आणि अजय अतुल मध्ये केवळ हेच एक साम्य नाही. दर्जेदार, प्रयोगशील आणि तितक्याच यशस्वीपणे गाणी संगीतबद्ध करण्यातील त्यांचा हातखंडा, संगीत देण्याकरता त्यांनी घातलेला अनेक पठडीबाहेरील वाद्यांचा मेळ, गाण्यांमध्ये लय-ताल-सुरांचे जादूई मिश्रण,लोकांना वेगळं, पण चांगलं काय देता येईल याची उत्कृष्ट जाण, याबरोबरच संगीत ही दैवी देणगी आहे असा विश्वास आणि ईश्वरावर असलेली अतुट श्रद्धा हे सगळे गुण अजय अतुल यांना संगीत क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करवून देतात.
पुण्याजवळ शिरूरला रेव्हेन्यू विभागात कामाला असलेल्या अशोक गोगावले यांची ही दोन मुलं - अतुल मोठा तर अजय त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. घरी थोडीफार शेती होती, आणि वारकरी परंपरा होती. एक भजनी ठेका आणि लोकसंगीताचा वसा सोडला तर घरी संगीत म्हणुन नावालाही काहीच नव्हतं. मात्र या दोन भावंडांनी लहानपणीच ठरवलं, की आपण संगीतकारच व्हायचं. शाळेत असल्यापासून संगीत हेच त्यांचं विश्व बनलं. वडिलांचं म्हणणं होतं की “'जे काही कराल ते मनापासून करा. पैसा कमावण्यासाठी करू नका. नाहीच जमलं तर दोन सुखाचे घास खाण्याइतकी आपली परिस्थिती नक्कीच आहे.आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचं वेड जोर धरू लागलं.
पण संगीतकार व्हायचं, म्हणजे नेमकं काय करायचं हे ठाऊक नव्हतं. अतुल लहानपणी पोवाडे म्हणायचा. अजय पाठीमागे झील धरायचा. शिरुर, जुन्नर, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांच्या ठिकाणी रहावं लागलं. त्यामुळे ग्रामीण भाषेचा ढंग, ग्रामीण संस्कृती तेव्हापासून पहायला मिळाली. पहाटेची काकड आरती, त्यात वाजणारा पखवाज, लग्नात घातलेला गोंधळ-जागरण यातुनच संगीताचे धडे मिळत गेले. शाळेत असताना सांस्कृतीक कार्यक्रमात भाग घेणे, मुलांची गाणी, नृत्य बसवणे, एनसीसीच्या बॅन्ड पथकात भाग घेणे यातून संगीतकार घडत गेले. अजय अतुल यांनी शास्त्र-शुद्ध पणे संगीताचे शिक्षण कधीच घेतले नाही पण त्यांनी आजुबाजुच्या वातावरणातूनच संगीत आत्मसात केलं
वडिलांची सतत बदली होत असल्याने त्यांना फार मित्र जोडता आले नाहीत. त्यामुळे दोघेच एकमेकांचे मित्र, साथीदार बनले. तासनतास संगीतावरच बोलत राहणे हा त्यांचा आवडता छंद कदाचित त्यामुळेच त्यांच्यात जे टय़ुनिंगजमले, ते आज त्यांना 'अजय-अतुल' बनवण्यात कामी आले.
शाळा-कॉलेज संपल्यावर इतर लोकांसारखं नोकरी शोधा, कंप्युटर शिका असे उद्योग करत करत पुण्याच्या काही लोकल ग्रूप्ससोबत गाण्याच्या व लोककलेच्या कार्यक्रमांत वादक, गायक, नर्तक म्हणून भाग घेणे सुरू झाले. त्या वेळी गोगावले रहायचे त्या नारायण पेठेत अनेक बॅन्ड पथकांची दुकाने होती. तासन्तास अतुल आणि अजय या दुकानापाशी चकचकीत वाद्ये निरखत घुटमळायचे. बॅन्ड पथकांच्या सतत पाठीमागे लागायचे. कधी तरी त्यांना दया यायची आणि मग एखाद्या वेळला की-बोर्ड, ट्रम्पेट हाताळायला मिळायचे. मैत्रीदेखील त्यांनी ज्याच्यापाशी वाद्ये आहेत अशाच विद्यार्थ्यांशी केली. नवनवीन वाद्ये हाताळायची आणि स्वतः वाजवून बघत शिकायची -- अनुभव हाच त्यांचा गुरू बनला. कुठेही तालीम घेतली नसतानाही हात हार्मोनियमवर चांगलाच फिरू लागला.
