Thursday 29 September 2011

मॉन्टेकसिंह अहलुवालिया

आधीच तब्बल तीन रुपयांच्या पेट्रोल भाववाढीमुळे कापला जाणारा खिसा पाहून हबकलेल्या मध्यमवर्गाला दुसऱ्याच दिवशी, रिझर्व्ह बँकेने गृह आणि वाहनांसह अन्य कर्जे महाग करून बेजार केले. महागाईने ' आम आदमी ' त्रस्त झालेला असताना 'पेट्रोल दरवाढ ही गूड न्यूज असून त्यामुळे देशाच्या आर्थिक सुधारणांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता प्राप्त होईल,' असे मत व्यक्त करत केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी स्वतःवर सामान्यांचा रोष ओढवून घेतला. अहलुवालिया यांचं हे वक्तव्य एका जागतीक अर्थकारण गुरूच्या दृष्टीने जरी बरोबर असलं तरीही 'जनकल्याणकारी राज्य' असलेल्या भारतातील राजकारणाच्या दृष्टीने ते नक्कीच बरोबर नाही. मात्र अहलुवालिया हे मुळातच अर्थशास्त्रज्ञ. ते राजकारणी नाहीत. पण हे समजायचं कोणी? अर्थशास्त्रज्ञांना राजकारणात ओढायची आपल्या देशाची पद्धतच आहे.
पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या काही 'खास' माणसांपैकी एक म्हणुन गणले जाणारे मॉण्टेकसिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष या नात्याने आज देशाचं आर्थिक धोरण ठरवण्यामागे सगळ्यात महत्त्वाची भुमिका बजावतात. 'वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे' या शिर्षकाखाली त्यांनी तयार केलेल्या अकराव्या पंचवार्षीक योजनेच्या अंतर्गत आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थीक महासत्ता म्हणुन उदयास आला आहे. जगात जेव्हा सर्वच्या सर्व विकसित देशांना आर्थीक मंदिचे फटके खावे लागले, तेव्हा भारताला या मंदिची झळ फार कमी पोचली. जगातील सर्वात जास्त मनुष्यबळ आणि युवाशक्ती आपल्याकडे असुन आजही प्रत्येकाला शिक्षण आणि रोजगाराची हमी वाटते, प्रगती करण्याचा विश्वास वाटतो आणि पैसा कमावण्याची आशा आजही शाबुत आहे हे सगळं यश अहलुवालिया यांच्या 'प्लॅनिंग' चं आहे. राजकारणात अजीबातच रस नसल्यामुळे अर्थमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागली नाही, एवढीच काय ती कमी. मात्र  अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री जी बॅग घेऊन संसदभवनात जातात, ती बॅग भरून देण्याचं काम मात्र पंतप्रधानांसारखीच निळी पगडी (मात्र निळी पगडी हा त्यांचा ट्रेडमार्क नाही. ते ईतर रंगही वापरतात) आणि पांढरी दाढी राखणारे हे सरदारजीच करतात, यात शंका नाही. 
पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांच्यानंतर भारतातील आर्थीक सुधारणांचा पहिला शिलेदार म्हणुन त्यांचं नाव घेतलं जातं. कारण मॉण्टेकसिंग अहलुवालियांकडे ती क्षमता आहे. ऑक्सफर्ड विद्यापिठाचे माजी गुणवंत विद्यार्थी असलेले अहलुवालिया वयाच्या २८ व्या वर्षी विश्वबॅंकेच्या 'डिव्हिजनल चिफ' या पदावर विराजमान होणारे सगळ्यात तरूण व्यक्ती होते. ऑक्सफर्ड विद्यापिठाने डि लिट देऊन तर भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मविभुषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
अहलुवालीयांचा जन्म १९४३ साली दिल्लीत झाला असला तरी त्यांच्या या 'अर्थकारणाची' सुरवात झाली ती १९५३ साली सिकंदराबादच्या सेन्ट पॅट्रीक्स हायस्कुल मध्ये. सैन्यामध्ये चिफ अकाउंट ऑफीसर असलेल्या त्यांच्या वडिलांची बदली त्या वेळी दिल्लीहून थेट दक्षिणेत सिकंदराबादला झाली होती. तीसर्र्या वर्गात असलेल्या मॉन्टेकचे शैक्षणिक वातावरण अचानक बदलले. विज्ञान विषयात मुळातच रस नव्हता. आता भाषेचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सहाजीकच सामाजीक शास्त्रांकडे जास्त लक्ष देणं सुरू झालं. आठव्या वर्गात दिल्लीला परत यावं लागलं, तोपर्यंत अर्थशास्त्राची गोडी लागली होती.
सेन्ट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषय घेऊन बि ए केलं तेव्हा आर्थीक विषयावर पत्रकारीता करायची हे त्यांचं ध्येय होतं. वडिलांची ईच्छा होती की मुलाने प्रशासकिय अधीकारी होउन देशसेवा करावी. त्यादृष्टीने तयारीही सुरू होती. आय ए एस साठी ईतीहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे विषय होते. मात्र ही परिक्षा त्यांनी कधीच दिली नाही. कारण अर्थशास्त्राशिवाय अन्य कोणत्याही विषयात त्यांना अर्थच दिसला नाही!
'ईकॉनॉमिक टाईम्स' हे पुर्णपणे अर्थकारणाला वाहिलेलं वृत्तपत्रं तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं. यात ईतर अर्थतज्ञांची मतं, स्तंभ, मुलाखती वाचतांना आपणही तज्ञ का म्हणुन होउ नये?, हा विचार मनात आला आणि वडिलांच्या परवानगीने थेट ऑक्सफर्ड विद्यापिठ गाठलं. अर्थशास्त्रात एम फिल करण्याबरोबच या कालावधीत त्यांनी सन्मानाच्या ऑक्सफर्ड युनियन चं अध्यक्षपददेखील भुषवलं.
विद्यापिठातून बाहेर येताच युनिलिव्हर या कंपनिने त्यांना लठ्ठ पगाराची नोकरी देऊ केली होती. योगायोगाने तेव्हाच विश्वबॅकेच्या 'यंग अचिव्हर्स' या योजने अंतर्गत त्यांना या बॅंकेत काम करण्याची संधी प्राप्त झाली. पैसा मिळवण्यापेक्षा विश्वबॅकेचा अनुभव महत्त्वाचा, हा विचार करून त्यांनी बॅकेची ऑफर स्विकारली आणि दहा वर्ष विश्वबॅकेसाठी काम केलं. मात्र वडिलांचा मंत्र मनात कायम होता. देशासाठी काहीतरी करायचं!
