Monday 25 July 2011

डॉ. जयंत नारळीकर

विज्ञान साहित्याच्या बाबतीत मराठी भाषा बंगाली, हिंदी, आणि तामीळहूनदेखील समृद्ध असल्याचे भाषाशास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे. मराठी भाषेला हा बहूमान मिळवून देणार्र्यांपैकी एका महत्त्वाच्या व्यक्तीने नुकताच १९ जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. डॉक्टर जयंत विष्णु नारळीकर ७३ वर्षांचे झाले.
गणित आणि विज्ञान हे मुळातच किचकट वाटणारे विषय अगदी सामान्य माणसांपर्यंत रंजकपणे पोचवणारं एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठाहे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक म्हणुन डॉ नारळीकरांचं नाव आज घेतलं जातं. 'मराठी शास्त्रज्ञ' म्हटलं की नारळीकरांशिवाय ईतर कुणाचाही चेहराच डोळ्यापुढे येत नाही, ईतकी जवळीक त्यांनी सामान्य मराठी माणसाशी साधली आहे. हे कसं शक्य झालं?
संशोधन, अध्यापन यांबरोबरच विज्ञानाचा प्रसार, समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे या गोष्टीही नारळीकरांनी महत्त्वाच्या मानल्या. अनेक लेख,कथा-कादंबर्‍या लिहून; व्याख्याने, चर्चासत्रे, दूरदर्शन मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान लोकप्रिय केले. विज्ञानातील सिद्धांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. म्हणुनच डॉक्टर नारळीकर खर्र्या अर्थाने 'महाराष्ट्र भुषण' ठरतात.
चेहर्र्यावर कायम स्मीतहास्य, मुळात बोलका आणि समोरच्यालाही बोलतं करणारा स्वभाव; अत्यंत साधी रहाणी, नम्रता, आणि सौजन्यशीलता या सर्वांमुळे सुपरीचीत असलेल्या डॉक्टर नारळीकरांना एक वैज्ञानिक म्हणुन किती उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेली आहे हे हे आपण जाणतोच. खरं म्हणजे डॉ. नारळीकर हे स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी असे तारांकित व्यक्तिमत्त्व आहे.
डॉक्टरांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे वडिल म्हणजे रँग्लर विष्णू नारळीकर! केंब्रिज विद्यापीठात गणित विषयात विशेष यश प्राप्त केल्यानंतर रँग्लर ही पदवी मिळते. रँग्लर विष्णू नारळीकर गणिताचे चालतेबोलते विद्यापिठच होते. बनारस हिंदू विद्यापिठातील गणित विभागाचे ते प्रमुख होते. त्यामुळे डॉक्टरांचे शिक्षणही बनारस येथेच झाले. त्यांच्या मातोश्री सुमतीताई या संस्कृतसाहित्याच्या अभ्यासक होत्या. आईवडिलांचे गुण त्यांनी घेतले. वडिलांप्रमाणे गणितामध्ये नेत्रदीपक प्राविण्य मिळवलं; तर आईप्रमाणं संस्कृत भाषेमध्ये व्यासंग! बनारस विद्यापिठातून विज्ञानात स्नातक करून त्यानंतर वडिलांप्रमाणेच केम्ब्रिज विद्यापीठीतून रँग्लर झाले.
केंब्रिजच्या पदवी परीक्षेत सन्मानाचं 'टायसन पदक' त्यांनी मिळवलं तर नंतर उच्च अभ्यास करताना 'स्मिथ प्राईज'. दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखविणार्र्या या 'ब्राईट स्टुंडट' ला प्रा फ्रेड हॉईल यांच्या पारखी नजरेने हेरले, आणि गुरूशिष्याच्या एका नव्या परंपरेची सुरूवात झाली.
गुरू शिष्याच्या जोडीने गुरुत्वाकर्षण, सापेक्षता व विश्वरचना यांच्या संदर्भात नवा सिद्धांत मांडला आणि वैज्ञानिक जगतात खळखळ उडवून दिली. हॉईल-नारळीकर सिद्धांत म्हणून त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. पुढे हॉईल गुरुजींसमवेत संशोधन करून नारळीकर यांनी विश्वरचनेचा, स्थिर-स्थिती सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतानं जयंत नारळीकर हे नाव जगभर प्रसिद्ध झालं. वैज्ञानिक म्हणुन त्यांचं कर्तृत्त्व सर्वपरिचितच आहे. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी पद्मभुषण व त्यानंतर पद्मविभुषण देऊन या कार्यासाठी सरकारने त्यांना गौरविलेदेखील आहे. मात्र नारळीकरांचं खरं यश आहे अवकाशातले तारे मराठी घरांमध्ये पोचवण्यात.
