Sunday 30 October 2011

जॉनी लिव्हर

दिवाळीची धामधुम संपवून सर्वजणच आता नव्या जोमाने कामाला लागले असतील. मागचा आठवडाभर दिवाळीच्या निमित्ताने हास्यकल्लोळाचे कार्यक्रम सर्व वाहिन्यांवर चोवीस तास सुरू होते. तसेही हल्ली हिंदी असो वा मराठी, स्टॅण्ड-अप कॉमेडीला चांगलेच दिवस आले आहेत. अनेक नवे लाफ्टर चॅम्पीयन्स  आणि हास्यसम्राट दरवर्षी बनत आहेत. या सगळ्यांचं आराध्य दैवत आणि मुळातच स्टॅण्ड-अप कॉमेडीचा कायापालट करणारा विनोदाचा अनभिशिक्त चक्रवर्ती सम्राट म्हणजे जॉनी लिव्हर! केवळ हे नाव वाचून किंवा छायाचित्र पाहूनच आपल्यापैकी अनेकांच्या ओठांवर एक सुचक स्मीतहास्य नकळतपणे तराळलं असेल - यापेक्षा जास्त या अफलातून व्यक्तीमत्त्वाची जादू काय सांगावी?
गेल्या तीस वर्षाहून अधीक काळ जॉनी लिव्हर आपल्याला हसवतो आहे. येत्या जानेवारी महिन्यात तो ६३ वा वाढदिवस साजरा करेल, पण या गोष्टीवर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही ईतका तो तरूण दिसतो. जॉनी सतत हसत असतो, आणि त्याला पाहून आपणही. मात्र हसण्या-हसवण्याची ही जादू प्राप्त करण्यासाठी जॉन प्रकाशराव जनुमाला या माणसाला खुप संघर्ष करावा लागलाय.
आंध्रप्रदेशच्या ऑस्लापॅलॅट खेड्यातून गिरणी कामगार म्हणुन मुंबईत धारावीला स्थायिक झालेल्या वडिलांजवळ रहायला आला तेव्हा जॉनने शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. आई करूणाम्मा अशिक्षित होती. हिंदी-मराठी पैकी कुठलीच भाषा येत नव्हती. मात्र मुंबई सगळ्यांना जगणं शिकवते. जॉन सतत आईबरोबर रहात असे. भाषा येत नसुनसुद्धा समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधण्याचं आईचं कौशल्य तो कुतुहलपुर्वक न्याहाळत असे. एरवी तेलगुमिश्रीत हिंदीमध्ये शेजा-यांशी संवाद साधणारी आई, जेव्हा पंजाबी शेजारणीशी बोलते, तेव्हा तीचा स्वर कसा पटकन पंजाबी होतो; जेव्हा ती मराठी बोलते, तेव्हा तीचा आवाज कसा बदलतो, याचं जॉनला नेहमी कुतुहल वाटे. समोरच्याची लकब अचुक हेरून ती क्षणार्धात आत्मसात करण्याचं कौशल्य त्यानं आईकडूनच प्राप्त केलं. सातव्या वर्गात शाळा सोडून बसस्टॅंडवर फेरीवाल्याचं काम करावं लागलं, तेव्हा हे कसब त्याच्या कामी आलं.
समोरच्या व्यक्तीच्याच भाषेत, आणि त्याच्याच लेहज्यात त्याला वस्तु विकत घेण्याचा आग्रह करणं ही लहानग्या जॉनची खासियत बनली. बसस्टॅंडवर येणारे लोक सिनेमाचे दिवाणे असल्याचं लक्षात आल्यावर त्याने सिनेस्टार्सची हुबेहुब नक्कल करत पेन, पेन्सील आणि ईतर वस्तू विकायला सुरूवात केली. मिमिक्री आर्टिस्टची जडघडण अशी बस स्टॅंडवर होत गेली. मनोमन त्याने ठरवून टाकलं की - कलाकार व्हायचं!
मात्र घरची परिस्थीती वेगळी होती. वडिलांना आर्थीक आधाराची गरज होती. त्यांनीच पुढाकार घेऊन जॉनला हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामगाराची नोकरी मिळवून दिली. फॅक्ट्रीत काम करतांना मिमिक्रीचं भुत डोक्यातून निघुन जाईल हा वडिलांची उद्देश! मात्र झालं उलटंच! आपल्या बरोबरच्या कामगारांना विविध सिनेस्टार्सच्या नकला करून दाखवणे हा जॉनीचा आवडता छंद बनला. फॅक्ट्रीच्या एका गेट टुगेदर मध्ये अधीकारी आणि कर्मचा-यांसमोर त्याने पहिलावहीला "स्टेज परफॉर्मन्स" दिला आणि खळखळून हसणा-या हिंदुस्थान लिव्हरच्या कर्मचा-यांनीच त्याचं 'जॉनी लिव्हर' हे नामकरण केलं.
हिंदुस्थान लिव्हरच्या साथीने जॉनीची अभिनयक्षेत्रात वाटचाल सुरू झाली. त्यावेळचे गाजणारे मिमिक्री आर्टीस्ट प्रताप जानी आणि राम कुमार यांच्या पायाशी जाऊन मिमिक्रीचे धडे त्याने गिरवले. ऑर्केस्ट्राजमध्ये दोन गाण्यांमधील असलेल्या मोकळ्या वेळेत सिनेस्टार्सची नक्कल करणे हे तेव्हा मिमिक्री आर्टीस्टचं काम होतं. काही स्थानिक ऑर्केस्ट्राजमध्ये जॉनीने हे काम देखील केलं. तब्बल सात वर्षे हाच दिनक्रम ठरला. घर-फॅक्ट्री-ऑर्केस्ट्रा! फॅक्ट्री सांभाळून संध्याकाळी घाईघाईने ऑस्केस्ट्राकडे पळणा-या जॉनीला कुण्या एका अधीका-याच्या ओळखीने कल्याणजी-आनंदजी जोडीच्या ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्री आर्टीस्ट म्हणुन काम करण्याची संधी मिळाली आणि आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं. कल्याणजी-आनंदजींच्या बरोबर जगभर शो करत फिरण्याची संधी त्याला मिळाली. अमिताभ बच्चनसह ईतर अनेक कलाकार, आणि गायक यांची ओळख झाली. त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या लकबी, सवयी, स्वभाव, आवाजाचे चढ-उतार हे सगळं त्याने जवळून पाहिलं आणि आत्मसात केलं. केवळ नक्कल करणारा किंवा  आवाज काढणारा एक कलाकार म्हणुन रहायचं नाही, हे त्यानं ठरवलं.
