Wednesday 30 November 2011

नृत्यदिग्दर्शनातील 'सुबल' सरकार

कलकत्त्यावरून एक मुलगा सुमारे साठ वर्षापुर्वी मुंबईत आला. नृत्याची त्याला आवड होती, कलाकार बनण्याची ईच्छाही! मुंबई नगरीने त्याची परिक्षा घेणं सुरू केलं.  फेरीवाला, फळविक्रेता बनुन त्याने रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. मात्र हार मानली नाही. कारण त्याच्या नावातच 'बल' होतं.
हाल-अपेष्टा सोसुन आलेलं मनोबल, कलेची तपस्या करून आलेलं तपोबल, आणि ईश्वरावरील अतुट श्रद्धेमुळे आलेलं आत्मबल या सगळ्यांनी त्याचं 'सुबल' हे नाव सार्थक केलं. एक दिवस सुबल हा मुलगा सरकार बनला! मराठी चित्रपटातील आजवरचा सगळ्यांत मोठा नृत्यदिग्दर्शक! सुबल सरकार!  त्यांच्या जाण्याने पदन्यासाचे पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
सुबलदांचं आयुष्य म्हणजे एक चित्रपटच. अनेक अतर्क्‍य गोष्टी त्यात आहेत. त्याला असंख्य वळणं आहेत. बांग्लादेशातल्या कोणत्या खेड्यात नेमका कुठल्या दिवशी त्यांचा जन्म झाला हे त्यांच्याही लक्षात नव्हतंच कधी. बहुधा १९३५ साली जन्म झाला असावा. देशाची फाळणी झाली आणि पुर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मधून त्यांना निर्वासित म्हणुन भारतात यावं लागलं. घरची परिस्थीती फारच बेताची होती, त्यातही आता बेघर व्हायची वेळ आली. कलकत्यातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये दिवस कंठतांना आपल्या खेड्यातील घरात केलेला नृत्याचा सराव नऊ दहा वर्षाच्या सुबलला खुप आठवत असे. नृत्याची आवड कशी लागली हे माहिती नाही, मात्र नृत्याशिवाय आणखी कश्याचीही आवड लागलीच नाही, हे देखील तेवढंच खरं.
जवळपास दहा वर्षं वेगवेगळ्या "कॅंप'मध्ये राहून काढली. हे जिणं शेवटी असह्य झालं आणि एके दिवशी आई-वडिलांच्या पाया पडून "थोडंसं फिरून येतो" असं सांगुन थेट रेल्वे स्टेशन गाठलं. मुंबईची गाडी पकडली.
त्या काळात मुंबईत पळून येणाऱ्या बंगाली मुलांना हेरून त्यांना कामाला लावण्यासाठी एक "टीम'च कार्यरत होती. दुसऱ्याच दिवसापासून त्यांना फेरीवाल्याचं काम मिळालं. एखाद्या स्टुडिओसमोर उभे राहून फळं विकायची! जातायेता कुणी दिसतंय का?, ते पहायला. कलाकारांना आपल्याच तो-यात जाता-येतांना पाहून सोळा सतरा वर्षाचं ते शिडशिडित पोर हरखुन जायचं. त्याला वाटायचं की आपणच या सगळ्यांना पाहतोय. मात्र त्याच्याकडेही कुणीतरी पहात होतं.
एक दिवस व्हीटी स्टेशनबाहेर एके दिवशी चिकू विकत बसला असतांना एक गाडी समोर येऊन थांबली. त्यातून एक उंच, हॅट घातलेला माणूस बाहेर पडला. "चिकू कैसे दिया?' हा त्याचा प्रश्‍न. "छह आना डझन।" "घर से भागके आया क्‍या ?' त्या व्यक्तीचा दुसरा प्रश्‍न. मुलाने होकारार्थी मान डोलावली. तेव्हा या व्यक्तीनं त्याला चिकूच्या टोपली सकट गाडीत बसायला लावलं आणि आपल्या घरी आणलं. हे सर्व घडेपर्यंत आपण ज्या व्यक्तीशी बोलतो आहोत, ती व्यक्ती म्हणजे सचिन शंकर आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती. या काळातील कलासृष्टी गाजवणारा नृत्यदिग्दर्शक! सचिन शंकर म्हणजे कलाक्षेत्रात येण्याचा महामार्गच! नशिब फळफळलं आणि हा महामार्ग सुबलला मिळाला.