"डॉक्टर-इंजिनीअरिंगला पाठवले असते तर किमान पाच लाख रुपयांचा खर्च आलाच असता. मग आमच्यावर एकदाच फक्त एक लाख रुपये खर्च करा आणि आम्हाला की-बोर्ड आणून द्या," असा तगादा वडिलांकडे सतत लावला. अखेर वडिलांनी मागणी मान्य केली. मग कुठला की-बोर्ड घ्यायचा या वर चर्चा सुरू झाली. वस्तू घ्यायची तर तर भारीचीच असे ठरवून त्यांनी दिड लाख रूपयाचा कि-बोर्ड घरात आणला. अगदी सुरूवातीपासूनच 'खाईन तर तुपाशी' हा 'ऍटिट्युड' या दोघांनीही जपला आहे. त्यांच्या पहिल्या पहिल्या लाईव्ह ईन कॉन्सर्टच्या वेळला ही १०८ वाद्यवृंद, ५० गायक, शंभरेक परफॉर्मर्स ईत्यादी लवाजम्यासह त्यांनी कार्यक्रम दिला. मराठी संगीतकारांसाठी ही गोष्ट नवीन होती, आणि आजही आहे.
आजही अजय अतुल त्याच की-बोर्डवर काम करतात. की-बोर्ड हातात आल्यानंतर त्यांनी सुरवात केली ती छोटी छोटी जिंगल्स बनवून. संगीत नसानसात होतंच. पुण्यात काही छोटेमोठे कार्यक्रम, जाहिरातींची जिंगल्स, मग धार्मिक अल्बम्स असं करत करत कामाला सुरुवात झाली.  हळूहळू यश मिळत गेलं. मोठं काहीतरी मात्र मिळत नव्हतं.
प्रत्येक मराठी माणसांप्रमाणे गणपती हे त्यांचं आराध्य दैवत आहे. संगीतक्षेत्रातही गणपतीबाप्पाच त्यांच्या मदतीला धावून आले. गणेशोत्सवानिमित्त स्त्रोत्र आणि भजनांच्या सिडिज दरवर्षी शेकडो येतात. टाईम्स म्युझिक च्या अश्याच एका सिडिचं काम त्यांना मिळालं. 'विश्वविनायक' या अल्बमची निर्मिती सुरू झाली. या अल्बमची संकल्पनाही अजय आणि अतुल यांचीच. पठडीतली फिल्मी गाण्यांच्या चालीवरची गाणी बसवण्याचं त्यांनी टाळलं. जवळ जवळ दोन वर्षे गणपतीच्या पुराणकथा, स्तोत्रं, आरत्या यांचा त्यांनी अभ्यास केला, संस्कृत स्त्रोत्रांना संगितबद्ध केलं, आणि मग 'विश्वविनायक'ची निर्मिती झाली. या अल्बमवर संगीतकार म्हणुन नाव लिहतांना अतुल-अजयहे वयानुरूप येणारं नाव ऱ्हिदमिक वाटत नसल्याने 'अजय-अतुल' हे नाव त्यांनी निवडलं.
मात्र विश्वविनायक लगेच हिट झाला नाही. अल्बम रिलीज झाला तो अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जन झाले, सहा महिने-वर्ष लोटलं, तरी काही नाही. स्ट्रगल चालूच होतं. अनेकदा तर काही कामदेखील नसायचं. पण बाप्पाचा आशीर्वाद होता. दोन वर्षांत विश्वविनायक ची माउथ-टू-माउथ पब्लिसिटी झाली. कुणी गणपतीत १०० सीडीज वाटल्या, कुणी कुणाला गिफ्ट दिल्या, एकाला आवडलं दुसर्‍याला सांगितलं. आणि यश कणाकणानं, दबक्या पावलांनी आलं. 'विश्वविनायक'ने अजय अतुल ची ओळख निर्माण केली.