यासाठी स्वतःला तयार करण्याचं काम मग सुरू झालं. "चित्रपटातलेच संवाद का म्हणुन सादर करायचे? आपण स्वतः स्क्रीप्ट लिहून कार्यक्रम सादर करायला पाहिजे!" निर्णय झाला. छोटेछोटे किस्से एकमेकांत गुंफुन  आपल्या कार्यक्रमाची स्क्रीप्ट स्वतः लिहणे त्याने सुरू केले. हे किस्से तुफान लोकप्रिय झाले. प्रत्येक ऑर्केस्ट्रामधून मग जॉनी लिव्हर साठी मागणी येऊ लागली! दिवस बदलू लागले.
दरम्यान त्याने स्वतःच्या किस्स्यांची एक ध्वनिफित तयार करून प्रकाशित केली. ८० च्या दशकात या कॅसॅटने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्डस तोडले. प्रत्येक घराघरात आणि समारंभात, अनेक म्युझिक स्टोर्समध्ये, वेटींग रूम्समध्ये आणि लग्नाएवात सुद्धा हीच ध्वनिफित वाजु लागली. स्कायलॅब, मद्रासि अन्ना क्रिक़ेट, हिजरा कबड्डी, बिल्डींग मे आग सारखे किस्से आजही अनेकांना पाठ असतील. जॉनिला याच किस्स्यांसाठी स्टेज शो करण्याची मागणी येऊ लागली. त्याचे हे किस्से वापरून अनेक स्थानिक नकलाकारांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं.
तेव्हा नुकतीच नेतेगिरीची ईनिंग सुरू केलेले जेष्ट अभिनेते सुनिल दत्त यांनी जॉनीला ऑर्केस्ट्रात पाहिलं. किरकोळ शरिरयष्टीच्या, पक्क्या दाक्षिणात्य काळ्या रंगाच्या, या ठेंगण्या माणसामध्ये त्यांनी भविष्यातला बॉलीवुडचा कॉमेडियन हेरला. दर्द का रिश्ता या चित्रपटात त्याला एक छोटासा सिन मिळाला आणि जॉनीने त्याचं सोनं केलं.
बाजीगरमधल्या बाबुलाल च्या भुमिकेने लोकांच्या कानापर्यंत पोचलेल्या जॉनीला लोकांच्या मनापर्यंतही पोचतं केलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर येणा-या जवळपास प्रत्येक चित्रपटात जॉनि लिव्हर असायचाच. त्याला भुमिकेसाठी साईन करून शुटींगला बोलवायचे, आणि 'जॉनीभाई आप देख लो क्या करना है!" असं म्हणुन अवघ्या सिनची लिखाणापासुनची जबाबदारी त्याच्यावर सोपवून लोक मोकळे व्हायला लागले. मात्र व्यवस्थीत स्क्रीप्ट आणि दिग्दर्शन नसल्यामुळे जॉनीच्या अभिनयात तोच तो पणा येऊ लागला. तशी टिकाही त्याच्यावर होउ लागली. हळूहळू जॉनीने या सगळ्यापासून स्वतःला दूर करत मोजके चित्रपट घेणं सुरू केलं. मात्र याच कालखंडाने त्याला कॉमेडी किंग बनवलं यात शंकाच नाही.
जॉनी लिव्हरने प्रसिद्धी आणि पैसा मिळवला असला तरीही गरीबीचा विसर त्याने पडू दिलेला नाहिय. अगदी छोट्याश्या खेड्यातल्या नकलाकारालाही हवी ती मदत करायला तो तयार असतो. सिने ऍण्ड टिव्ही आर्टीस्टस असोशिएशन, तसेच मिमिक्री आर्टीस्ट  असोशिएशनचा तो अध्यक्ष आहे, आणि या दोन्ही जबाबदा-या तो पुर्णवेळ पार पाडतो. विनोदाची संकल्पनाच बदलवून टाकणा-या 'द ग्रेट ईंडियन लाफ्टर चॅलॅंज' ची संकल्पना जॉनिच्याच सुपिक डोक्यातून बाहेर पडलेली होती. तसेच सुनिल पाल आणि राजु श्रीवास्तव सह 'लाफ्टर चॅलॅंज' ची पहिली बॅचच जॉनी लिव्हरच्या शिष्यपरिवारातील होती, असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. टिव्हीवर आणि सिनेमात बिझी असतांनाही जॉनीने रंगमंचाशी नातं अतुट ठेवलं. आजही जगभर त्याचे स्टेज शो होतात आणि हाउस फुल्ल गर्दी खेचतात!
चित्रपटसृष्टीत एक दिलदार, मोकळ्या मनाचा आणि कलाकाराची कदर करणारा कलाकार म्हणुन जॉनिला ओळखलं जातं. त्याचा भाऊ जिमि मोसेस हा सुद्धा कॉमेडिअन म्हणुन गाजतोय. शिवाय मुलगा जेस सुद्धा लवकरच या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
मायानगरीमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळवत असतांनाच माणसं कमावण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं. जॉनी लिव्हरच्या चेह-यावरील निखळ, निरागस, आणि सहज असं स्मीतहास्य त्याला हे भाग्य मोठ्या प्रमाणात लाभल्याचं द्योतकच नव्हे का?!

Monday 24 October 2011

मृत्युंजय डॉक्टर शरदकुमार दिक्षीत

"अनादि मी! अनंत मी! अवध्य मी भला! मारिल रिपु जगती असा कवण जन्मला!" अश्या शब्दांत प्रत्यक्ष काळालाच आव्हान देण्याचं सामर्थ्य सावरकरांसारख्या तेजस्वी राष्ट्रपुरूषाच्या ठायी येतं; कारण तेथे मातृभुमीप्रती असलेल्या निस्सिम भक्तीचं अधिष्टान आहे. आपल्या जन्मभुमीबद्दलची भक्ती आणि आपल्या देशबांधवांसाठी झटण्याची ईच्छा या सगळ्यांच्या बळावर मृत्युला एकदा नव्हे तर अनेकदा आव्हान देऊन पराभुत केलेलं एक चिरंजीव व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉक्टर शरदकुमार दिक्षीत.
काही क्षणातच यशस्वी शस्त्रक्रीया करण्याची जादुई क्षमता असणा-या जगातील बोटावर मोजण्याईतक्या प्लास्टीक सर्जन्समधील अग्रणी -- डॉक्टर दिक्षीत १९५८ मध्ये शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत गेले आणि नंतर तीकडे स्थायिक झाले. आज ऐशींच्या घरात आहेत. अमेरिकेतील फेअरबॅन्क्स, अलास्का येथे प्लास्टीक सर्जन म्हणुन यशस्वी कारकिर्द गाजवलेले दिक्षीत १९६८ पासून सलग भारतात येत आहेत. आजतायागत १ लाख रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये दुभंगलेले ओठ,तिरळेपणा,वाकडे नाक,काळे डाग यांचा समावेश आहे. सहा महिने अमेरिकेत रहायचे, आणि पाच महिने भारतात येऊन प्लास्टीक सर्जरी शिबिरांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करायच्या, असा त्यांचा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कर्तृत्त्वाच्या या कसोटी वर गेल्या अनेक वर्षापासुन डॉक्टर खरे उतरत आहेत. यासाठी त्यांनी अनेक अग्नीपरिक्षांमधून स्वतःला सिद्ध केलेलं आहे.