सचिनदांच्या किचनमध्ये सुबलची राहण्याची व्यवस्था झाली. त्यांच्या सहवासात कलाक्षेत्राचा परिचय जवळून होत गेला. खरं तर ते काही सिनेमातले हीरो नव्हते; पण ते रस्त्यावर उतरले की सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे वळून पाहायचे. तेव्हा नृत्यदिग्दर्शक बनण्यामागचं ग्लॅमर सुबलच्या लक्षात आलं. त्यांच्या अनेक गोष्टींची नक्कल करायला मग त्यानं सुरवात केली. पांढरे कपडे हा देखील त्यातलाच एक भाग. पुढे ही सुबलदांची ओळख बनली. पांढरा पायजमा, पांढरा कुर्ता !
सचिनदांच्या हाताखाली नृत्याचे धडे गिरवतांना त्यांच्यासारखाच दिसणारा, तसेच कपडे घालणारा मुलगा कधी  'एस.एस.नं. २' बनला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. 'बॅले' ही तेव्हा सचिन शंकर यांची खासियत होती. त्यांच्या बॅले ट्रुपमध्ये डान्सरचं, आणि नंतर सहायक नृत्यदिग्दर्शकाचं काम सुबलदांना मिळालं. देशभर दौरे झाले. विदेशात जाण्याचीही संधी मिळाली. देशात फिरत असतांना सामान्य माणसाचे लोकनृत्यावर जास्त प्रेम असते ही जाणीव त्यांना झाली. मनात आपोआपच लोकनृत्यप्रकारांप्रती आकर्षण निर्माण झालं.
हेलसिंकीच्या दौऱ्यावर असतांना एक दिवस कोळी नृत्य करायचं होतं. त्यासाठी एक जण त्यांच्याकडे लुंगी मागायला आला. लुंगी दिल्यावर त्यानं टोपी मागितली. मग बनियन मागितलं. त्याच्या मागण्या काही संपत नव्हत्या. आता आणखी मी काय देणं बाकी आहे, असे भाव चेहऱ्यावर आणुन सुबलदांनी एक रागीट लुक त्या व्यक्तीला दिला आणि तो माणुस पसार झाला. कार्यक्रम सुरू झाला. सुबलदांनी दिलेल्या कपड्यातल्या त्या माणसाने "होशियार' असा नारा दिला आणि नंतर अख्खं स्टेडियम जागच्या जागी उभं राहिलं. सात-आठ मिनिटं हा माणूस गायला आणि अवघा आसमंत त्यानं भारून टाकला. हा माणूस दुसरातिसरा कोणी नसून होते ते शाहीर अमर शेख!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुबलदांना महान व्यक्तिमत्त्वं भेटत गेली, त्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अमर शेख. त्यांच्या माध्यमातून सुबलदांना सामान्य जनतेचं जीणं जाणण्याची संधी मिळणार होती. त्यांच्याकरीता पुर्णतः  अपरिचीत अश्या महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी त्यांचा परिचय होणार होता. बंगाली-हिंदीत बोलणारे सुबल सरकार  आता अस्खलीत मराठीत बोलणारे 'दद्दू' होणार होते. यासाठी सचिन शंकर यांची साथ मात्र सोडावी लागणार होती.
"आप का पैर मेरे हक का पैर है । जब मैं चाहूँ तब नतमस्तक हो जाऊँगा ।" या शब्दात त्यांनी आपल्या पित्यासमान असलेल्या गुरूचा निरोप घेतला आणि शाहीरांकडे काम सुरू केलं. सचिनदांकडे त्यांना मिळायचे चाळीस रूपये! तर शाहिरांच्या फडात मिळायचे चार रूपये! मात्र हा 'घाट्याचा सौदा' त्यांनी सहर्ष स्विकारला.
शाहिरांमुळे सुबलदा अख्खा महाराष्ट्र पालथा घालू शकले. कॉ. डांगे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे अशा मोठमोठ्या माणसांचा सहवास त्यांना मिळाला. गावोगावी दौरा केल्यामुळेच त्यांना मराठी माणसाची नस ओळखता आली. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा होता. सुबलदां केवळ याच लढ्यात नव्हे, तर गिरणी कामगारांच्या लढ्यात धरणे, मोर्चा, उपोषण अशा विविध अंगाने ते सहभागी झाले होते. महाराष्ट्रावर त्यांनी भरभरून प्रेम केलं. आणि महाराष्ट्रानेही त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं.