सन १९७९. हे वर्ष म्हणजे भारताच्या आर्थीक नियोजनाची कसोटी पाहणारं होतं. दुष्काळ, जागतीक महामंदी, आणि कोलमडू पाहणारी अर्थव्यवस्था या सर्व कठीण परिस्थीतीचा सामना करण्याचं आव्हान देशापुढे होतं. मॉन्टेकसिंग विश्वबॅकेची नोकरी सोडून भारतात परतले आणि केन्द्र सरकारचे आर्थीक सल्लागार झाले. राजिव गांधी पंतप्रधान असतांना त्यांच्या कार्यालयात अतिरिक्त सचीव, आणि नंतर विषेश सचिव ही पदं भुषवली. डॉक्टर मनमोहनसिंग अर्थंमंत्री झाले, आणि एका नव्या युगाला सुरूवात झाली. त्यांच्या अर्थमंत्रालयात सचिवपदी असतांना भारतातील आर्थिक सुधारणांची क्रांती घडवून आणण्यात अहलुवालियांचा सिंहाचा वाटा आहे. केन्द्राय वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते. मुल्यांकन कार्यालयाचे ते पहिले संचालक होते. वित्त आणि वाणिज्य मंत्रालयाचे ते सचिव होते. हे सगळं आपल्यातील उपजत बुद्धीमत्तेच्या भरवश्यावर. कारण शासनाच्या परिक्षा त्यांनी दिल्याच नाहीत.
२००८-०९ मध्ये आलेल्या जागतीक मंदिचा परिणाम प्रत्यक्षपणे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही, याची तजवीज त्यांनी मोठ्या शिताफीने करून ठेवली होती. मंदिची झळ ज्याप्रमाणात ईतर देशांना पोचली त्याप्रमाणात ती आपल्याला पोचली नाही. सध्या ईंधनावरील सबसिडी हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे काही काळ महागाई वाढेल, मात्र येत्या काही वर्षांमध्ये त्याचे परिणाम चांगले दिसतील असा त्यांचा निष्कर्ष आहे. पेट्रोल दरवाढीचा भारतातील गुंतवणुकीवर काहीही परिणाम होणार नाही हा त्यांचा विश्वास आहे. आणि खरं पाहिलं तर तसंच चित्र दिसतं देखील आहे. आर्थिक सुधारणांच्या मार्गावर भारताची वाटचाल भक्कमपणे सुरू आहे.
मात्र दहा वर्षे विश्वबॅंकेसाठी काम केल्यामुळे अहलुवालीया हे 'वर्ल्डबॅंकेचा माणुस' असल्याची टिका त्यांच्यावर वरचेवर होत असते. आर्थिक़ सुधारणांचं नको तीतकं समर्थन करून भांडवलशाही वाढवून अमेरिका धार्जीणी अर्थव्यवस्था ते बनवत असल्याचंही अनेक अर्थशास्त्रज्ञच बोलतात. मात्र हे बोलत असतांना अमेरीकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतण्यामागचा अहलुवालियांचा उद्देश ते सोयिस्करपणे विसरतात. त्यांच्या पत्नी अर्थशास्त्रज्ञ ईसरजज अहलुवालिया पंजाब राज्याच्या नियोजन बोर्डावर सल्लागार आहेत. मोठा मुलगा पवन प्रिस्टनमधून अर्थशास्त्रात एम ए करून मध्यप्रदेशातील ग्रामिण भागातील एका योजनेसाठी कार्यरत राहिला. तर लहान अमन विदेशात न जाता बंगलोरच्या नॅशनल लॉ स्कुल मध्ये कायद्याचा अभ्यास करतोय. देशाप्रती असलेली त्यांची निष्टा या सर्व उदाहरणांतून दिसते.
कॉंग़्रेस पक्षाशी असलेले अहलुवालियांचे मधुर संबंध हा देखील राजकिय क्षेत्रात चर्चेचा विषय असतो. शिवाय अमेरिकेने भारताचे अर्थमंत्री म्हणुन त्यांची नियुक्ती करण्याचे सुचवले होते, असंही सांगीतलं जातं. सन्मानाचा पद्म पुरस्कार त्यांना मिळाला तेव्हा खरंच या पुरस्कारासाठी ते योग्य आहेत किंवा नाही, या बाबतीतही बरिच बरिवाईट चर्चा झाली होती. कॉग्रेसपेक्षा डॉक्टर मनमोहनसिंग, अमेरिकेच्या शिफारसिपेक्षा जागतीक अर्थकारणाचा अनुभव आणि पद्म पुरस्कारापेक्षा त्यांच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या वातावरणात देशात आलेली गुंतवणुक आणि त्यामुळे कॉर्पोरेट जगतात भारताच्या भरमसाठ लोकसंख्येसाठी निर्माण झालेल्या पुरेशा रोजगार संधी यांचा विचार आपण केल्यास अहलुवालियांचं कर्तृत्त्व किती मोलाचं आहे हे आपल्या लक्षात येइलच.

Tuesday 20 September 2011

उस्ताद अहमद हुसेन - महंमद हुसेन!


"अज़ दिल रीज़त, बर दिल खीज़त" म्हणजे- या काळजातून उसळणारी आणि त्या काळजावर बरसणारी गज़ल म्हणजे एक मनभावन काव्यप्रकार आहे.ती काळजाची भाषा आहे.हृदयाचा उद्‌गार आहे. मात्र या तरल काव्यमाध्यमावर अधिराज्य गाजवणा-या काही मोजक्याच नावांशी साधारणपणे आपला परिचय  असतो. ऊस्ताद मेहदिहसन पासुन ते गुलाम अली, जगजीतसिंग, पंकज उदास आणि त्यांच्या सुप्रसिद्ध अश्या काही गज़लांच्या पलिकडे आपल्यापैकी अनेकजण सहसा जात नाहीत. मात्र 'सितारों के आगे जहॉं  और भी है' हेदेखील तेवढंच खरं.
राजस्थानच्या राजेशाही वैभवाचे प्रतीक असलेले हे दोन गज़लनवाज़ भाऊ गेल्या चार दशकांपासुन चोखंदळ गज़लरसिकांच्या गळ्यातले ताईत आहेत. शास्त्रीय संगीत यांच्या रक्तात आहे आणि गज़लची जाण हृदयात. उर्दु आणि हिंदी त्यांच्या जिभेवर तीतक्याच सहज नांदतात जीतक्या फारसि आणि पंजाबी. सुफी गाण्यातील उंची आणि जयपुर परंपरेतील खर्जातील स्वरांवर त्यांचे सारखेचे प्रभुत्त्व आहे. आजवर अनेकांच्या 'धडकन-ए-हिज्र' झालेल्या शेकडो गज़लांना त्यांनी आपल्या आवाजाच्या जादूने अविस्मरणीय बनवलंय. आतापर्यंत अनेकांना कल्पना आली असेलच ही 'जिक्र' उस्ताद अहमद हुसैन आणि महंमद हुसैन यांचा होतोय!
गज़लची आवड असणार्र्यांना उस्ताद अहमद-महंमद हुसेन यांनी गायलेल्या अनेक गजला आता आठवू लागल्या असतील, मात्र ज्यांना गज़लबद्दल फारशी माहिती त्यांनी काही वर्षापुर्वी  आलेल्या 'वीर झारा' चित्रपटातील "आया तेरे दर पे दिवाना!" हे गाणं आठवावं. सहसा चित्रपटसृष्टीपासुन, मुळात मुंबईपासुनच दूर राहणे पसंत करणार्र्या उस्तादद्वयांनी या गाण्यात केलेले  हार्मोनायझेशनचे एकापेक्षा एक प्रयोग आपल्याला नकळत 'वाह्! क्या बात है!" असं म्हणायला लावतात. गेल्या चौरेचाळीस वर्षापासुन रसिकांच्या हृदयाच्या ठाव घेणारे हे हार्मोनायझेशनचे प्रयोग म्हणजे हुसेन बंधुंचं वैषिष्ट्य राहिलेलं आहे. आजही त्यांनी ते जपलंय.