प्लास्टीक सर्जन म्हणुन नावलौकीक प्राप्त होत असतांनाच १९७८ मध्ये त्यांचा अपघात झाला  आणि त्यात पक्षाघाताचा झटका येऊन शरिराची उजवी बाजु निकामी झाली. तरिही हिम्मत न हरता डाव्या हातान शस्त्रक्रिया करण्याचं कसब प्राप्त केलं. १९८१ मध्ये उजवा हात काम करायला लागला आणि आशेचा किरण दिसला. पण १९८२ मध्येच स्वरयंत्राचा कर्करोग जडल्याचं निदान झालं. लहानपणापासुन सुरेल गायक असलेल्या डॉक्टरांना अवघे स्वरयंत्रच गमावावे लागले. दैव एवढ्यावरच थांबणार नव्हते. १९८८ मध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातुन सावरत नाही तोच १९९४ मध्ये अहमदाबाद येथे शस्त्रक्रिया करतानाच हृदयविकाराचा दुसरा झटका आला. अमेरिकेत परतून ट्रिपल बायपास सर्जरी करावी लागली. आज केवळ १८ टक्के क्षमतेने त्यांचं हृदय कार्यरत आहे. व्हीलचेअरवर रहावे लागते. ऑक्सिजन सिलेंडर जवळ बाळगावा लागतो. स्वरयंत्रच नसल्यामुळे बोलण्यासाठी वेगळी यंत्रणा ठेवावी लागते. अशा स्थितीतही दिवसातून सलग ९ तास शस्त्रक्रिया करतात. भारतात येऊन मोफत शस्त्रक्रिया करण्याचा वसा अजुनही टाकलेला नाही.
चमत्कार, ईच्छाशक्ती, मनोबल, संघर्ष हे सगळे शद्ब थिटे पडतील असं हे जीवन. डॉक़्टर दिक्षीत मराठी माणुस आहेत. ते विदर्भातले आहेत. नागपुरला शिकलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटावा तेवढा  थोडाच आहे.
वडिल सिताराम दिक्षीत वर्धेला पोस्टमास्तर होते. आपल्या तीन मुलांना आणि तीन मुलींनाही बरोबरीनं शिक्षण दिलं. वर्धेच्या रॅडॉक हायस्कुलमधुन मॅट्रीक्युलेट झाल्यावर मधल्या डॉक्टरलोकांचा पांढराशुभ्र पोषाख, त्यांना मिळणारा पैसा आणि मानसन्मान पाहू जाता डॉक्टर बनण्यात त्यांना रस होता. मात्र मोठी बहिण स्नेहलसुद्धा डॉक्टर होणार होती. घरच्या परिस्थीतीनुसार कुण्यातरी एकाचाच डॉक्टरकीचा खर्च संभव होता. वडिलांनी मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. कारण त्यावेळी शरदकुमार यांना हैद्राबादच्या निजाम कॉलेजतर्फे बि एस्सीसाठी स्कॉलरशिप मिळाली होती. शरदकुमार हैद्राबादला रवाना झाले. मात्र वर्षभरातच स्नेहलचा डॉक्टर होण्याचा मानस बदलला आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये शरदचं डॉक्टरकिचं शिक्षण सुरु झालं. तेव्हाच्या पद्धतीनुसार ग्रॅज्युएट झाल्याबरोबर लगेच रेल्वे विभागात वैद्यकिय अधीकारी म्हणुन नोकरी लागली. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या परिक्षा देणं सुरूच होतं.
सन १९५८ मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्सची परिक्षा शरदकुमार उत्तीर्ण झाले,  आणि नेमके याच दरम्यान अमेरिकन मेडिकल असोशिएशनतर्फे दिली जाणारी चार वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठीही त्यांची निवड झाली. सेनेमध्ये भरती व्हावं, की अमेरिकेत जावं अशी द्वीधा मनस्थीती निर्माण झाली. नोकरी ही कुटुंबाची आर्थीक गरज होती. मात्र अमेरिकेत गेल्यास अनुभवाचं भांडार खुलं होणार होतं. शिवाय थोडेसे का असेना, मानधन मिळणारच होते. त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी सहा हजार रूपयांची गरज होती. शरदकुमारांनी नवी नोकरी पत्करली. सहा महिन्यात पाच हजार रूपये जमवले. एक हजार रूपये उसने घेतले आणि विस्कॉन्सीन गाठले. ल्युथरॉन हॉस्पीटल या संस्थेत रहिवासी डॉक्टर म्हणुन काम करू लागले. याबद्दल त्यांना २५० डॉलर्स मानधन मिळत असे. त्यातील २०० डॉलर्स ते घरी पाठवत असत.
प्लास्टीक सर्जरी! कमी कालावधीत रुग्णावर दर्शनी आणि आयुष्यभरासाठी परिणाम करणारं आणि शास्त्र्! शिवाय यात सर्जनशिलतेला वाव मिळणार होता. डॉक्टरांनी डेट्रॉईटच्या ग्रेस हॉस्पीटलमध्ये प्लास्टीक सर्जरीचा कोर्स केला. मात्र भारतात परतण्याची ईच्छा त्यांना स्वस्थ बसु देइनाशी झाली. देशासाठी काहीतरी करायचं होतं. चाळीस हजार डॉलस मिळकत देणारी डेट्रॉईट क्लीनिकची नोकरीही मग निरर्थक वाटू लागली.
भारतातील डॉक्टर मित्रांनी मात्र शरदकुमारांना अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिला. मुंबईच्या त्यांच्या मित्रांनी भारतात मोफत प्लास्टीक सर्जरीची शिबिरं आयोजीत करण्याचं ठरवलं. १९६८ साली पहिलं शिबिर संपन्न झालं आणि डॉक्टर दिक्षितांची वार्षीक वारी तेव्हापासुन चुकली नाही. एका दिवसात ३० शस्त्रक्रिया या हिशोबाने ते वर्षातून पाच महिन्यांपर्यंत भारतात कार्य करत. शस्त्रक्रियेसाठी लागणारं साहित्य, औषधं, ईंजेक्शन्स, हे  सगळं डॉक़्टर स्वतः आणतात. डॉ.दीक्षित म्हणतात 'काही लोक भजन करून मनःशांती मिळवतात आपण ईश्वरी सेवा समजून हे कार्य करतो '
वैयक्तीक आयुष्यातही त्यांना अनेक आघात सहन करावे लागलेत. १९६१ मध्ये विस्कॉसिनला शिक्षण घेत असतांना त्यांनी विल्डा पिटरसन यांच्याशी केलेला विवाह चार वर्षापर्यंतच टिकला. मुलगा शरद ज्युनिअर आणि मुलगी शारी यांचे पालकत्त्व त्यांच्या आईला मिळाले. मुलं मोठी झालीत. संगिताचा वारसा मुलाने जपलाय. त्याचा स्वतःचा बॅण्ड आहे. शिवाय मुलगीही मॅनॅजमेन्ट गुरू आहे. १९७९ मध्ये त्यांनी तपती बोस या आपल्या पेशंटशी दुसरा विवाह केला. मात्र त्यानंतर डॉक्टरांना स्वरयंत्राचा कॅन्सर जडला आणि त्यांच्यापेक्षा मुळातच वयाने २५ वर्ष लहान असलेल्या पत्नीचे आयुष्य़ सावरल्या जावे म्हणुन त्यांनी तीला घटस्फोट दिला. आज डॉक्टर एकटे राहतात. दररोजची पुजा, स्वतःचे जेवण, कपडे धुण्यापासुन कामे ते स्वतः करतात. चालण्यासाठी भिंतींचा आधार घेतात. मोकळ्या वेळात मराठी गाणी ऐकतात. भगवद्द्गीता वाचतात.