एके ठिकाणी स्थिर राहणं हा सुबलदांचा स्वभाव नव्हता. म्हणूनच अमर शेख यांच्याबरोबर काम करून झाल्यानंतर स्वतःची "सुबल सरकार डान्स युनिट' ही संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे "माझं गाव' हा बॅले सादर केला जायचा; पण मनानं कलावंत असणाऱ्या सुबलदांना आर्थिक गणितं सोडवता आली नाहीत आणि ही कंपनी त्यांना बंद करावी लागली. मग अर्थार्जनासाठी पुढे त्यांनी "ग्रुप डान्सर' म्हणून नवीन भूमिका स्वीकारली.
अश्यातच एक दिवस निर्माते अशोक ताटे यांनी त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातील चार गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी दिली. नृत्यदिग्दर्शक म्हणुन त्यांच्या प्रवासाला प्रारंभ झाला. मग काय झालं तो ईतीहासच आहे!
अगदी भालजी पेंढारकर, राजा ठाकूर, हृषीकेश मुखर्जी यांच्यापासून दादा कोंडकेंपर्यंतच्या सर्व दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. 'राजश्री प्रॉडक्‍शन' चे तब्बल १७ चित्रपट केले. दाक्षिणात्य भाषा सोडल्या तर इतर सर्व प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं. शेकडो कलाकारांना नाचविलं. एक काळ असा होता की सुबल सरकार यांच्याशिवाय एकही मराठी सिनेमा होत नसे. १९६०-७० च्या दशकापासून अगदी २०१० पर्यंत प्रत्येक मराठी दिग्दर्शक, निर्मात्याबरोबर सुबलदांनी काम केलं. त्याचं फळही मिळालं. तब्बल सहा राज्य चित्रपट पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. दादासाहेब फाळके अकादमीने त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मान केला तर, राज्य सरकारने त्यांना सांस्कृतिक पुरस्काराने गौरवले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार त्यांना २००७ साली देण्यात आला. यावर्षी (२०११) महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवले. रसिकांचं प्रेम मिळालं. आज त्यांचा मुलगा आणि मुलगी या क्षेत्रात खूप चांगलं काम करताहेत.
सुबलदांचा पुनर्जन्मावर विश्वास असल्यामुळे ते म्हणायचे की, मला पुढचा जन्म याच महाराष्ट्रात मिळो. त्यांची ही ईच्छा पुर्ण व्हावी हीच त्यांना श्रद्धांजली.

Wednesday 16 November 2011

रविन्द्र जैन

त्यांचं संगीत लोकसंगीताप्रमाणे स्वयंभु वाटावं, शब्द मंत्रोच्चाराप्रमाणे सुत्रबद्ध वाटावे, आणि स्वर आकाशवाणीप्रमाणे अढळ वाटावा,  अशी सामर्थ्याची त्रीसुत्री परमेश्वराने रविन्द्र जैन नावाच्या व्यक्तीला अर्पण करून आता सात दशकं होत आलीत. रामायण आणि भगवतगीता टिव्हीच्या माध्यमातून त्यांच्याच शब्दांतून ऐकलेल्या-समजलेल्या युवा पिढीसाठी रविन्द्र जैन कथा-व्यास आहेत, अभिजात संगीताच्या चाहत्यावर्गासाठी रविन्द्र जैन आदर्श संगीतकार आहेत, गीतलेखनाला साहित्यलेखन मानणा-यांसाठी रविन्द्र जैन जेष्ठश्रेष्ट कवी आहेत तर संगीतक्षेत्रात नव्याने येऊ ईच्छीणा-यांसाठी रविन्द्र जैन हे सरस्वतीचं देऊळ आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यांच्यावर प्रेम करणा-यांचे लाडके 'दादू' होवून राहणंच अधीक आवडतं.
चाहत्यांशी संवाद साधता साधताच दादू क्षणार्धात स्वरबद्ध कवीता रचतात आणि आपल्या सुरेल आवाजात सादर करतात. हिंदी बरोबरच ईंग्रजी, संस्कृत आणि मराठी बंगाली भाषेचंही त्यांना ज्ञान आहे. हिंदू बरोबरच जैन, बुद्ध, ख्रिस्त्री आणि ईस्लाम धर्माचा अभ्यास आहे. ही विलक्षण अध्ययन क्षमता मात्र त्यांच्यासाठी नवीन नाही. कारण दादूंचे वडिल आयुर्वैदाचार्य पंडित ईंद्रमणी जैन हे संस्कृतचेदेखील पंडित होते. त्यांचे जेष्ट बंधू महेन्द्रकुमार जैन हे देखील भारतातील आघाडिचे आयुर्वेदाचार्य आहेत. 'मंजले भैया' जेष्ट कायदेतज्ञ आणि सर्वैच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉक्टर डि के जैन हे टाईम्स समुहाचे संचालक आहेत. संगीताचा वारसा दादूंना त्यांच्या आई किरणदेवींकडून मिळाला.