जयपुर घराण्याचे जेष्ट गजल आणि ठुमरी गायक अफज़ल हुसेन हे शास्त्रीय संगित क्षेत्रातलं नावाजलेलं नाव. अहमद (१९५१) आणि महंमद (१९५३) ही त्यांचीच मुलं. शास्त्रीय संगिताचं रितसर शिक्षण वडिलांकडेच झालं. वयाच्या आठव्या आणि दहाव्या वर्षी त्यांनी आपला पहिला कार्यक्रम दिला आणि कारकिर्दीला सुरवात झाली. थोड्या कठीण शास्त्रीय संगीतावर बेतलेली चाल, उत्तम शद्ब, आणि सुस्पष्ट उच्चारण ही त्यांची वैषिष्ट्य सांगता येतील.
मात्र सगळ्यात मोठं वैषिष्ट्य म्हणजे भावांची जोडी एकत्रितरित्या कार्यरत आहे! दोघानी एकाच घरात जन्म घेतलाय. नेहमी सोबतच काम करण्याची शिकवण वडिलांकडून मिळाली आहे. एक विचार, एक सुर व एक ओळख अशी त्यांची जोडी आहे.एकही शख्स तो पहचान हम दोनो की, चाहे दो जिस्म हो, ईक जान है हम दोनों की! ही गज़ल खयालने खास हुसेन बंधुसांठी लीहली असावी!
१९५९ मध्ये 'चाईल्ड आर्टिस्ट'च्या रूपात दोघांनी जयपूर आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर यूथ, 'बी' ग्रेड, '' ग्रेडमध्ये देखील निवड होत गेली. भारत सरकारकडून 'टॉप' ग्रेडने सन्मानित करण्यात आले.आतापर्यंत दोघा भावांचे गझलचे ६४ अल्बम बाजारात आले आहेत. त्यातील गुलदस्ता, हमख्याल, मेरी मोहब्बत, द ग्रेट गझल्स, कृष्ण जनम भयो आज, कशिश, रिफाकत, याद करते रहे, नूर-ए-इस्लाम आदी गाजलेले अल्बम्स आहेत. पुरस्कारही बरेच मिळालेत. राजस्थान सरकारकडून राज्य पुरस्कार, राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 'बेगम अख्तर पुरस्कार', नवी दिल्ली, उ.प्र. सरकारद्वारा 'मिर्झा ग़ालिब पुरस्कार', महाराष्ट्र शासनाकडून 'आपला उत्सव पुरस्कार' आणि अनेक!
शास्त्रीय संगित आणि गज़ल जाणणार्यांना अतीशय भावणारा हा स्वर सामान्य रसिकांपर्यंत मात्र हवा तसा पोचला नही. याचं कारण म्हणजे कठीण शद्ब आणि त्याहूनही कठीण असं संगित करण्यातच या जोडगोळीला रस आहे. सुरवातीला त्यांनी सादर केलेला कला प्रकार प्रेक्षकाच्या लक्षात आला नाही. परंतु, जेव्हा त्यांच्या लक्षा‍त आला तेव्हा तीच उस्तादद्वयीची ओळख बनली.
खयाल, बशिर बद्र, तसेच त्यांच्याच गावचे असलेले हसरत जयपुरी यांच्या वरवर पाहता क्लीष्ट वाटणा-या रचनांना शास्त्रीय संगीताच्या विविध रागदारींमध्ये चपखल बसवून भाव आणि भावार्थ दोन्हींचा संगम साधत गाणं सादर करण्यामध्ये हुसैन बंधुंनी 'महारत' प्राप्त केली आहे. गज़ल बरोबरच भावगीत आणि भक्तीरसातील गाणी त्यांनी बरीच गायली आहेत. स्वतः मुस्लीम असुनही ॐकार मंत्र, मीराभजन आणि सुरदास भजन ते भक्तीभावाने म्हणतात. 'मेहफिलीं'मध्ये आलेली भजनांची फर्माइश ते आवर्जुन पुरी करतात. त्यांच्यामते संगीत परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात त्याची आळवणी करणे हे ईश्वराचे कार्य आहे. याशिवाय अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींवर त्यांची अपार श्रद्धा आहे. ख्वाजाचा दरबार म्हणजे सुफी गायकांचे माहेरघर असते. त्यामुळे सुफी शैलीवरही दोघांनी प्रभुत्त्व मिळवले आहे. उत्तर भारतात आणि पाकिस्तानात सुप्रसिद्ध अशी पंजाबी गज़लही त्यांनी आत्मसात केलेली आहे. गज़लगायकीच्या क्षेत्रातील वेगळी शैली त्यांनी निर्माण केली आणि जपली. जपत आहेत.
शास्त्रीय संगीत जाणणारा, भावार्थाला मानणारा असा त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. झगमग प्रसिद्धीच्या आजच्या जगात उस्तादद्वयिंनी आपली संगीतसाधना स्वतःसाठी आणि या चाहत्यावर्गासाठी सुरू ठेवलेली आहे. मात्र त्यांचा आवाज, शैली ही दर्दी रसिकांना आणि गायकांना बरोबर खुणावते. याचं ताजं  उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचा उभरता गज़लनवाज विजय गटलेवार होय. गज़लचा 'दिवाना' असलेल्या विजयने कधीतरी कुठेतरी ऐकलेली हुसैन बंधुंची 'मै हवा कहॉं वतन मेरा' ही गज़ल त्याच्या मनात ईतकी पक्की ठसली की त्याने सरळ जयपुर गाठलं. उस्तादजींकडूनच गज़ल शिकायची असा त्याने हट्टच धरला. बरेच दिवस त्याची परिक्षा घेतल्यानंतर उस्तान अहमद हुसेन यांनी त्याला शिष्य़ बवनला. गुरुगृही राहून बराच काळ शिक्षण घेतल्यानंर विजय गटलेवारने मुंबई गाठली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. हुसेन बंधुंनी असे अनेक शिष्य तयार केलेले आहेत. दिल्लीला नुकतीच त्यांच्या नावाने संगित  अकादमी सुरू झाली आहे. गुरूगृही जाउन शिक्षण घेण्याचा पद्धतीचे समर्थक असलेले उस्ताद या अकादमीमध्ये चाहत्यांच्या आग्रहास्तव काही ठरावीक विषयांवर व्याख्याने देतात.
भारतीय शास्त्रीय संगीतावर हुसेन बंधुंची देवाईतकीच श्रद्धा आहे. गज़ल ही जन्माने भारतीय नसली तरीही भारतातच ती रूजली आणि वाढली. अश्या या भारतातील गज़ल रसिकही आज गज़ल म्हटलं की पाकिस्तानी गायकांची नावं घेतात ही गोष्ट हुसेनबंधुंना दुदैवाची वाटते. पाकिस्तानात कला आहे, पण त्याची कदर नाही. पाकिस्तानी गायक भारतात येऊन येथील रसिकांच्या भरवश्यावर पैसा, प्रसिद्धी आणि नाव मिळवतात आणि भारतीय गायक मात्र या स्पर्धेत मागे पडतात, या गोष्टीची त्यांच्या मनात सल आहे. मागे पाकिस्तानी गायकांच्या विरोधात भारतीय गायकांनी जी आघाडी उभी केली होती त्यातील हुसेन बंधु एक महत्त्वाचे सदस्य होते.