अपघातानंतर पक्षाघातामुळे त्यांची नोकरी गेली. अमेरिकेत त्यांना अपंग गणले जाते. मात्र हिंम्मत न हरता त्यांनी कॉस्मेटीक सर्जरीच्या तीन फेलोशिप मिळवल्या. विश्वविख्यात कॉस्मेटिक सर्जन्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ब्रुकलीनच्या किंग्स काउंटी हॉस्पीटलमध्ये अध्यापकाची नोकरी पत्करली, तर स्वरयंत्राचा कॅन्सर झाला आणि वाचाच गमावावी लागली. काही दिवस ईलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे बोलणा-य़ा डॉक्टरांनी नंतर श्वासनलीकांच्या हालचालींना विषिष्टरित्या नियंत्रीत करून बोलण्याची कला अवगत केली. पाठोपाठ हृदयविकाराचे दोन झटके आले. ट्रीपल बायपास सर्जरी झाली. तज्ञांनी हृदयारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र आता पुन्हा शस्त्रक्रिया करायची नाही, हे डॉक्टरांनी ठरवलं आहे. मृत्यु, वेळ आणि रोगांशी त्यांची लढाई आजही सुरूच आहे.
मोफत सर्जरीचा आपला नियम अखंड सुरू रहावा म्हणुन त्यांनी आपल्या जीवन विम्यावर दिड कोटी डॉलर्सचा ट्रस्ट बनवला आहे. प्रोजेक्ट ईंडिया नावाच्या या प्रकल्पासाठी त्यांनी 'डॉक्टर शरदकुमार दिक्षीत फंड' सुद्धा उभा केला आहे. अमेरिकेतील अनेक डॉक्टरांनी सढळ हाताने मदत केली आहे. पैशाची योग्य गुंतवणुक करून त्यांनी आयुष्यभर आपला सेवायज्ञ सुरू ठेवण्याची सोय करून ठेवली आहे. वैद्यकिय क्षेत्रातील नोबेलसाठी आजवर सहा वेळा त्यांचे नामांकन झाले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिलाय.
मात्र पुरस्कारांची कोणतीच अपेक्षा न ठेवता, ऐवढ्या मोठ्या व्याधींशी झुंजून मिळवलेले आयुष्य यापुढेही गरिबांच्या सेवेसाठीच व्यतीत करण्याच्या वेडाने झपाटलेले हे झाड अजूनही उंचच उंच वाढत आहे.

Tuesday 18 October 2011

तवक्कुल करमान

जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सन्मानाचा मानला गेलेला नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी तीन महिलांना संयुक्तपणे जाहिर झाला. जागतीक महिला दिन साजरा करण्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणुन महिला शक्तीला समर्पीत असलेल्या २०११ या वर्षाची यशस्वी सांगता आता या तीन तेजस्वीनिंना नोबेल शांतता पुरस्कार देऊन होइल. लायबेरियाच्या महिला अध्यक्ष एलेन जॉन्सन सरलीफ, महिला सबलीकरणासाठी लढणाऱ्या लायबेरियाच्याच लेमाह बोवी आणि येमेनच्या पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्त्या तवक्कुल करमान यांना हा पुरस्कार जाहीर झालाय.
पुरस्कारांच्या ईतर दोन मानकर्र्यांपेक्षा तवक्कुल करमान हे नाव विषेश आहे. ३२ वर्षांची तवक्कुल शांततेचं नोबेल मिळवणार्र्यांपैकी सर्वात कमी वयाची महिला आहे. येमेनसारख्या कट्टरतावादी देशात महिलांना बुरख्यातून बाहेर आणण्यासाठी सरकारवर हल्ला चढवणं, निवडणुका लढवणं, पत्रकारिता करणं ही गोष्ट साधी नाही. पण, तवक्कुल करमान झुंजते आहे. लढते आहे. सरकार कधी तिला समज देते तर कधी धमकावते, पण मानवी हक्कांसाठी तिचा आवाज बुलंद आहे. कारण लढाऊ वृत्ती तिच्या रक्तातच आहे.
तवक्कुलने जन्मापासून तीच्या देशावर एकच सत्ता पाहिली आहे  - अली अब्दुल्ला सालेह! हा हुकुमशहा १९७८ पासून तिथं राज्य करतो आहे. आलिशान महाल, महागड्या गाड्या, हजारो कोटी रुपयांचा बँक बॅलन्स, स्वत:ची खासगी विमाने उडविणारे सत्ताधीश आणि खपाटीला गेलेले पोट घेऊन चार दाण्यांसाठी रस्तोरस्ती हिंडणारी सामान्य जनता हे अरब जगतातील नेहमीचंच चित्र. लहानपणापासून ती हेच बघत आली आहे. तवक्कुलचे वडिल अब्देल सलाम करमान अल मेखलाफी येमेनमधील वरिष्ट कायदातज्ञ होते. सालेहच्या राजवटीत काही काळ कायदामंत्री म्हणुन काम करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली होती. मात्र कायद्याची वरचेवर होणारी गळचेपी पाहून त्यांनी हे पद सोडलं. दक्षीण येमेन मधील तैझ प्रांतातील आपल्या कसब्यापुरतं राजकारण करण्यातच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं. मात्र आपल्या मुलांना मात्र मानवाधिकार आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी आवर्जुन शिकवलं. मोठा मुलगा तारिक हा संवेदनशिल कवी झाला. मुलगी तवक्कुलने मात्र हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस दाखवलं.
अरबी भाषेत तवक्कुल म्हणजे ईश्वराप्रती असलेली निष्टा, विश्वास! अगदी हाच विश्वास येमेनमधील महिलांनी आणि युवकांनी तीच्यावर टाकला. या वर्षाच्या सुरवातीला झालेल्या प्रचंड जन  आंदोलनानंतर सालेह यांनी पायऊतार होण्याची तयारी दाखवली, यातच तवक्कुलचं यश आहे.