मुळचे अलीगढचे असलेले जैन राजस्थानमधील लोहारिया या खेड्यात वास्तव्याला असतांना १९४४ मध्ये रविन्द्रचा जन्म झाला. सात भावंडांमध्ये रविन्द्र तीसरा. देवाने त्याला अलौकीक दृष्टी द्यायची असं आधीच ठरवलं असावं, त्यामुळे भौतीक दृष्टी देण्याच्या भानगडीत तो पडला नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मात्र जन्मांध मुलाचे भविष्य घडवणे ही मोठीच जबाबदारी होती. छोट्या रविन्द्रचे शिक्षण सुरू झाले ते गुरूमुखी विद्या ग्रहण करतच. आजुबाजुच्या जैन मंदिरांमध्ये होणा-या भजन समारंभात रविन्द्र अगदी लहान असतांनापासुनच भजन गायला लागला. तेव्हा वडिलांनी ठरवलं, की मुलाला संगीताचंच शिक्षण द्यायचं. पंडित जनार्दन शर्मा, जि एल जैन आणि पंडित नथुराम यांसारखे गुरू लाभले. लोहारिया, जयपूर,  अलीगढ, दिल्लीसह कलकत्त्यापर्यंत संगीतशिक्षणासाठी भ्रमंती झाली. संगीताबरोबरच संस्कृत आणि धार्मिक ग्रंथाचा अभ्यास झाला.
दरम्यानच्या काळात १९५७ मध्ये दादूंचं वास्तव्य काही काळ मोठ्या भावाकडे नागपूरलाही होतं. १९७० च्या दरम्यान मात्र वडिलांच्या ईच्छेनुसार चित्रपटाला संगीत द्यायचं हे मनाशी ठरवून त्यांनी मुंबई गाठली. पुढील मार्ग सोपा नक्कीच नव्हता. मात्र दादूंच्या मनमिळावू व्यक्तीमत्त्वामुळे आणि बोलक्या स्वभावामुळे, त्यांच्या चौकस वृत्तीमुळे आणि ज्ञानामुळे चित्रपटक्षेत्रातील दर्दी लोकांमध्ये ते काही काळातच लोकप्रिय झाले. गुणवत्ता तर त्यांच्या ठायी होतीच. तरीदेखील संधी मिळण्यासाठी दोन वर्षाहून अधीक काळपर्यंत वाट पहावी लागली. १९७२ च्या दरम्यान 'सौदागर चित्रपटाचं काम मिळालं. पहिलं रेकॉर्डिंग होतं फ़िल्म सेण्टर स्टूडियो मध्ये आणि गायक होते महंमद रफी. दिवस होता मकसंक्रांतीचा. १४ जानेवारी १९७२.
रविन्द्रजींच्या कार्यशैलीने प्रभावीत झालेल्या रफीसाहेबांनी दादूंना गज़ल म्हणुन दाखवण्याची विनंती केली. 'गम भी हैं न मुक्कमल, खुशियाँ भी हैं अधूरी, आंसू भी आ रहे हैं, हंसना भी है जरूरी' -- दादूंच्या घनगंभीर आवाजातील ह्या ओळींनी रफीसाहेबांना ईतकं प्रभावीत केलं की यानंतर प्रत्येक रेकॉर्डिंगनंतर ही गज़ल त्यांची खास फर्माईश बनली.
यानंतर आलेल्या 'चोर मचाये शोर' च्या दरम्यान त्यांनी किशोरदांबरोबर आपलं पहिलं गाणं 'घुंगरू की त-हा बजता ही रहा हू मै' रेकॉर्ड केलं. भल्याभल्या संगीत दिग्दर्शकांच्या नाकी नऊ आणणारे किशोरदा रविन्द्रजींना मात्र संगीत संयोजनासाठी हवा तेवढा वेळ घेऊ द्यायचे. यानंतर मुळातच श्रद्धाळू आणि धार्मिक असलेल्या बडजात्यांच्या राजश्री प्रॉडक्शनबरोबर त्यांची जोडी जी जमली ती आजतागायत 'विवाह' च्या सुपरहिट गाण्यांपर्यंत कायम आहे.