आज मराठी माणसाला अजय-अतुलची ओळख करून देण्याची खरं गरजच नाही. गेल्या काही वर्षांत या जोडीने संगीतक्षेत्रात जणू काही क्रांतीच घडवून आणली आहे. मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात. मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली. अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं. मराठीत 'अगं बाई अरेच्या' 'जत्रा,' पासून ते 'नटरंग' 'जोगवा' पर्यंत आणि हिंदीत 'गायब' पासून ते 'सिंगम' आणि आता येऊ घातलेला 'अग्नीपथ' पर्यंत त्यांच्या यशस्वी चित्रपटांची, गाण्यांची यादी थोडक्यात न संपणारी आहे.
मराठी बरोबरच हिंदी चित्रपट, मालिका, नाटक, लाईव्ह कॉन्सर्टस, जिंगल्स ईत्यादीमध्ये अजय अतुल आज व्यस्त आहेत. गणपतीबाप्पांवरची श्रद्धा कायम आहे. "त्याच्या'कडे आमच्यासाठी प्लॅन आहे. गॉड हॅज अ प्लॅन फॉर अस ! वी आर जस्ट फॉलॉइंग दॅट प्लॅन." ईतक्या समर्पण भावनेनं हे दोघं भाऊ काम करत आहेत. रहमान प्रमाणे अजय अतुल संगीतातच देवाला पाहतात. हा देवच त्यांच्या माध्यमातून भारताला परत ऑस्कर मिळवून देइल ही सदिच्छा!
दि. ७ ऑगस्ट २०११ रोजी तरूण भारत च्या आसमंत पुरवणीत प्रकाशीत झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण

Tuesday 2 August 2011

प्रकाश राज

मराठी कलाकारांची आणि तंत्रज्ञांची फौज, मराठी संगितकारांसह, एकंदर मराठमोळ्या वातारवरणात बनलेला 'सिंघम' चित्रपट सध्या चर्चेचा विषय  आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही हा सिनेमा पहाण्याचा मोह आवरला नाही. सिंघम साठी अजय देवगणने खास कमावलेली तब्येत, आणि त्याने बोललेले मराठी संवाद हे चित्रपटाचे आकर्षण असले तरीदेखील प्रकाश राजने रंगवलेला खलनायक जयकांत शिकरेही प्रचंड भाव खाऊन जातो, याबद्दल वादच नाही. दुष्ट, निर्दयी, कपटी, शिवाय मुर्ख, घाबरट, आणि कधीकधी बावळट असा खलनायक प्रकाश राजने मोठ्या खुबीने उभा केला आहे.
खरं म्हणजे प्रकाश राज सारख्या अष्टपैलु कलावंतासाठी ही भुमिका करणं फार सहज गोष्ट होती. कारण आपल्या दोन दशकांच्या अभिनय कारकिर्दीत प्रकाश राजने एकापेक्षा एक सरस अश्या शेकडो भुमिका केल्या आहेत. दक्षीण भारतीय चित्रपटसृष्टीतील तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांमधून काम करणार्या अत्यंत मोजक्या कलावंतांपैकी प्रकाश राज अग्रणी आहे. याशिवाय हिंदी आणि मराठी भाषाही त्याला अवगत आहेत. मणीरत्नम, प्रियदर्शन यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणार्र्या निर्माता-दिग्दर्शकांबरोबरच रंजनप्रधान चित्रपटांच्या निर्मात्यांचाही तो आवडता कलाकार आहे. त्यामुळेच वर्षभर प्रदर्शित होणार्र्या अनेक दक्षीण भारतीय चित्रपटांमध्ये प्रकाश राज हे नाव चमकत असतं. म्हणुनच पाच फिल्मफेअर आणि चार राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच अनेक विषेश पुरस्कारही त्याच्या नावे आहेत.
दक्षीण कर्नाटकातील पुत्तूर या गावात जन्माला आलेला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील 'तुळु' भाषा बोलत मोठा झालेला एक मुलगा -- प्रकाश राय ('राय' हे त्याचं मुळ आडणाव आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर जेष्ट दिग्दर्शक के बालचंदर यांनी त्याला प्रकाश राज असं नाव दिलं.) -- कन्नडच नव्हे, तर दक्षिण भारतातल्या चारही भाषांतील चित्रपटसृष्टी गाजवतो, शिवाय हिंदी चित्रपटांमध्येही  आपलं मानाचं स्थान निर्माण करतो, ही सगळी वाटचाल स्वप्नवत वाटत असली, तरी यामागे प्रकाश राज या व्यक्तीची आयुष्यभराची तपश्चर्या आहे, हे विसरणे शक्य नाही.