खरं पाहिलं तर अरबी जगतात सध्या बदलाचे वारे वाह्त आहेत. बहारीन, येमेन आणि लीबिया या तीन देशांतील जनतेची प्रस्थापित सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र ईतर अरब देशातील रक्ताळलेल्या आंदोलनापेक्षा येमेनमधील आंदोलनाला मानवी मुल्य आणि शांततेची बैठक प्राप्त झाली आहे. येमेनमधील आंदोलनाला ट्युनिशिया आणि इजिप्तप्रमाणे हिंसेचे गालबोट अद्याप लागलेले नाही. याचं श्रेय तवक्कुलच्या कल्पकतेला जातं. सरकारविरोधात घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या हातात असलेले बॅनर, डोक्यावर बांधलेले हेडबँड्स जाणीवपूर्वक गुलाबी रंगाची निवडण्यात आली आहेत. सालेह यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. 'सालेह यांनी प्रमाणिकपणे राजकीय सुधारणा राबवाव्यात अन्यथा आम्ही त्यांचे सरकार उलथवून लावू,' अशी घोषणा विरोधी पक्षाने केली आहे. मुळात पत्रकार असलेली तवक्कुल अल ईस्लाहविरोधी पक्षाची सदस्यही आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बाळकडू तवक्कुलला वडिलांकडून मिळाले आहे. त्या स्वातंत्र्याचा संकोच येमेनमध्ये होवू नये ही तिची मागणी आहे. गेली अनेक वर्षे ती लढते आहे. तीची मागणी साधी आहे. एक वर्तमानपत्र आणि रेडिओ स्टेशन सुरू करायचे आहे. पण सरकार काही परवानगी देत नाही. लडाई जारी है!
अरब राष्ट्रांतील उठावांत महिला आणि इस्लाम यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय तवक्कुलच्या नेतृत्त्वाखाली जनतेने केलेल्या आंदोलनातून आला. येमेनसारख्या रूढीवादी विचारांच्या देशांत महिलांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून उठावात सहभाग घेतला. ईस्लामने महिलांसाठी ठरवलेला पोषाख म्हणजे 'नकाब' हा त्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य मारण्यासाठी बनवलेलं अवजार नाही, हे तीनं जनमानसांवर ठसवलं. नकाब काळाच असला पाहिजे, हा अलीखीत नियमही तीने आधी स्वतःपुरता आणि नंतर अनेकांसाठी कायमचा बंद केला. त्यापेक्षा रंगिबेरंगी रूमाल वापरावे, चेहरा लपवण्यापेक्षा कोरड्या हवेपासून त्याचं संरक्षण म्हणुन हे रूमाल बांधावे असा विचार येमेनमध्ये मांडणं म्हणजे मोठंच हिमतीचं काम होतं. याच्या परिणामस्वरूप २०१० मध्ये एका रूढीवादी महिलेनेच तिच्यावर जांभियाने जीवघेणा हल्लाही केला होता. त्यातून तवक्कूल थोडक्यात बचावली. लडाई फिर भी जारी है.
२००४ मध्ये तवक्कूलने पहिल्यांदा नकाब न घालता एक पत्रकारपरिषद संबोधीत केली, आणि तीचं नाव चर्चेत आलं. २००५ मध्ये 'वुमज जर्नस्लिस्टस विदाउट चेन्स' ही संघटना स्थापन करून तीने स्वतंत्र पत्रकारिता करू ईच्छीणार्र्या महिलांचं संघठन सुरू केलं. येमेनमध्ये एस एम एस द्वारे बातम्या देणार्र्या न्युज सर्व्व्हीसेस वर तेव्हा बंदी होती. या बंदिच्या विरोधात तीने आवाज उठवला. सरकारने ईतर सर्व न्युज सर्वीसेसला येमेनमध्ये कार्य करण्याची परवानगी दिली, मात्र तवक्कुलच्या 'वुमज जर्नस्लिस्टस विदाउट चेन्स' द्वारे संचालीत सर्व्हीसवर बंदी कायम ठेवली. संघर्ष मग अधीकच तिव्र झाला. २००७ मध्ये तर येमेन सरकारने पत्रकारीतेची केलेली गळचेपी यावर एक भलामोठा अभ्यासच तीने प्रकाशित केला. २००७ पासून ते आजतागायत येमेनची राजधानी सना येथीच 'चेंज स्क्वेअर' मध्ये कित्येकदा तरी तीने धरणे  आंदोलनं, शांततापुर्ण निदर्शनं आणि सरकारविरोधी घोषणांचे फलक दाखवले आहेत. लडाई अभी भी जारी है.
महिला हक्क आणि पत्रकारीते बरोबरच येमेनच्या युवकांना संघटीत करून  आंदोलनासाठी सज्ज करण्यामागे तवक्कुलचं कर्तृत्त्व मोठं आहे. येमेनमध्ये ४६ टक्के लोकसंख्या युवकांची आहे. देशात अल्-कायदाचे अस्तित्व वाढत आहे. रायफल मिरविणे ही येथील एक फॅशन होऊन बसली आहे. मानवी हक्क आणि स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. या सगळया घटनांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. नेहमीप्रमाणेच भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरीबी हे अरब जगतातील शाप येमेनच्याही माथ्यावर आहेतच. या सगळ्या दुष्टचक्रातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी तवक्कुल झटते आहे. स्वतः तीन मुलांची आई असल्यामुळे युवा पिढीचे हित कशात आहे हे ती जाणते.
२००७ पासून सुरू झालेल्या या जन आंदोलनाने जानेवारी २०११ मध्ये ईजिप्त आणि टयुनिशियातील 'जास्मीन जनसंघर्षापासून' (जन आंदोलनाला दिलेलं ट्युनिशिअन नाव) प्रेरणा घेऊन  आक्रामक रूप धारण केलं. २४ जानेवारीला तीला अटक करण्यात आली. कुठल्याही फौजदारी आरोपपत्राशिवाय तीन दिवस साखळदंडामध्ये बांधून ठेवण्यात आलं. मात्र २९ जानेवारीला सुटका झाल्याबरोबर लगेच ३ फेब्रुवारीला 'डे ऑफ रेज' (संताप दिवस) पाळायचं आवाहन करून तवक्कुलने पुन्हा सरकार विरोधात रणशिंग फुंकलेच. यात तवक्कुलचे पती महंमद अल निहमीचाही सहभाग होता, हे उल्लेखनीय. या दरम्यान गार्डिअन, न्यु यॉर्क टाईम्स सारख्या वर्तमानपत्रांना ती संपादकीय लिहत राहिली. त्या माध्यमातून जगभर तीचा आवाज पोचत राहिला. त्यामुळे सरकारवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव येत गेला. यानंतर अनेकदा  अटक आणि सुटकेचं सत्र झालं. जीवाने मारण्याच्या धमक्याही आल्या. मात्र लडाई जारी रही. नुकतंच सालेह यांनी पायऊतार होण्याची तयारी दर्शवली आहे.