गझल हा शब्द गजाल या शब्दावरुन आला आहे. गजाल म्हणजे हरिणाचे अश्रु! शिकारी एका हरणाचा पाठलाग करतो आहे. हरिण पुढे सुसाट वेगाने पळून दमते आणि थांबून त्या शिक-याकडे वळून पाहते, तेव्हाच् त्या शिका-य़ाच्या कमानीतील बाण सूटतो, आणि तो बाण आपली छाती भेदणार या कल्पनेने त्याच्या डोळ्य़ात् तरळलेले अश्रू म्हणजेच् गजाल होय! शास्त्रीय संगीताची साधना करतांना नेमकी ही भावना आपल्या गज़ल मधुन व्यक्त करण्याचं सामर्थ्य असलेले उस्ताद अहमद हुसेन आणि महंमद हुसेन भारतीय गज़ल गायकीचे वैश्वीक राजदूत आहेत.

Monday 12 September 2011

ईरॉम शर्मिला

भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी अण्णा हजारेंनी केलेल्या उपोषणाने अवघा देश अक्षरशः ढवळून निघाला. अण्णांच्या समर्थनार्थ दिल्लीपासुन ते गल्लीपर्यंत लोकांनी उपोषणं केली. अण्णांच्या बरोबरीने दहा दिवस उपोषण करणारे कार्यकर्ते देशभर, अगदी खेडोपाडीदेखील सापडले. बदलाचं वारं वाहू लागलं. मात्र प्रत्येक उपोषण यशस्वी होत नसतं. आणि प्रत्येक उपोषण करणारा अण्णांसारखा 'लकी' देखील नसतो. दुर दुर्गम पुर्वोत्तरातल्या ईम्फाल व्हॅलींमध्ये एक मणिपुरी युवती गेली दहा वर्षे उपोषण करत आहे. पण सरकार तिला जबरदस्तीने खाऊ घालत आहे. दुर्दैवाने मेनलँड भारतात तिला फारशी प्रसिद्धी मिळत नाही. अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला समर्थन देण्याचं आमंत्रण या युवतीला दिलं, आणि कधी नव्हे ते - ईरॉम शर्मिला चानु - हे नाव प्रकाशझोतात आलं!
२ नोव्हेंबर २०००! गुरूवार होता. २८ वर्षीय शर्मिला गुरूवारी उपास करायची. मात्र २ नोव्हेंबरच्या गुरूवारी तीने धरलेला उपास आजतागायत तीने सोडलेला नाही. मणिपूरात लष्कराला असलेले काही विशेषाधिकार काढून घ्यावेत व येथून लष्कराला हटवावे यासाठी शर्मिला तेव्हापासुन उपोषण करत आहे. स्वतःच्या तोंडून तीने आजवर अन्नाचा कणही घेतलेला नाही, की पाण्याचा थेंबही नाही.  गेली ११ वर्षे सरकार तिला जबरदस्तीने नाकातल्या नळीवाटे अन्न देऊन जिवंत ठेवत आहे. असं काय घडलं होतं २ नोंव्हेंबर २००० या दिवशी?
मणिपूर व नागालँड या दोन राज्यांमध्ये काही प्रदेशांवरून टोकाचे मतभेद आहेत. एकमेकांच्या प्रदेशावर हल्ला करणे व दुसर्‍या राज्यातील नागरिकांच्या हत्या करणार्‍या टोळ्या दोन्ही राज्यात आहेत. याचा फायदा चीन उठवत आहे व दोन्ही बाजूच्या टोळ्यांना चीन सर्व प्रकारची मदत करत आहे. त्यामुळे नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी व चीनचा या दोन्ही राज्यात संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी भारताने तिथे कायमस्वरूपी लष्कर ठेवलेले आहे व अतिरेकी प्रदेशात लष्कराला हे विशेषाधिकार असतात ते तिथल्या लष्कराला प्रदान केलेले आहेत. या विशेष अधिकारांना "Armed Forces Special Powers Act (AFSPA)" असे म्हणतात. या अधिकारांअंतर्गत लष्कर कोणालाही संशयावरून अटक करू शकते, कोणाच्याही घराची झडती घेऊ शकते व चकमकीत अतिरेक्यांवर थेट गोळीबारही करू शकते. जम्मू-काश्मिरमध्येही लष्कराला हे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत. निरपराध नागरिकांची हत्या करणार्‍या अतिरेक्यांशी लढण्यासाठी लष्करालाही मुक्त हस्त द्यावा लागतो. मात्र पुर्वोत्तर राज्यांतील अंतर्गत कलह मिटवण्यासाठीदेखील परकिय शक्तीप्रणित आतंकवादी भागात असतात तेच अधीकार लष्क़राला दिल्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष आहे. लष्क़राच्या विरोधात त्यांच्या कारवाया सुरूच असतात. नाईलाजाने कधीकधी लष्करही चुकीच्या पद्धतीने उत्तर देते. असंच काहीसं त्या दिवशी घडलं.
बसची वाट पहात उभ्या असलेल्या एका घोळक्यावर आसाम रायफल्सच्या जवानांनी आतंकवादी समजुन बेछुट गोळीबार केला आणि त्याच दहा लोकांचा जागीच मृत्यु झाला. लष्क़राच्या दुर्दैवाने हे सगळे सामान्य नागरिक होते. यात ६२ वर्षाच्या लेसग्बम ईबेटोमी नावाच्या महिलेचा, आणि १९८८ चा राष्ट्रीय साहस पुरस्काराचा विजेता १८ वर्षीय सिन्नम चंद्रमणी यांचाही समावेश होता. लष्क़राने चालवलेले हे निर्घृण हत्याकांड अवघ्या मणिपुरच्या मनावर खुप मोठा आघात करून गेले.
ईराम नंदा चानु या चतुर्थश्रेणी सफाई कर्मचार्र्याच्या नउ अपत्यांपैकी सगळ्यात लहान ईरॉम शर्मिला या संवेदनशिल कवयित्री असलेल्या मुलीला तर काहीच सुचेनासे झाले. आदिवासी राज्य असले तरी मणिपुरची राज्यभाषा ईंग्रजी आहे. शाळांमधुन ईंग्रजी माध्यमातुनच शिक्षण दिलं जातं. लोकशाही, मानवाधिकार ही मुल्यं शर्मिलाने शाळा-महाविद्यालयात राज्यशास्त्राची विद्यार्थी म्हणुन अभ्यासली होती. त्यांची पायामल्ली चाललेली पाहून तीनं मनोमन ठरवलं  - जोवर मनाला शांती लाभत नाही, तोवर गुरूवारचा हा उपास सोडायचा नाही!
शुक्रवारी आपल्या आईला - ईरॉम सखी चानु यांना नमस्कार करून तीने आपला उपोषणाचा सकल्प सांगीतला. व्यथीत सगळेच होते. आईने परवानगी दिली,  आणि शर्मिलाच्या ऐतीहासिक उपवासाची सुरूवात झाली! मागणी ठरली - लष्कराचे हे विशेषाधिकार काढून घ्यावेत. मणिपूर येथून लष्कराला हटवावे. उपोषणाचा कालावधी ठरला - आमरण!