गाण्याची धुन बनवतांनाच त्याचे शब्द लिहण्याचं कसबही दादूंना देवाने बहाल केलेलं आहे. त्यांच्या अप्रतीम गीतरचना आणि भजनांनी प्रभावीत झालेल्या कवयित्री दिव्या जैन यांनी सौदागर च्या प्रसिद्दी दौ-यादरम्यान त्यांना दिल्ली येथे पाहिलं आणि 'लग्न करायचं तर यांच्याशीच' अस मनोमन निश्चयच केला. यथावकाश दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर जणु दादूंच्या करिअरचे सुवर्णयुगच सुरू झाले. 'ब्रिजभुमी', 'नदिया के पार' 'अखीयो के झरोको से' -- आणि यादी वाढतच जाईल.
हिंदीच नव्हे तर अनेक मल्याळम, हरियाणवी, भोजपुरी, पंजाबी आणि तेलगु चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं. धार्मिक चित्रपटांचे संगीत देण्यात त्यांचा हातखंडा! गोपालकृष्ण, राजा हरिश्चंद्र यां हिंदी चित्रपटांबरोबरच ब्रम्हर्षि विश्वामित्र या तेलगु चित्रपटालाही संगीत दिलं. याचदरम्यान दक्षिण भारतीय संगीतक्षेत्रातील तेव्हा गाजत असलेलं नाव होतं - डॉक्टर के जे येसुदास ! दादूंनी येसुदासचा तलम रेशमी आवाज हिंदीमध्ये आणला. या जोडगोळीने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. खरं म्हणजे येसुदासच नव्हे, तर यांबरोबरच दादूंना श्रेय जातं ते अनेक नवे आणि दर्जेदार पार्श्वगायक हिंदी चित्रपटसृष्टीला देण्याचं. सुरेश वाडकर, आरती मुख़र्जी, जसपाल सिंग, हेमलता यांसह अनेक नव्या आवाजांना त्यांनी संधी दिली. नाव दिलं.
१९८२ च्या लगीनसराईमध्ये एक स्वप्नवत घटना घडली. चित्रपटक्षेत्रातीलच कुणाचातरी (कदाचित बरजात्या परिवारातीलच) विवाहसोहळा सुरू होता. मेहफिल जमलेली होती. दादूंना गाणं म्हणण्याचा आग्रह करण्यात आला. आणि त्यांनी सहज तान धरली - 'एक राधा, एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अन्तर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी...' मेहफिलीमध्ये बसलेल्यांपैकी एक होते राज कपुर! गाण्याच्या ओळी ऐकून ते मंत्रमुग्ध झाले! "ये गीत किसी को दिया तो नही?" त्यांनी विचारलं. दादू म्हणाले - "दे दिया!" "किसे?" राजजींनी  आश्चर्याने विचारलं. आणि दादूंनी हसुन सांगीतलं - "राजकपूर जी को!". पुढच्याच क्षणी राजजींनी खिशातले होते नव्हते तेवढे सगळे पैसे त्यांनी दादूंच्या हातात दिले. 'राम तेरी गंगा मैली' च्या अप्रतीम संगीताची मुहुर्तमेढ रोवली गेली. यानंतर आर के प्रॉडक्शन्सबरोबर त्यांनी 'हिना' चित्रपटही केला. मात्र याच दरम्यान राजजींच निधन झालं, आणि पुढचे अनेक मैलाचे दगड त्यांच्या आणि आपल्याही संगीत प्रवासात यायचे राहून गेले.
बरजात्या परिवार आणि राज कपूर यांच्यासह सागर परिवारांशी असलेला दादूंचा ऋणानुबंधही आजतागायत टिकून आहे. रामानंद सागर अर्थात पापाजींच्या 'आखे' चित्रपटाला संगीत देणा-या रविंन्द्रजींनी जेव्हा 'रामायण' मालीकेसाठी गीत आणि संगीताची जबाबदारी घेतली, तेव्हा दादूंची गीतं तुलसिरामायणाप्रमाणेच पुजनिय झाली. यानंतर श्रीकृष्ण मालीकेतून त्यांनी भगवद्गीता सांगीतली. नुकतीच सागर परिवाराच्या तीस-या पिढीबरोबर काम करत त्यांनी रामायणाची २०११ मधली आवृत्ती आपल्यापुढे आणली.