अभिनय किंवा चित्रपटसृष्टी ही प्रकाश राज ला वारसा हक्काने मिळाली नाही. मात्र कर्नाटकातील त्याच्या 'बंत' समाजामधील लोकांना या क्षेत्राबद्दल कायमच आकर्षण राहिलेले आहे. ऐश्वर्या राय, सुनिल शेट्टी, शिल्पा शेट्टी किंवा 'सिंघम' चा दिग्दर्शक रोहीत शेट्टी ही नावं वानगीदाखल पुरेसी होतील! त्यामुळे उपजतच असलेली अभिनयाची आवड १९७० च्या दशकात त्याला पुत्तूरहून थेट बंगलोरला घेऊन गेली. सेन्ट जोसेफ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत पदवीचा अभ्यास करतांनाच महाविद्यालयिन नाटकांमधून त्यानं अनेक भुमिका केल्या. रंगभुमीवरचं प्रेम वाढत गेलं आणि एका वेगळ्या प्रकाश राय चा जन्म झाला.
बंगलोरला रविन्द्र कलाक्षेत्र नावाचे कलादालन आहे. महाविद्यालयातून बाहेर पडताच प्रकाश ने नोकरीच्या मागे न लागता या कलादालनाचा पर्याय निवडला. नाटकांमध्ये छोटीमोठी कामं मिळत गेली. एकाच दिवशी वेगवेगळ्या नाटकांचे, एका मागोमाग एक असे चार प्रयोग अनेकदा केले. दिवसभर नाटकाचे प्रयोग आणि रात्री बॅकस्टेजला झोपणे असा दिनक्रम असायचा, आणि महिन्याकाठी मिळायचे ३०० रूपये. असे एक दोन नव्हे, तर २००० नाटकाचे प्रयोग केले. प्रकाश राज मधला अष्टपैलू कलाकार या दरम्यान घडला. अनेक भाषांमधील त्याचे प्रभुत्व, वैषिष्ट्यपुर्ण संवादफेक, डोळ्यांच्या हालचालीवर असलेले अविश्वसनिय नियंत्रण, आणि अभिनयकौशल्य हे सगळे गुण याच दरम्यान आत्मसात झाले. १९९० च्या दरम्यान त्याने आपलं कार्यक्षेत्रं वाढवायचं ठरवलं, आणि टेलिव्हीजनकडे मोर्चा वळवला.
कन्नड दुरदर्शनवरील एक दोन मालिकांमध्ये त्याला काम मिळालं. काही चित्रपटांमध्ये छोट्या भुमिकाही मिळाल्या. मात्र त्याने समाधान होत नव्हतं. पोटापाण्यासाठी संकलन आणि सहदिग्दर्शन या क्षेत्रात हात आजमावून पाहिला. मात्र त्यातही अपयश आलं. शेवटी हे क्षेत्र सोडायचं असा निर्णय झाला. मात्र याच दरम्यान 'देव परिक्षा पाहत असतो' असं म्हणतात तसंच काहीसं झालं.
'हरकेय कुरी' या चित्रपटात प्रकाश राय छोटीशी भुमिका करत होते. के एस एल स्वामी यांच्या या चित्रपटात त्या काळातील दक्षीणेतील चित्रपटसृष्टीची 'राणी' असलेली अभिनेत्री गीता ही मुख्य भुमिका करत होती. प्रकाश मधली अभिनयाची चुणुक तीने हेरली आणि तामिळ दिग्दर्शक के बालचंदर यांच्याकडे त्याच्यासाठी शब्द टाकला. भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराचे मानकरी के बालचंदर म्हणजे तामिळ चित्रसृष्टीचे भिष्म पितामहच! १९९३ साली ते 'ड्युएट' नावाचा एक कमी बजेटचा चित्रपट बनवत होते. त्यातील मुख्य भुमिका प्रकाश राय ला मिळाली, आणि बरोबरच मिळालं 'प्रकाश राज' हे नवीन नाव! हा चित्रपट लोकांना क्लीक झाला आणि तामिळनाडूमध्ये प्रकाश राज चे फॅन्स तयार होउ लागले. मग मागे वळून पहावंच लागलं नाही.