मात्र अतिरेक्यांनी ग्रासलेल्या प्रदेशातून लष्कर काढून घेण्याची चूक कोणताही देश करणार नाही. त्यामुळे शर्मिलाच्या या मागण्या अमान्य करत उपोषणाच्या तीसर्र्या दिवशी तीला सरकारने अटक केली. स्वतःला मारून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गुन्हा (कलम ३०९) तीच्यावर दाखल करण्यात आला आणि तीला न्यायालयिन कोठडित ठेवण्यात आलं. मात्र या कलमानुसार गुन्हेगाराला जास्तीत जास्त केवळ १ वर्षाची शिक्षा करता येऊ शकते. त्यामुळे पोलीस शर्मिलाला दरवर्षी अटक करतात आणि मग परत एक वर्षासाठी तीला अटकेत ठेवतात. गेल्या दशकभरापासून हेच सुरू आहे.
ऑक्टोबर २००४ मध्ये न्यायालयाने तिची सशर्त मुक्तता केली. स्वातंत्र्याचा फायदा घेत शर्मिलाने थेट दिल्ली गाठली. महात्मा गांधीं यांना राजघाटावर श्रद्धांजली अर्पण करून तीने जनसभांना संबोधीत करण्याचा सपाटाच लावला. जंतरमंतरवर तीचं उपोषण सुरू झालं. चार दिवसातच दिल्ली पोलीसांनी तीला अटक करून एम्स मध्ये भरती केलं. दवाखान्यातही स्वस्थ बसायचं नाही हेच तीने ठरवलं असावं. शर्मिलाने पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेकांना पत्रे लिहली. जगभर तीचं नाव झालं. दुदैवाने यात मोठी 'ब्रेकिंग न्युज' नसल्यामुळे आपल्या मिडियाने हा मुद्दा दुर्लक्षीत ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र शर्मिलाच्या आंदोलनाने मोठीच चर्चा भडकवली. अगदी नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीचं नामांकन होईपर्यंत!  यानंतर जणु पुरस्कारांची रांगच लागली.
देशात दुर्लक्ष होत असलं तरिही आंतरराष्ट्रीय समुदायाकडुन शर्मिलाला मिळत असलेलं समर्थन अविश्वसनिय आहे. टर्कीमध्ये २०१० मध्ये आयोजीत केलेलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संमेलन शर्मिलाच्या कार्याला अर्पण केलं होतं. शर्मिलाने मणिपुरी आणि ईंग्रजी भाषेत लिहलेल्या कवीतांपैकी निवडक १२ कवीतांचं प्रकाशन नॉर्वेच्या जुबान बुक्सने नुकतंच प्रकाशित केलं. 'फ्रॅग्रंस ऑफ पिस' (शांतीचा सुगंध) या पुस्तकाच्या विक्रितून मिळालेला नफा शर्मिलाच्या आंदोलनाच्या समर्थनात दान करण्यात आला.
भारतातील अनेक लेखकांनी, कलाकारांनी शर्मिलाचा मुद्दा आपापल्या माध्यमातुन मांडलाय. तिच्यावरचं पहिलं पुस्तक, दिप्तीप्रिया मेहरोत्राने लिहलेलं 'बर्निग़ ब्राईट' हे खुप गाजलं. हे पुस्तक वाचुन मुळचा गोव्याचा आणि आता ईंग्लंडचा नागरिक असलेला डेस्मंड क़ॉटेन्हो याने शर्मिलाशी पत्रमैत्री केली. अगदी स्वप्नवत या पत्रमैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र परंपरावादी मणिपुरी जनतेला हे आंतरधर्मिय प्रेम मान्य नाहीय. सध्या तरी प्रेमाची कबुली देऊन शर्मिला आणि डेस्मंड आंदोलनाला यश येण्याची वाट बघत आहेत. सरकारने लष्कर हटवले तर आपण डेस्मंडशी लग्न करू, असे शर्मिलाने घोषित केले आहे.
मुंबईच्या कवीता जोशीने 'माय बॉडी माय वेपन' या नावाखाली शर्मिलाच्या संघर्षावर आधारीत डॉक्युमेन्ट्री बनवली आहे, तर पुण्याची ऑजस एस वी शर्मिलाच्या जीवनावर आधारीत 'ले मशाले' नावाचा एकपात्री प्रयोग करत असते. या सर्व माध्यमांतुन शर्मिला सामान्य जनतेपर्यंत पोचते आहे. मात्र लष्कर हटवण्याची तिची मागणी कितपत रास्त आहे, हे अद्याप सांगता यायचं नाही. कारण तसे केल्यास मुळातच भारतापासुन वेगळा पडलेला हा भाग चिनने गिळंकृत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, गृहमंत्री पी चिदम्बरम यांनी या भागातील AFSPA कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शर्मिलाची माग़णी स्पष्ट आहे. आता दशकभराच्या उपोषणानंतर तर ती कसल्याच तडजोडीला तयार नाही. दहा वर्षापासुन तिने आपल्या आईची भेट घेतलेली नाही. जेव्हा लष्कर हटेल, तेव्हा आईच्या हाताने भात खाऊन उपोषण सोडायची तिची ईच्छा आहे.
शर्मिलाची मागणी रास्त आहे, किंवा नाही, हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र पुढच्या वर्षीपर्यंत हे असेच चालल्यास उपोषणाची तपपुर्ती साजरी करणारी ती जगातली बहुधा पहिलीच आंदोलक ठरेल, हे मात्र नक्की.

Wednesday 7 September 2011

बायचुंग भुतिया

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाच्या निवृत्तीने कोलकाता-गोव्याबरोबरच मराठी फुटबॉलरसिकही हळहळला. गेली दोन दशके भारतीय फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखला जाणार्र्या बायचुंगचे स्थान भारतीय फुटबॉलच्या 'जनरेशन नेक्स्ट'मध्ये सचिन तेंडुलकरप्रमाणे आहे!
 भारताकडून सर्वाधिक १०९ सामने खेळण्याचा पराक्रम बायचुंगने त्याच्या सोळा वर्षांच्या कारकीर्दीत केला. त्याचे ४३ आंतरराष्ट्रीय गोल म्हणजे व्यक्तिगत कौशल्य आणि सांघिक कामगिरीचा आदर्श ठरले. मात्र आकडेवारी बाजुला ठेवून विचार केल्यास तो लाखो उदयोन्मुखांसाठी स्फूतीर्स्थान ठरणे ही भुतियाची मोठी कमाई मानावी लागेल. भारतात क्रिकेटचे वेड जगजाहीर आहे. असे असतानाही बायचुंगने आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. तो भारतीय फुटब़ॉलचा पोस्टर बॉय ठरला. भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रिकेटनंतर लोकप्रियतेत बायचुंगचा क्रमांक लागतो, हे त्याचं केवढं मोठं यश!