सध्याच्या बदलेल्या संगीत क्षेत्रामध्ये देखील स्वतःची शैली आणि अभिजात संगीताची साथ त्यांनी सोडली नाहीय. सध्या हिंदी साहित्य संमेलनात, कवी संमेलनात, तसेच गीत-गज़ल च्या मैफलींमध्ये ते व्यस्त असतात. फेसबुकवरही दादूंचं अकाउंट आहे, आणि दररोज चार अप्रतीम ओळी ते त्यावर लिहतात. चित्रपटाला संगीत देण्याचं कामही सुरू आहे. आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे २०१२ मध्ये येऊ घातलेल्या सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' कादंबरीवर आधारीत चित्रपटाचं संगीत दादूंनीच दिलेलं आहे.
'खुला खुला गगन ये हरे भरी धरती, जीतना भी देखो तबीयत नही भरती' सारखे शब्द लौकीकार्थाने कधी सृष्टीसौंदर्य पाहिलेलंच नसलेल्या माणसाने लिहावे ही गोष्ट मातापित्यांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट, संगीत तपस्येसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, यांबरोबरच ईश्वरी अस्तीत्त्वाचा पुरावा देण्यासही पुरेशी नाही का?

Tuesday 8 November 2011

लेडी गागा

नुकत्याच पार पडलेल्या पहिला ईंडियन ग्रॅंण्ड प्रिंक्स फॉम्युला वन च्या महासोहळ्याने भारतीय क्रिडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. गाड्यांची दिलखेचक रचना, स्पॉन्सर्सचे लोगो, देहभान हरपून शर्यतीचा आनंद लुटणारे प्रेक्षक या सर्वांनीच खेळांच्या या प्रकाराला ग्लॅमर मिळालंय. त्या ग्लॅमरमध्ये आणखी रंग भरण्याचं काम करतात ते या निमित्ताने आमंत्रीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार! दिल्लीला येऊन 'नमस्ते ईंडिया' म्हणत आणि 'एफ वन' पार्टीमध्ये सितार वाजवत पॉप सिंगर लेडी गागाने सर्वांची मने जिंकली आणि एरवी पॉप म्युजीकच्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असणारी पंचवीस वर्षाची स्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा सगळीकडेच चर्चेचा विषय झाली.
व्यावसायिक स्तरावर गाणे सुरू केले वयाच्या सतराव्या वर्षी. पहिला अल्बम आला तो २००८ साली. आणि आज २०११ मध्ये लेडि गागा पॉप संगिताची राणी मानली जाते. मायकेल जॅक्सन, मॅडोना या संगीतदेवांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच तीने कमावून दाखविली. एक दोन नव्हे तर तब्बल पाच ग्रॅमीसोबत ईतरही सर्व संगीत सन्मानांच्या राशी पटकावणाऱ्या, टाईम, फोर्ब्स, या सर्व नियतकालिकांच्या प्रभावशाली व्यक्तींक्तींच्या यादिममधील अग्रस्थान गाठणाऱ्या गागाकडे या शतकातील सर्वात बुद्धिमान गायिका म्हणून पाहता येईल.
आजवर बारा वेगवेगळ्या विभागांमध्ये सन्मानाच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी गागाचे नामांकन झाले आहे. मॅडम तुसाच्या संग्रहालयात तीचे एक दोन नव्हे तर आठ पुतळे आहेत. तीने आजवर प्रकाशीत केलेल्या तीन अल्बम्सपैकी दोन ऐतीहासिक बेस्टसेलर्स आहेत, आणि तीसरा हे सर्व रेकॉर्डस तोडण्याच्या मार्गावर आहे. ईतर पॉप गायिकांप्रमाणे आपल्या तोकड्या कपड्यांमुळेच आणि जगावेगळ्या फॅशन स्टेटमेन्टमुळेच जास्त चर्चेत राहत असली; तरीदेखील  आत्मविश्वास, खणखणीत आवाज रंगमंचावरील बिनधास्त वावराबरोबरच उत्तम नृत्य आणि त्याहूनही उत्तम गीतलेखनाची क्षमता ही गागाच्या यशाची कमी चर्चीली जाणारी कारणं आहेत.