आजुबाजुच्या अरबस्थानात रक्तपात होत असतांना येमेन मध्ये शांततेच्या मार्गाने क्रांती घडवून आणण्याचं जगावेगळं कार्य केल्याबद्दल मिळालेला नोबेल पुरस्कार हा येमेनमधील तरुणांच्या क्रांतीला आणि तेथील जनतेला अर्पण करीत असल्याची प्रतिक्रिया करमान यांनी दिली, तेव्हा प्रत्येक येमेनियन युवकाच्या डोळ्यात नोबेल मिळाल्याचं समाधान झळकलं असेल.

Saturday 15 October 2011

फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग

मुलभुत गरजांच्या अन्न-वस्त्र-निवारा या त्रयीप्रमाणे वीज -ईंटरनेट-फेसबुक हे त्रिकुटही आजच्या युवा पिढीच्या जीवनाचा अविभ्याज्य भाग झालेले आहे. इतकं की फेसबुकवर एखादा नसेल तर त्याचं भौतिक अस्तित्व नाकारलं जाईल की काय, अशी परिस्थिती आहे. या दशकातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कच्या या जाळ्यात अवघं विश्व आज गुंतलेलं आहे. आबालवृद्धांना अक्षरशः वेड लावणा-या या फेसबुकचे आजमितीला ८५ कोटीहून अधिक ऍक्टीव युजर्स आहेत यातच काय ते सगळं आलं.
फेसबुकचा सस्थापक मार्क झुकरबर्गला वयाची तिशी गाठायला अजुन तीन वर्षाहून अधीक काळ शिल्लक असतांना १७५० अब्ज डॉलर्सच्या कुबेरखजीन्याचा मालक बनवण्याचा चमत्कार या सोशल नेटवर्कींग टुल ने करून दाखवला आहे. मात्र झुकरबर्गला पैश्याचं काही अप्रूप नाही. तो सॉफ्टवेअर्सचा दिवाना आहे. कंप्युटर दिसला की काहीतरी  उचापत्या करत राहण्याचं त्याला वेड आहे. आणि वेडी माणसंच ईतीहास घडवतात.
आज मार्क झुकरबर्ग अशा १७ लोकांमध्ये गणला जातो जे वॉरेन बफेट आणि बिल गेटसकडून सुरू करण्यात आलेल्या क्लबचे सदस्य आहेत. हा क्लब अमेरिकेतील सर्वात श्रीमंत लोकांना आपली संपत्ती दान करण्याची प्रेरणा देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. झुगरबर्ग हा या क्लबमधील वयाने सर्वात लहान सदस्य आहे. शिवाय टाईम नियतकालिकाने त्यांचा सन्मानाचा 'पर्सन ऑफ द ईयर' पुरस्कार २०१० मध्येच जाहिर केलाय.  वयाच्या अवघ्या पंचविशीत ईतकंसगळं प्राप्त करणारा झुकरबर्ग नक्की आहे तरी कोण?
लंडनजवळच्या व्हाईट प्लेन्स या शहराळलेल्या भागात राहणारे मानसोपचार तज्ञ कॅरिन आणि डेन्टीस्ट डॉ एडवर्ड झुकरबर्ग म्हणजे मार्कचे आईवडिल. या दाम्पत्याच्या पोटी आलेल्या चार अपत्यांपैकी मार्क हा जेष्ट मुलगा. लहानपणापासुनच तो कमालीचा बुद्धिमान. जगाकडे पाहण्याचा त्याचा स्वत:चा एक दृष्टिकोन होता. गणित शास्त्र या विषयांत उत्तम गुण मिळवणार्र्या मार्कने ईंग्रजीबरोबरच फ्रेंच, हिब्रु, लॅटिन आणि एन्शंट ग्रिक भाषांवरही शालेय जीवनातच प्रभुत्त्व मिळवलं. महाकाव्य 'ईलियड' मधील ऑळीच्या ओळी घडघड म्हणुन दाखवणारा त्याच्या बॅचमध्ये फक्त तोच असावा! 
शाळेत अभ्यासासाठी कंप्युटर वापरतांना 'अमुक सॉफ्टवेअर कसं काम करतं?' हा प्रश्न मार्कला नेहमी सतावायचा. साधा कंप्युटर गेम खेळतांना देखील त्या गेमच्या मागचं 'मॅकॅनिजम' काय हे विचारून तो वडिलांना त्रस्त करून सोडत असे. वडिलांनी त्याला घरच्या घरी अटारी बेसिक प्रोग्रामिंग चा कोर्स शिकवला. पण तेवढं पुरेसं नव्हतं. शेवटी वडिलांनी एका सॉफ्टवेअर डेवलपरची पार्ट टाईम शिक्षक म्हणुन नियुक्ती केली. डेव्हिड न्युमॅन त्यांचं नाव. शिक्षक महोदय तर विद्यार्थ्याची हुशारी पाहून चकितच झाले. न्युमॅन आणि मार्क यांनी मिळून झ्युकनेट नावाचं एक ईंजिन तयार केलं. आजच्या विण्डोज मॅसॅंजरचा तो पुर्वज म्हणता येइल आणि ही घटना म्हणजे फेसबुकची  मुहुर्तमेढ!
हायस्कुलमध्ये असतांना त्याने 'सिनेप्से मिडिया प्लेयर' हा मिडिया प्लेयर बनवला आणि अमेरिका ऑनलाईन या कंपनिला तो ईतका आवडला की प्रॉडक्ट विकत घेतानाच मार्कला आपल्या कंपनित नोकरी देण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. मात्र मार्कला संगणकशास्त्रात डिग्री घ्यायची होती, त्यामुळे नोकरी नाकारून त्याने हॉवर्ड विद्यापिठात प्रवेश घेतला.
हॉवर्ड विद्यापिठात संगणकशास्त्र शिकत असतांना मार्कच्या डोक्यात रोज नवनव्या कल्पना येत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ना काही उचापत्या कराव्या आणि मग त्यात अपयश यावे, हा रोजचाच कित्ता झाला होता. अश्यातच फेसमॅशची कल्पना मार्कला सुचली. हे फेसमॅश म्हणजे फेसबुकची आजोबा म्हणता येतील. हॉवर्ड विद्यापिठातील विद्यार्थांचा फोटो आणि माहिती या साईटवर मिळू लागली. फेसमॅशला पहिल्या तासाभरातच ४५० च्या वर लोकांनी भेट दिली. मात्र स्वतः शिक्षण घेत असलेल्या हॉवर्ड विद्यापिठाचीच वेबसाईट हॅक करून मार्कने त्यातील बरीच माहिती फेसमॅशवर टाकली होती. विद्यापिठाच्या दृष्टीने हा गुन्हा गंभीर होता. पदवीच्या वर्गात शिकत असतांनाच त्याच्यावर कारवाई म्हणुन विद्यापिठाने त्याला निष्कासित केलं.