बायचुंगची लोकप्रियता पाहून माजी प्रशिक्षक बॉब हॉटन यांनी सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना केली होती. मात्र केवळ लोकप्रियतेच्या निकशावरच नव्हे, तर खेळातील विक्रमी कामगिरी, आणि मैदानाबाहेरील विनम्र वागणुक आणि त्याने जपलेलं सामाजिक भान यावरूनही त्याची तुलना सचीनशी नक्कीच होउ शकेल.
बायचुंने भारतीय फुटबॉल लिगमध्ये इतिहास घडविला आहे. इस्ट बंगाल, जेसीटी फगवाडा आणि मोहन बागान या तीन क्लबकडून तो फुटबॉल लिगमध्ये खेळलेला आहे. त्याच्या नावावर २०० पेक्षा जास्त गोल्स आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने नेहरू चषकावर लागोपाठ दोन वेळा आपले नाव कोरले. फुटबॉलमध्ये, तेही भारतातर्फे खेळून आंतरराष्ट्रीय सामन्यांचे शतक पूर्ण करणे ही काही सोपी बाब नव्हे. शिवाय आपला स्वतःचा क्लब असणारा तो जगातला एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू  आहे.
ईतके असुन सिक्कीम या त्याच्या जन्मभुमीप्रती आणि लोकांप्रती असलेली त्याची आत्मीयता, खेड्यातल्या एखाद्या गल्लीत फुटबॉल खेळणार्र्या मुलापासुन ते आंतरराष्ट्रीय पटलावर तयार होत असलेल्या खेळाडुंबद्दल त्याला वाटणारी तळमळ या सगळ्यांमुळे देखील त्याचे नाव कायम लक्षात राहिल. युवा पिढीतील फुटबॉलपटू घडविण्यासाठी त्याने मिशन हाती घेतले असून, दिल्लीत फुटबॉल स्कूल सुरू केले आहे. सिक्कीमसह ईशान्य भारतातील फुटबॉलच्या विकासाकरिता जागतिक फुटबॉल महासंघाकडून (फिफा) भरीव अनुदान मिळविण्यातही त्याचा पुढाकार आहे.
खरं पाहिलं तर भुतिया हे मुळचे तिबेटचे. पंधराव्या दशकात ते सिक्कीमसह भारताच्या पूर्व भागात आणि भुतानमध्ये स्थलांतरित झाले आणि आता कायमचे भारतवासी झाले. टिंकी टम या सिक्कीममधील खेड्यात दोरजी दोर्मा आणि सोनम या शेतकरी दाम्पत्याला १५ डिसेंबर १९७६ साली प्राप्त झालेले तीसरे अपत्य म्हणजे बायचुंग. तिबेटीयन भाषेत बायचुंगचा अर्थ होतो -- छोटा भाऊ म्हणजेच शेंडेफळ! भारतीय फुटबॉलमध्ये त्याची भूमिका मात्र वडीलधाऱ्या भावाची आहे. त्याचा मोठा भाऊ स्थानिक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. शालेय पातळीवर बायचुंग भुतिया हा फुटबॉल व्यतिरिक्त बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रतिनिधित्व करत असे. मोठ्या भावाने फुटबॉलमधील त्याचं कौशल्य हेरलं, आणि बायचुंगची जडणघडण सुरू झाली. आई आणि वडिल हे गरीब शेतकरी असल्यामुळे त्याच्या खेळाच्या वेडाकडे त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. मोठ्या भावाने मात्र नेहमी त्याला प्रोत्साहन दिलं. कर्मा भुतिया या आपल्या काकांकडे तगादा लावून त्याने बायचुंगचा प्रवेश पॅक्योंग या पुर्व सिक्कीममधील गावातील सेंन्ट झेवियर्स कॉन्व्हेन्टमध्ये करवला. आपल्या मोठ्या भावाच्या प्रयत्नांचं चीज करत केवळ नऊ वर्षाच्या बायचुंगने स्पोर्टस ऑथॉरीटी ऑफ ईण्डीया ची शिष्यवृत्ती मिळवली, आणि सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे ताशी ऍकॅडमी मध्ये फुटबॉल खेळाडू म्हणुन प्रवेश प्राप्त केला. सचिनला आणि बायचुंगमध्ये असलेलं हे आणखी एक साम्य.
पुर्वोत्तर राज्यांमध्ये असलेले फुटबॉलचे वेड जगजाहिर आहे. वर्षभर तेथे क्लब आणि लिग मॅचॅस होत राहतात. बायचुंगचेही सिक्कीमच्या छोट्या छोट्या क्लब्सकडून खेळणे सुरू झाले. १९९२ मध्ये सुब्रतो कप या प्रतिष्टेच्या मानल्या जाणार्या स्पर्धेमध्ये तेव्हाचा भारताचा गोल कीपर भास्कर गांगुली याने बायचुंगचा खेळ पाहिला, आणि त्याला फुटबॉलच्या माहेरघरी - कलकत्त्याला - येण्याचं आमंत्रण दिलं. १९९३ मध्ये ईस्ट बंगाल क्लब ची जर्सि त्याने घातली, आणि हाच बायचुंगच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. १९९५ मध्ये जेसीटी फगवाडा या क्लबकडून खेळताना त्याने ईडियन फुटबॉल लिगमध्ये सर्वाधीक गोल मारले, आणि आपला आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा मार्ग प्रशस्त केला. वयाच्या १९व्या वर्षी नेहरू कपमधील उझबेकिस्तानविरूद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 'राखीव खेळाडू' म्हणुन गोल करून बायचुंगने आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. 'सिक्कीम्स स्नॅपर' हे त्याचे टोपण नाव गोल मारण्याच्या शैलीवरून त्याला पडलं ते ह्याच दरम्यान.
त्यानंतरची भुतिया म्हणजे भारतीय फुटबॉल हे समिकरण तब्बल दशकभरापर्यंत चाललं. १९९९ला बायचुंगने कर्तृत्वाची आणखी एक किक लगावली. इंग्लंडच्या सेकंड डिव्हिजन लीगमध्ये खेळणाऱ्या बरी एफ. सी. क्लबने त्याला तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. युरोपने संधी दिलेला तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. चपळता, चेंडूवर कमालीचे नियंत्रण, अथक परिश्रम करण्याची वृत्ती आणि जिगर या गुणांच्या जोरावर बायचुंग केवळ भारतच नव्हे, तर एशियन फुटबॉलमधील स्टार ठरला. फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी अर्जुन पुरस्कार तसेच पद्म श्रीसन्मानाने गौरविण्यात आले. भारताचा माजी फुटबॉलपटू विजयनने बायचुंगला भारतीय फुटबॉलसाठी ईश्वराने दिलेली भेट असल्याचे म्हटले होते.
चढत्या कारकिर्दीदरम्यान बायचुंग अनेकदा वादाच्या भोवर्र्यातही अडकला. तो कोणत्या क्लबकडून खेळतो, या पासुन ते तो खेळात राजकारण आणतो, यापर्यंत सगळे आरोप त्याच्यावर झाले. २००६ मध्ये प्रशिक्षक सय्यद नयीमुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी खराब होत होती. त्यावेळीच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिदीर्ला गुडबाय करण्याची मानसिक तयारी केली होती. मात्र, एआयएफएफचे अध्यक्ष प्रियरंजन दासमुंशी आणि नवीन प्रशिक्षक बॉब हॉटन यांच्या विनंतीवरून त्याने आपला विचार बदलला. याशिवाय 'राजकारणी, उद्योजकांच्या टेरेसवरील गवताची मशागत करण्यासाठी आपली व्यवस्था राबवली जाते, तोपर्यंत फुटबॉलच्या मैदानावरील भवितव्य चिखलातच रुतलेले राहील,' असे परखड बोल सुनवून त्याने अनेकदा राजकारण्यांचा रोश स्वतःवर ओढावून घेतला.