आई सिन्थीआ आणि वडिल जोसेफ दोघेही टेलिकम्युनिकेशनच्या व्यवसायात, आणि बारा बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या दोन अपत्यांपैकी मोठ्या असलेल्या स्टीफनीला शहाणपण त्यामानाने जरा लवकरच आलं. वयाच्या चौथ्या वर्षी ती पियानो वाजवायला लागली. बाराव्या वर्षी तीने पियानोवरील आपलं पहिलं 'बॅलड' लिहलं. आणि चौदाव्या वर्षी माईकवरती पहिला परफॉर्मन्स दिला. रंगमंचाचं, मायक्रोफोनचं आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचं आकर्षण तीला स्वस्थ बसु देइनासं झालं. म्हणुन मग नाटकात काम करणं सुरू झालं. अनेक नाटकांत आणि नंतर एका टिव्ही सिरिअलमध्येही छोटीशी भुमिका केली. पण संगीतावरचं प्रेम गाण्याशिवाय दुसरं काही करू देइल तर शपथ! सोळाव्या वर्षी शाळेला बुट्ट्या मारत न्यु यॉर्कच्या आजुबाजुला असलेल्या रॉक-पॉप बॅण्डसची मुशाफिरी करणं सुरू झालं. लोकांना स्टीफनीचं गाणं आवडायचं, त्याचे शब्दही आवडायचे, मात्र तीचं व्यक्तीमत्त्व काही क्लीक होत नव्हतं. सगळीकडून नकार पदरी पडला.  मग आठवली आई!
आईच्या सल्ल्यानुसार स्टीफनीनं न्यु यॉर्क विद्यापिठाच्या टिश स्कुल ऑफ आर्टसमध्ये 'कॉलॅबरेटीव आर्ट प्रोजेक्ट' या सन्मानाचा मानल्या जाणा-या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. संगीत रंगभुमीसह, धर्म, समाज आणि राज्यशास्त्राची सांग़ड घालत कलाक्षेत्राचा अभ्यास केल्यामुळे तीची लेखनक्षमता विलक्षण वाढली. 'एकदा का तुम्ही त्या कलेबद्दल विचार कसा करायचा हे शिकलात, की मग ती कला तुम्हाला आपोआपच आत्मसात होते!' असं स्वानुभवावरून सांगणा-या गागा ने गिटार, ऑर्गन आणि ड्रमही स्वतःहूनच शिकला. दिल्लीच्या कार्यक्रमात तीने सतारही वाजवली. जाहीर कार्यक्रमात सतार हाती घेण्याची ती पहिलीच वेळ होती हे विषेश!
दरम्यानच्या काळात विविध कार्यक्रमांसाठी ऑडिशन्स देणं सुरूच होतं. आणि दुस-या सेमिस्टरच्या नेमके आधी एका ऑडिशनमध्ये स्टीफनीची निवड झाली. कॉलेज सोडून आता संगीतक्षेत्रात करीअर करायचं असा निर्णय तीने घरी बोलून दाखवला. वडिलांनी तीला एक वर्ष आणि एक ठरावीक रक्कम देऊन न्यु यॉर्कला जाण्याची परवानगी दिली. वर्षभरात किंवा पैसे संपल्यावर - दोन्हीपैकी जे आधी होईल तोपर्यंत यश मिळालं तर ठीक, नाही तर परत येऊन उरलेलं कॉलेजचं शिक्षण पुर्ण करायचं असा करार ठरला. तोपर्यंत २००५ साल उजाडलं होतं. स्टीफनीने  अतीशय स्वस्त अशी खोली भाड्याने घेऊन आणि मोजकं तेवढंच खाऊन न्युयॉर्कचं संगीत जगत पालथं घालणं सुरू केलं.
छोटंमोठं काम मिळत गेलं. कॉलेजमधील आपल्या मित्रांना बरोबर घेऊन स्टीफनी जर्मानोटा बॅण्ड (एसजीबॅण्ड) ची स्थापना केली. वर्षभरात एसजी बॅण्डने स्थानिक स्तरावर लोकप्रियता प्राप्त केली. छोट्या बॅण्डमधूनच मोठे गायक मिळत असतात असा आजवरचा अमेरिकेचा अनुभव आहे. मल्टीप्लॅटिनम ग्रॅमी अवार्ड विनर म्युझिक प्रॉड्युसर रॉब फुसारीला एका जवळच्या व्यक्तीने एसजीबॅण्डची गीतकार स्टीफनी जर्मानोटा हे नाव सुचवलं. त्या दरम्यान पॉपस्टार क्वीन बरोबर 'रेडिओ गा गा' या गाण्यावर फुसारी आणि त्याची टीम काम करत होते. हे गाणं तेव्हा ज्याच्यात्याच्या  ओठांवर होतं. या गाण्यातील 'गा गा' या शब्दांनी फुसारीला मोहीनी घातली आणि त्याने एक दिवस सहज म्हणुन 'लेडी गागा' असा मॅसॅज स्टीफनी ला केला! ठरलं! याच नावावर तीने शिक्कामोर्तब केलं!