मात्र मार्कचा हॅकिगमागचा उद्देश वाईट नव्हता हे कळल्यानंतर त्यांनी त्याला परत विद्यापिठात घेतलं. दरम्यान  त्याचे वर्गमित्र त्याचे सिनिअर्स झाले होते. क्रिस ह्युजेस, डस्टीन मॉर्कॉविझ आणि ईडियेरो सॅव्हॅरिन या तीन मित्रांशी संपर्कात रहाता यावे म्हणुन त्याने एक सॉफ्टवेअर बनवायचं ठरवलं. द फेसबुक सुरू झालं! तारीख होती चार फेब्रुवारी २००४!
फेसबुकची वेबसाईट जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनच तिला उदंड प्रतिसाद मिळू लागला. दर दिवशी लाखालाखांनी नवनवे सदस्य नोंदले जात होते. मार्कच्या कल्पकतेच्या कौतुकारत्या जगभर ओवाळल्या जात होत्या. पण त्यामुळे त्याच्या उत्पन्नात काही भर पडत नव्हती. म्हणजे फेसबुकमधून पैसे कसे मिळवायचे हे काही त्याला कळत नव्हतं. हे उत्पन्न वाढावं यासाठी वेगवेगळय़ा मार्गानं त्याचे प्रयत्न सुरू होते. पण लक्ष्मी काही प्रसन्न होताना दिसत नव्हती.
याच काळात एका मित्राच्या घरी डिसेंबरात नाताळच्या पार्टीला गेलेला असताना मार्कचा परिचय शेरील सँडबर्ग हिच्याशी झाला. ही २००७ सालातली गोष्ट. शेरील त्या वेळी बलाढय़ अशा गुगलच्या ऑनलाईन जाहिरात विभागाची उपाध्यक्ष होती. वयानंही मार्कपेक्षा साधारण दुप्पट. गलेलठ्ठ पगार. पदानं नाही तरी कर्तृत्वानंही मोठी होती मार्कपेक्षा. पण तिथे गप्पा मारताना मार्कनं तिला विचारलं, माझ्या कंपनीत येशील का? वर तो म्हणालादेखील, काय देऊ शकीन हे माहीत नाही, माझी कंपनी कुठे जाईल ते माहीत नाही, किती यशस्वी होऊ ते सांगता येत नाही.पण आव्हान मात्र आहे.
त्याच्यानंतर जवळपास महिनाभर या दोघांत चर्चा झाली. त्याची फलनिष्पत्ती इतकीच की शेरील फेसबुकमध्ये येते म्हणाली. तिला नवं आव्हान आवडलं. शेरील फेसबुकमध्ये दाखल झाली. मार्कने तिला पद दिलं, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. तोपर्यंत २००८ सालचा मार्च महिना उजाडला होता. आज शेरील सँडबर्ग ही फेसबुकमागच्या भव्य यशामागचा सोज्वळ चेहरा आहे.
शेरीलच्या येण्यानंतर फेसबुक कंपनीचे भागभांडवल अचानक वधारुन ते ७० अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहचले. मार्कला तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील तिसऱया क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान मिळाला. सध्या मायक्रोसॉप्टचे बिल गेटस व ओरॉकलचे लॉरी इलिसन हेच फक्त मार्कच्या वर आहेत.
फेसबुक आता सामान्यांच्या जीवनाचा भाग झाला आणि त्याची प्रत्येक छोटी छोटी गोष्टही महत्त्वाची ठरू लागली. ईतक्या मोठ्या वेबसाईटचे साईन-अप पेजपासून ते लोगोपर्यंत सर्व काही निळं. मोबाईल अप्लिकेशन आणि पॉपअप होणारे डायलॉग विंडोही निळेच ! असं का? लोकांना प्रश्न पडला. उत्तर सोप्पं आहे. मार्क हा रंगांधळा आहे, पण त्याला निळा रंग स्पष्ट दिसतो. अन्य रंगच दिसत नसल्यानं, त्यानं फेसबुकचं डिझाईन निळ्या रंगातच असावं, असा आग्रह धरला होता.
रंगांचा मार्कवर काहीच परिणाम होत नाही. निसर्गातील रंगांची उधळण त्याला समजत नाही. परंतु, आकाशाचा निळा रंग त्याला सहज दिसतो. काही वर्षांपूर्वी त्यानं स्वतःचीच रंगांची ऑनलाईन टेस्ट घेतली आणि त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला लाल आणि हिरवा रंगच दिसत नाही. निळा रंग हा त्याच्यापुरता उत्कृष्ट आणि एकमेव रंग असल्यानं, निळा रंगच निवडला.
रंग कुठलाही का असे ना! हजारो लोकांशी मैत्री करण्यासाठी फक्त एक कम्प्युटर पुरेसा आहे, अशी संकल्पना प्रत्यक्षात आणणारा मार्क फेसबुकचा हिरो ठरलाय.

Saturday 8 October 2011

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

ज्येष्ट संगीतकार पंडित यशवंत देव यांना यंदाचा सन्मानाचा लता मंगेशकर पुरस्कार लतादिदिच्या वाढदिवशी २८ सप्टेबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला,  आणि या पुरस्काराच्या मानकर्र्यांच्या यादित आणखी एक मोलाची भर पडली. प्रत्यक्ष सरस्वतीच्या नावाने दिला जाणारा, महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला हा पुरस्कार नेहमीच सगळ्यांसाठी श्रद्धेचा आणि सन्मानाचा विषय राहिलेला आहे. मात्र महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्त्सवाच्या निमित्ताने मागल्या वर्षी (२०१० मध्ये) लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार मिळाला, तेव्हाचा मणिकांचन योग संगीतरसिकांच्या कायम स्मरणात राहील.
आज वयाच्या अठ्ठाहात्तराव्या वर्षीदेखील आवाजातील त्याच वैषिष्ट्यपुर्ण ठसक्यासह लावणी गाण्याचं सामर्थ्य सरस्वतीने फक्त सुलोचनादिदिंनाच बहाल केलेलं आहे. केवळ त्यांच्या पार्श्वगायनाने अनेक मराठी चित्रपटांना मोठं केलं. त्यांच्या घरंदाज व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव आणि संगीततपश्चर्येंचं सामर्थ्यच म्हणावं लागेल की त्यांनी गायलेली उडत्या शब्दांची लावणीदेखील कधीच सुमार वाटली नाही. श्रृंगारीक, ठसकेबाज लावणी सादर करताना त्यांनी डोक्यावरचा पदर कधी ढळू दिला नाही. शालीनता जपली. लोकसंगीताची मूल्ये जोपासताना त्यांनी आपली संस्कृतीही जपली. लावणीला 'तमाशा' तून बाहेर काढून सर्वसमावेशक बनवण्याचं श्रेय सुलोचनाबाईंच्या गाण्याला जातं.