भुतीया हे तिबेटमधील बुद्ध धर्मीयांचे उपनाम असले तरीही बायचुंग स्वतःल धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगतो. मात्र याचा अर्थ तो निधर्मी आहे असा नव्हे. केवळ तार्कीक किंवा अध्यात्मिक आधारावर बुध्दाच्या विचारांचे पालन करीत नाही, तर तो आपल्या वैचारीक स्वातंत्र्याची जोपासना करण्याचा दृष्टीने विचारांना मानतो. मुळात तिबेटियन असल्यामुळे २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकची मशाल घेण्यास त्याने नकार दिला होता. बायचुंगने घेतलेल्या या निर्णयामुळे उलट सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.
काही दिवसांपुर्वी झलक दिखला जा या डान्स रिऍलीटी शो मध्ये त्याने भाग घेतला होता. खरं म्हणजे गोल मारल्यानंतरही न नाचणारा हा खेळाडू नृत्याचा गंधही नसतांना या कार्यक्रमात सहभागी झाला तो हाच विचार करून की, पहिल्या दोन-तीन भागांमध्येच आपली गच्छंती होईल. मात्र झालं वेगळंच. सिक्कीममध्ये त्याला देव मानणार्र्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर एस एम एस पाठवून बायचुंगला विजेता बनवले. त्यानिमित्तानं त्याला शेवटच्या भागापर्यंत का कार्यक्रमाबरोबर रहावं लागलं आणि लिग मॅचॅसमधील प्रॅक्टीस सेशन्स आणि एका सामन्यालाही मुकावं लागलं. यामुळे त्याच्यावर पुन्हा टिकेची झोड उठली. मात्र या सगळ्या टिकास्त्रांची मोठ्या खेळाडुंना सवय करून घ्यावी लागते. सचिनबरोबर असलेलं बायचुंगचं हे आणखी एक साम्य!
या सगळ्यांबरोबरच उल्लेखनिय म्हणजे बायचुंगचे मराठी कनेक्शन! त्याची अनेक वर्षांपासुन प्रेयसी आणि आता पत्नी असलेली माधुरी टिपणीस ही मुळची पुण्याची आहे. नुकतेच तीने एक मुलगा आणि एक मुलगी अश्या जुळ्यांना जन्म देऊन एक वेगळा गोल मारला आहे.
पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे बायचुंगने आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याचा निर्णय़ नुकताच घेतला. निवृत्ती घेतली असली तरी सिक्कीम एफसी क्लबकडून तो खेळणार आहे. शिवाय युवा पिढीतील बायचुंग घडविण्यासाठी त्याने मिशन हाती घेतले असून, दिल्लीत फुटबॉल स्कूल सुरू केले आहे. भारतीय फुटबॉलसाठी योगदान देण्यास बायचुंग भुतिया सदैव तयार असणार आहे.

Friday 2 September 2011

अगाथा संगमा

एकविसाव्या शतकातला भारत म्हणजे तरूणांचा देश. स्वातंत्र्याची ६५ वर्षे पुर्ण करतांनाच आता देशाची धूरा 'यंग ब्रिगेडच्याच' खांद्यावर असणार हे नक्की आहे. म्हणुनच प्रत्येक क्षेत्रात आज तरूणांईचे आयकॉन्स बनणे आणि बनवणे सुरू झाले आहे. देशातल्या प्रत्येक शहरात भविष्याकडे डोळे लावून बसलेले महाविद्यालयीन तरूण; विविध क्षेत्रामध्ये नावारूपाला येणारं तरूण नेतृत्त्व आणि कर्तृत्त्व या सर्वांनी ६५ वर्षे वयाच्या या स्वातंत्र्याला एक नवी उभारी दिलेली आहे.
अन्य क्षेत्रांबरोबच राजकारणातही अनेक युथ आयकॉन्स निर्माण झाले आहेत. राजकारणाला फुल टाईम करीअर म्हणुन पहाणारे आणि कॉर्पोरेट स्टाईल पॉलिटिक्स करणारे उच्चशिक्षित युवक या क्षेत्राला थोड्याफार प्रमाणात का होईना बदल दाखवत आहेत. म्हणुनच ज्या देशात खासदार होण्याची वयोमर्यादाच २५ आहे, त्या देशात सत्तावीस वर्षाची अगाथा संगमा खासदार म्हणुन निवडूनही येते, आणि डॉक्टर मनमोहसिंग यांच्या मंत्रीमंडळात सर्वात कमी वयाची मंत्री बनुन 'ग्रामिण विकास' सारख्या महत्त्वाच्या खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कारभारही सांभाळते ही अतीशय उल्लेखनिय बाब होउन बसते. कुटुंबात असलेली राजकिय पार्श्वभुमी आणि वडिल पि ए संगमा यांचं राजकिय वजन या गोष्टी लक्षात घेतल्या तरीही मेघालयच्या दुर्गम गारो टेकड्यांमध्ये बालपण घालवलेल्या या मुलीने ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणुन ज्या आत्मविश्वासाने विश्वसमुदायासमोर भारताचं जे प्रतिनिधित्त्व केलं आहे त्याची दखल घेणं आवश्यक आहे.
नुकत्याच जुलै महिन्याच्या चोवीस तारखेला अगाथाने आपला एकतीसावा वाढदिवस साजरा केला. यातली सहा वर्ष तीने खासदार म्हणुन तर साडेतीन वर्षे मंत्री म्हणुन घालवली आहेत . आज राजकारणात असलेल्या अनेक तरूण नेत्यांप्रमाणेच अगाथाला देखील हे क्षेत्रं वारसा हक्काने मिळालेलं आहे. तीचा जन्मच मुळी दिल्लीचा! १९८० मध्ये अगाथाचा जन्म झाला तेव्हा वडिल पुर्णो ऍजिटॉक संगमा हे केन्द्रीय मंत्रीमंडळात मंत्री होते. ती शाळेत जाऊ लागली, तेव्हा १९८८ मध्ये ते मेघालयचे मुख्यमंत्री झाले. ती पुण्यात कायद्याचा अभ्यास करत असतांना पि ए संगमा यांनी शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. आणि २००८ मध्ये ती दिल्लीला हायकोर्टात वकीली करत असतांना वडिलांनी राष्ट्रीय राजकारणातून मेघालयच्या राजकारणात उडी घेतली, आणि खासदारकीची धूरा आपल्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान अगाथा च्या खांद्यावर सोपवली.