रंगभुमीवरील कष्टाने जमलेला अनुभवाचा खजीना आता कामी येऊ लागला. नागमंडल या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीतही पदार्पण झालं. १९९७ मध्ये मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्यावहिल्या नाटकात -- नेतृ ईंदू नालाई -- मध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली, आणि याच दरम्यान तामिळ चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन 'ईरूवर' चित्रपटाची बैठक तयार होउ लागली. एम जी रामचंद्रन आणि एम करूणानिधी या द्राविढ राजकारणातील धुरंधर नेतृत्त्वांच्या परस्परसंबंधावर आधारीत हा चित्रपट तामिळनाडूमधील प्रत्येक दर्शकाच्या मनावर छाप पाडणारा ठरला. यातील तामिळसेल्वन (करूणानिधी) या भुमिकेसाठी प्रकाश राज ला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विषेश म्हणजे या चित्रपटाद्वारेच ऐश्वर्य़ा राय हिचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला!
१९९९ साली अंतपुरम या तेलगु चित्रपटासाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार तर २००३ मध्ये तामिळ चित्रपट दया आणि त्याचाच तेलगु रूपांतर 'खडगम' यातील भुमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. नुकताच प्रियदर्शनबरोबर केलेल्या कांचिवरम या तामिळ चित्रपटासाठी  सर्वोत्तम अभिनेत्याचा मानही प्रकाश राज यांना प्राप्त झाला. आजवर २५० हून अधीक तामीळ चित्रपटांबरोबरच त्यांचे तेलगु, कन्नड, मल्याळम किंवा हिंदी रिमेक या सगळ्यांना हिशोबात धरल्यास प्रकाश राजची 'फिल्मोग्राफी' हजारच्या वर जाते. बाकी सगळी स्टारकास्ट रिमेक मध्ये बदलेल्, मात्र प्रकाश राज बदलत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे 'सिंघम'. २०१० साली प्रदर्शित झालेल्या 'सिंगम' या तामिळ चित्रपटाचाच हिंदी 'सिंघम' हा रिमेक आहे. आणि तामिळ चित्रपटातही खलनायकाची भुमिका प्रकाश राज नेच केलेली होती.
व्यावसायिक चित्रपटात खलनायकाच्या भुमिका करून अमाप लोकप्रियता आणि पैसा मिळवतांनाचा आपल्यातील अभिजात अभिनेत्याची कुंचबणा होणार नाही याची काळजी प्रकाश राज ने घेतली आहे. कांजीवरम हा चित्रपट त्याचं उदारहरण आहे. विशेष म्हणजे तो सणसणीत राजकीय भाष्य करणारा सिनेमा आहे.
अभिनयाबरोबरच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आता प्रकाश राजने पाऊल टाकले आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाउसचे नाव त्याने 'ड्युएट मुव्हीज' असे ठेवले आहे. आपल्या पहिल्यावहिल्या मोठ्या तामिळ चित्रपटाची आठवण म्हणुन! तामिळ मध्ये काही पारिवारीक मनोरंजक चित्रपटांची निर्मीती केल्यानंतर त्याने दिग्दर्शनासाठी आपली मातृभाषा कन्नडची निवड केली. मागच्याच वर्षी 'नानु नन्ना कन्नासु' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यशस्वीदेखील झाला. आता या चित्रपटाची तामिळ आवृत्ती दिग्दर्शित करण्यात प्रकाश राज मग्न आहे. नुकताच त्याने पोनी शर्मा या पंजाबी कोरिओग्राफर मुलीबरोबर दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे चार दाक्षिणात्य भाषा, आणि हिंदी नंतर प्रकाश राज 'पंजाबी' चित्रपटातूनही आपल्यासमोर आल्यास आश्चर्य वाटून घ्यायला नको!
दिनांक ३१ जुलै २०११ रोजी च्या 'आसमंत पुरवणी' मध्ये प्रकाशित झालेले प्रस्तूत लेखाचे हे कात्रण