१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचनाजींचा जन्म झाला. माहेरचे त्यांचे नाव होते सुलोचना कदम. मुंबईतील चाळ संस्कृतीत त्यांचे बालपण गेले. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातुन सुलोचना चव्हाण यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. मुंबई तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतांची संयुक्त राजधानी होती. त्यामुळे बाळमेळ्यात श्रीकृष्णाची भुमिका करणा-या लहानग्या सुलोचनाला याच वेळी गरब्यामध्ये कृष्णाची भूमिका करायला लागायची. पूढे गुजराती रंगभूमीवर ती काम करु लागली. मग उर्दू शिकुन 'लैला मजनू' मध्ये छोटी मजनू बनली. त्यानंतर तामीळ, पंजाबी सिनेमांमध्येही कामें केली. या दरम्यान मराठी चौथीपर्यंत शिक्षणही झालं. मराठीचं वाचन खूप होतं. व्यक्तीमत्त्व घडत गेलं.
सुलोचनाजींची मोठी बहिण स्वतः कलाक्षेत्रात काम करत नसे पण त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायची. लहान बहिणीने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. याच प्रोत्साहनातुन त्यांची गायिका होण्याची बीजं रोवली गेली. मात्र कोणतंही शास्त्रीय प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं. त्याकाळात रियाझाचं एकच माध्यम होतं, आणि ते म्हणजे -- ग्रामोफोन रेकॉर्ड!
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. तासनतास रेकॉर्डस ऐकणार्र्या, सतत गाणी गुणगुणणार्र्या सुलोचनाला त्यांनी संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे नेलं. "कृष्ण सुदामा" या हिंदी चित्रपटाचं काम तेव्हा सुरू होतं. एक छोटासा अंतरा गाण्याची संधी मिळाली. वय होतं अवघं नऊ वर्षे.
या नंतर त्यांनी मास्टर भगवानदादांच्या अनेक चित्रपटात पार्श्वगायन केलं. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. करीयरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत "भोजपुरी रामायण" त्या गायल्या. मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषेमध्ये भजन, गझल असे विविध प्रकार देखील हाताळले.
त्यांचे गझल गायन ऐकुन बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद सुलोचनाजींना दिली होती. सुलोचनाजींचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकुन तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र आपण सुलोचनाजींच्या लावण्या जेंव्हा ऐकत असतो त्यावेळेस संगीतातील त्यांची इतर मजल थोडी दुर्लक्षित होते.
त्यांनी पहिली लावणी गायली ती आचार्य अत्रे यांच्या "हिच माझी लक्ष्मी" या चित्रपटात. संगीतकार होते वसंत देसाई आणि लावणी चित्रीत झाले होती हंसा वाडकर यांच्यावर. या गाण्याने सुलोचनाजींच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लावले.
१९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गाण्याचं काम त्यांना मिळालं. या चित्रपटाचे संगित दिग्दर्शक होते "एस चव्हाण" म्हणजेच श्यामराव चव्हाण. पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाजींचे लग्न झाले आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. लग्नानंतर मात्र त्यांना मागे वळून पहावेच लागले नाही. शामराव चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना अमुक शब्द कसा उच्चारायचा किंवा कुठल्या शब्दावर जोर द्यायचा त्याचे रितसर शिक्षण दिलं. त्यामुळे त्यांच्या लावणीत सुधारणा झाली. यजमान हेच त्यांचे गुरु होते.
यादरम्यानच "रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलुन गेले. त्यातुनच खर्‍या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणुन सुलोचना चव्हाण पुढे आल्या.
मग एकामागोमाग एक लावण्या मिळत गेल्या. खेळताना रंग बाईचा होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नकाअशा एकापेक्षा एक सरस, ठसकेबाज लावण्या सुलोचनाजींनी गायल्या. त्यांना पहिली लावणी गायला देणारे आचार्य अत्रे यांनीच मग लावणीसम्राज्ञीहा किताब बहाल केला. 
मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटातुन त्यांनी लावणी आपल्या ठसकेबाज स्वरात सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका, खटका देण्याचे काम सुलोचनाजींइतक कुणीच उत्तम करू शकलं नाही.
लोककलावंतांप्रती असलेली आस्था आणि जनसामान्यांशी जुळलेली नाळ ही सुलोचनाबाईंच्या यशाची वेगळी बाजु म्हणावी लागेल. त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पैसाही मिळाला. कलाकार म्हणून नावलौकीक मिळाला. मात्र देवावर असलेली त्यांची श्रद्धा आणि समाजऋण फेडण्यासाठी सतत तत्पर त्यांची जागरूक वृत्ती ही त्यांची खासियत. ज्या कलेची आयुष्यभर सेवा केली त्या कलेलाच नवी ओळख देण्याचं भाग्य नटेश्वर काही मोजक्या कलावंतांनाच देतो. सुलोचनाजींनी लावणीला सन्मान मिळवून दिला. मंदिर, धार्मिक वा सामाजिक संस्था आपल्या कार्यासाठी निधी उभारण्यासाठी लावणीचे कार्यक्रम करण्याकरता त्यांना निमंत्रण देउ लागल्या यातच सर्व काय ते आले. सुलोचनाजींनी सुद्धा केवळ कलाकारांच्या जाण्या-येण्याचे प्रवासभाडे फक्त घेउन उर्वरित रक्कम कार्यासाठी दान करावी, कार्यक्रम तसंच पुरस्कारांच्या मिळणाऱ्या पैशांपैकी बराच पैसा गरीबांपर्यंत पोहोचवावा, लोककलेच्या उत्थानासाठी झटावं या सर्वांमुळे त्यांची एक वेगळी प्रतीमा जनमानसात उभी झाली.
अरुण कचरे या लोककलावंताने जेव्हा कुणाल कॅसॅटस या कंपनिची निर्मीती करून महाराष्ट्रातील लोककलांना 'ग्लोबलाईज' करण्याचा विडा उचलला, तेव्हा त्याला देखील आठवण झाली ती सुलोचना चव्हाण यांचीच! अरूण कचरेने अडत-अडखळत, थरथर कापत कसंबशी मांढरदेवीची गाणी गाण्याची विनंती सुलोचनादिदिंना केली. कलेच्या प्रेमापोटी आणि देवीच्या भक्तीसाठी सुलोचनाजींनी ती गाणी कुठलंही मानधन न घेता गायली. यानंतर दहा वर्षापर्यंत कुणाल कॅसॅटस हा सामान्य जनांच्या गळ्यातला ताईत बनला. 'डोकं फिरलंया' पासुन ते 'खंडेरायाच्या लग्नाला' पर्यंत सगळी गाणी आबालवृद्धांची पहिली पसंती झाली.
'माझं गाणं माझं जगणं' हे त्यांचं आत्मचरित्र वाचणं म्हणजे तर एक रोमांचकारी अनुभव आहे. लावणी या प्रकाराला त्यांच्या गायनाने मिळवून दिलेली मान्यता आणि यामुळेच जनमानसांच्या ह्रदयात मिळालेले स्थान त्यांना मराठी कलेच्या क्षितीजावरचे तेजस्वी नक्षत्रं बनवतात.