फुसारीबरोबर बनवलेल्या अल्बममध्ये अनेक महिने गीतकार म्हणुन मेहनत करूनही वेळेवर तीचं नाव आणि काम त्यातून काढून टाकण्यात आलं. वीस वर्षाच्या मुलीसाठी हा मोठा धक्का होता. ती घरी परतली आणि आलेलं नैराश्य लपवण्यासाठी मग वाटेल ते करायला लागली. यात बिअर बार मध्ये तोकड्या कपड्यात पोल डान्स करणे, ड्रग्स घेणे आणि शेवटी प्रेमप्रकरणही घडले. सुरवातीला या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणा-या वडिलांनी मात्र प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून योग्य ती पावलं उचलली. लेडी स्टारलाईट या पॉप गायिकेची गाठ घालून दिली. स्टारलाईट तेव्हा १९७०च्या दशकातील गाणी आणि संगीत त्याच थाटात सादर करीत असे. गागा च्या व्यक्तीमत्त्वामध्ये तीने अमुलाग्र बदल घडवून आणले. एक करारी, विचारी, करीअर ओरिएंटेड अशी गायीका तीने गागामधून घडवली. लेडी स्टारलाईट आणि गागा यांनी मिळून अनेक ठीकाणी कार्यक्रम केले. वाईट दिवसांच्या आठवणी मागे सारून नवं आयुष्य़ सुरू करणा-या गागाच्या पुढ्यात आता सोनेरी दिवस येऊन उभे राहिले.
आधी अल्बममधुन काढून टाकण्यात आलेल्या तीच्या रचना फुसारीने अनेक म्युझिक कंपन्यांकडे पाठवल्या होत्या. त्यातूनच सोनी एटीव्ही या कंपनीने तीच्याशी गीतलेखनाचा करार केला. ब्रिटनी स्पीअर्स पासुन ते अक़ॉन पर्यंत पॉप आणि रॅप संगीताच्या दिग्गजांसाठी तीने गाणी लिहली. दरम्यान लिहलेलं गाणं उदाहरणादाखल म्हणुन दाखवत असतांनाचा गागाचा आवाज ऐकुन प्रभावीत झालेल्या 'अकॉन' ने तीला गायिका म्हणुन संधी देण्याची शिफारस केली. आणखी काय हवं?
२००७ ते २००८ दरम्यान तीने लिहलेल्या 'जस्ट डान्स' आणि 'पोकर फेस' या गाण्यांच्या लोकप्रियतेने सगळे रेकॉर्डस तोडले. या दोन्ही आणि ईतर काही रचनांसह लेडी गागाचा पहिला स्वतंत्र अल्बम 'द फेम बॉल' प्रदर्शित झाला. २००९ मध्ये 'द फेम मॉन्स्टर' आला आणि नुकताच 'बॉर्न धिस वे' रिलिज झालाय. लोकप्रियतेच्या लाटेवर विराजमान असलेल्या लेडी गागाने ईंटरनेट, फेसबुक, युट्युब या साधनांचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या कलात्मकतेने वापर करून घेतला.
आज जगभर तीची फॅन फॉलोईंग आहे. आयुष्यात आलेले चढ्-उतार आणि संघर्ष यांनी गागाला थोडे आक्रामक बनवले आहे; एकदा लेडि गागा म्हणुन रंगमंचावर पाऊल ठेवल्यावर आपण काय करू, हे स्वतः गागाही सांगु शकत नाही,ईतकं बेभान होउन ती गाणं म्हणते. शिवाय नियम तोडायला तीला आवडते. वेगवेगळे धाडसी प्रयोग तीने केले, आणि सुदैवाने तीला यशही आलंय.
काहीही असो! लेडी गागाला भारतातल्या तीच्या लक्षावधी चाहत्यांनी पहिल्यावहिल्या शो नंतरच  ' आणखी गा गा' असा कौल दिलेला आहे.