मात्र अगाथाला वारसाहक्काने 'राजकीय वजन' ही एकच गोष्ट मिळालेली नाही. उच्चशिक्षण, वक्तृत्त्व, समस्यांची जाण, हजरजबाबीपणा आणि अभ्यासु वृत्ती या गोष्टी देखील तीला पिढीजात प्राप्त झाल्या आहेत. वडिल पि ए संगमा परराष्ट्र संबंध आणि कायद्याचे अभ्यासक आहेत. मोठा भाऊ कर्नाड हा अमेरिकेतील पेनिसॅल्व्हीया विद्यापिठ्याच्या व्हॉर्टन बिझनेस स्कुलमधून एम बि ए आहे. मेघालयच्या अर्थमंत्रीपदाची धूरा सांभाळल्याच्या दहाव्या दिवशीच मेघालयचा वर्षभराचा अर्थसंकल्प सादर करून कर्नाडने आपल्या बुद्धीची चुणुक दाखवून दिली होती. अगाथाचा दूसरा भाऊ जेम्स आणि मोठी बहीण ख्रिस्ती देखील उच्चविद्याविभुषित आहेत. जेम्सनेही नुकतंच राजकारणात पदार्पण केलेलं आहे तर ख्रिस्तीचं नाव आर्किटेक्ट म्हणुन गाजतंय.
मेघालयच्या टेकड्यांमध्ये शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर बारावीनंतर पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम करण्यासाठी अगाथाने २००० साली थेट पुणे विद्यापिठ गाठलं आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. लोकसभेच्या सभापतींची कन्या, अशी ओळख माहिती होऊ नये, याकडेच तिचा कल होता. अन्य सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणेच ती कायम कॅम्पसमध्ये वावरायची. अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या वेळी अगाथा आजारी पडली होती. त्यानंतर एक वर्ष थांबून तिने २००५ साली अभ्यासक्रम पूर्ण केला.
सायबर लॉ, कॉर्पोरेट लॉ, मानवाधीकार आणि संरक्षण कायद्यांमध्ये तीने पदवीकाही मिळवल्या. ईंग्लंडला नॉटींगहम विद्यापिठातून ईनव्हायर्नमेन्टल मॅनॅजमेन्टमध्ये एम ए केल्यानंतर तीने दिल्ली हायकोर्टात वकील म्हणुन करीअरला सुरूवात केली. कायद्याचा अभ्यास करतांना तीने निवडलेले विषय असोत, किंवा एम ए करण्यासाठी निवडलेला पर्यावरणशास्त्र हा विषय असो, नव्या जगातील नव्या विषयांना जाणुन आणि समजुन घेण्याचा तिचा प्रयत्न यातून दिसतो. आयुष्यात कधी तरी संगमा यांचे राजकीय वारसदार म्हणून भूमिका पार पाडावी लागेल, याची तिला जाणीव होती. इतक्या लवकर खासदार होण्याची वेळ येईल आणि मंत्रिपदाचा मान मिळेल, अशी तिलाही अपेक्षा नसावी. मात्र पुढेमागे आपल्याला राजकारणात यायचेच आहे, त्याची तयारी म्हणुनच तीने हे विषय निवडले. म्हणजेच अगाथाचा राजकारणातील प्रवेश हा अपघाताने झालेला नाही. या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने,  आणि तयारीने तीने पदार्पण केलं आहे.
दिल्लीला फॉक्स मंडल लिटल ऍण्ड कंपनी या लॉ फर्म मध्ये काम करत असतांनाच वडिल पि ए संगमा यांनी खासदारकिचा राजीनामा दिला आणि अगाथाला आपला वारस म्हणुन निवडणुकीस उभे केले. वर्ष होतं २००८. त्या वेळला उण्यापुर्र्या सत्तावीस वर्षाच्या अगाथाने प्रचारसभांना संबोधीत करणे, रोड शो, आणि जनतेशी संवाद ह्या सगळ्या गोष्टी लिलया केल्या. मेघालयच्या गारो, खासी आणि जैतीया बोलींबरोबरच ईंग्रजी, हिंदी आणि पुण्यात राहिल्यामुळे मराठीचीही तीला चांगली जाण आहे. विलासराव देशमुख ग्रामिण विकास खात्याचे मंत्री असतांना या खात्याची राज्यमंत्री म्हणुन अनेकदा त्यांच्याबरोबर दौ-यावर जाण्याची संधी अगाथाला प्राप्त झाली. तेव्हा बरेचदा त्यांच्याशी मराठीत बोलून तीने धमाल उडवून दिली होती.
ईंग्रज सत्तेच्या आणि धर्मांतरणाच्या प्रभावामुळे मेघालय, मणिपुर, मिझोराम ईत्यादी राज्यांची राजभाषा आज ईंग्रजी आहे. हिंदी किंवा त्यां त्या राज्यातील स्थानिक भाषेला राजभाषेचा दर्जा नाही. हिंदिबद्दल असलेली अनास्था ह्याला कारणीभुत आहे. मंत्रीपदाची शपथ अस्खलीत हिंदीमधून घेतांना अगाथाने पुर्वोत्तर राज्यांमध्ये असलेली ही अनास्था आता दूर होते आहे, हा संदेश देण्याचाच प्रयत्न केला.
या सगळ्यांबरोबरच कित्येक किलोमिटर्स पायी प्रवास करण्याची तीची क्षमता आहे. आणि पायी चालतांना हाती कॅमॅरा असेल, तर मग तर काही बघायलाच नको! फोटोग्राफिचा आपला छंद तीने प्रयत्नपुर्वक जपला आहे. पर्यावरण या विषयावर तर तीचा अभ्यासही आहे. शिवाय मेघालयचा निसर्गश्रीमंत वातावरणात बालपण घालवले असल्याने ती पर्यावरण रक्षण या विषयाबद्दल भरभरून बोलते. या क्षेत्रातील अनेक एनजिओसाठी ती कामही करते.
मेघालयच्या लोकांबद्दल आणि निसर्गसौंदर्याबद्दल तीच्या मनात नितांत प्रेम आहे. ईथला निसर्ग कॉर्पोरेट आक्रमणाचा बळी ठरू नये, आणि त्याबरोबरच लोकांनी मागासलेलेही राहू नये या दुहेरी जबाबदारीला पार पाडतांना तीने अनेक धाडसि निर्णयही घेतले आहेत. युवा नेतृत्त्व म्हणुन तिच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणिवही अगाथाला आहे. "दोन बादल्या पाण्यासाठी सहा किलोमिटर टेकड्या तुडवत जावे लागणे हे किती जिकरिचं काम आहे, ते मेघालयच्या दुर्गम भागात मी पाहिलंय. हे दोन बादल्या पाणी त्यांच्या घरापर्यंत पोचवलं तर ते घर सोडून जाणार नाहीत. मग परकिय येऊन तो भुभाग हस्तगत करू शकणार नाहीत. शेवटी माणसं राहिली, तरच राज्य राहिल. देश राहिल. त्यासाठी आधी माणसं घरी रहायला हवी!"
अतीशय सोप्या शब्दात अगाथा मोठा संदेश देऊन जाते. 'अगाथा' या नावाचा अर्थ आहे सन्माननिय. पुर्वोत्तर राज्यांना त्यांचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी झटणा-या  अगाथा ला 'फेस ऑफ नॉर्थ ईस्ट' अशी योग्यच ओळख प्राप्त होते आहे. पुर्वोत्तर राज्यांप्रमाणेच जरा दुर्लक्षीत राहिलेली अगाथा ही खर्र्या अर्थाने 'युथ आयकॉन' आहे. असायला हवी.