ही प्रेरणा त्यांना गुरू फ्रेड हॉइल यांच्याकडून मिळाली असावी. कारण हॉईल यांनी सर्वसामान्य जनतेसाठी खगोलशास्त्रावर अनेक सुंदर पुस्तके व विज्ञानकथा लिहिल्या आहेत. लोकप्रिय विज्ञानासाठी दिले जाणारे 'कलिंग पारितोषिक' हॉइल यांना याचमुळे मिळाले होते. त्यांच्या कार्याने प्रेरीत होउन 'विज्ञान म्हणजे आपला प्रांत नाही; ते भलतेच काही तरी आहे', हा सामान्य माणसाच्या मनातला गैरसमज दूर करण्याचे मोठेच काम नारळीकर यांनी केले. पोस्टाच्या साध्या कार्डावर त्यांना प्रश्न लिहून विचारावा आणि त्यांच्या स्वाक्षरीसह त्याचे उत्तर मिळवावे, या उपक्रमामुळे तर लहान लहान गावात राहणाऱ्या पण कुतूहलभरल्या नजरेनं जगाकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच सोय झाली. 'विज्ञान' हा बाऊ करण्यासारखा नाही, तर आनंद घेण्यासारखा प्रांत आहे; आणि या बौद्धिक आनंदाची तुलना इतर कोणत्याही आनंदाशी करता येणार नाही,' याची जाणीव करून देण्याचं मोठंच काम नारळीकरांनी अशा अनेक उपक्रमांमधून केलं. त्यामुळंच १९७०च्या दशकामध्ये विज्ञानाभोवती असलेलं एक 'भीती'चं म्हणा किंवा 'धास्ती'चं म्हणा असलेलं वलय विरळ होण्यास खूपच मदत झाली. .
प्रयोगशाळेच्या भिंतींआड चालतं ते विज्ञान; त्याच्याशी आपला संबंध नाही, हा गैरसमज पुरता मोडून काढून लोकांना 'विज्ञानसाक्षर' बनविण्यासाठी नारळीकर यांनी लेखणी उचलली आणि मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते ठरले. सहा विज्ञानकादंबर्र्या, शेकडो विज्ञानकथा, आणि त्यांचे अनेक भाषांमध्ये झालेले अनुवाद या सर्वांनी नारळीकरांची साहित्यीक म्हणुन ओळख बनवली.
विज्ञानकथा लिहण्याचा नारळीकरांचा प्रवास कसा सुरू झाला तो किस्साही खुप रोचक आहे. १९७४ साली नवव्या मराठी विज्ञान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विज्ञानरंजन स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. तो घेताना त्यांनी 'जविना' (जयंत विष्णु नारळीकर) या आपल्या आद्याक्षरांची उलथापालथ करून 'नाविज' म्हणजेच नारायण विनायक जगताप हे नाव धारण केलं आणि 'कृष्ण विवर' ही आपली कथा स्पर्धेसाठी पाठवली. या कथेला पहिलं बक्षीस मिळालं, आणि मग मराठी विज्ञानकथेनं मागे वळून पाहिलं नाही. एक काळ असा होता की विज्ञान काल्पनिका हा 'उपेक्षित' वाङ्मयप्रकार होता. या वाङ्मयाला समीक्षकांच्या दृष्टीनं फारशी किंमत नव्हती. पण नारळीकर विज्ञानकथा लिहू लागले आणि या कथाप्रकाराची उपेक्षा संपून गेली. विज्ञानकथेचा स्वतंत्र असा वाचकवर्ग तयार झाला. विज्ञानातील विविध संकल्पना, घडामोडी, साध्या, सोप्या मराठीतून लोकांपर्यंत जाऊ लागल्या. मराठी साहित्यसृष्टी श्रीमंत झाली आणि विज्ञानविषयक लेखनाने तरुण पिढी घडविली गेली. नारळीकरांच्या यक्षाची देणगी, प्रेषित, वामन परत न आला, अभयारण्य अशा कथा-कादंबऱ्या गाजल्याच; पण 'आकाशाशी जडले नाते'सारखा ग्रंथराजही गाजला. ईंग्रजीमध्येही 'द रिटर्न ऑफ वामन' आणि 'ऍडव्हेन्चर' या दोन कादंबर्र्या त्यांनी लिहल्या.
आपला देश, आपली भाषा आणि आपली संस्कृती याबद्दल डॉक्टरांना कमालीचा आदर आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कधीही चांगले, मात्र त्याचे अंधश्रद्धेत रूपांतर होउ देता कामा नये, असे ते सांगतात. केंब्रिज विद्यापिठात राहण्याची आणि काम करण्याची संधी असूनसुद्धा नारळीकरांनी भारतामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला त्यावरूनच त्यांचे वेगळेपण सिद्ध होते. १९७२ च्या काळात देशातले बुद्धिमान, धडाडीचे, अभ्यासू, स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण धडाधड परदेशी जात होते आणि स्थिरावत होते. अशा वेळी नारळीकरांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला,हे धाडसच म्हणावं लागेल. मात्र 'ज्या मार्गानं बरेचसे जातात, त्या मार्गानं आपण न जाता वेगळा मार्ग निवडायचा,' हा संस्कार त्यांचे गुरू डॉ हॉईल यांनीच त्यांच्यावर केलेला आहे. आपल्या गुरूचा हा संस्कार त्यांनी सदैव ताजा ठेवला. अनवट वाटेनं जाऊन त्यांनी विज्ञानाच्या जगात स्वत:चं स्थान निर्माण केलं.
१९८८ मध्ये त्यांनी खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची आयुका’ (इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रोफिजिक्स) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली. त्यामध्ये मुलांसाठी विज्ञान वाटिकेची निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. या संस्थेच्या कृपेने अनेक महान शास्त्रज्ञांचे पाय पुण्यनगरीला लागले. आजही डॉक्टर नारळीकर मुलांशी संवाद साधण्यात, शंकांचं समाधान करण्यात आणि विज्ञानकथा लिहण्यात व्यस्त आहेत.
मुलांविषयी विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तरे पाठविण्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. युवकांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी सतत कार्यरत असणार्र्या या मराठी अब्दुल कलाम ला मानाचा मुजरा!
दिनांक २४ जुलै रोजी तरूण भारत मध्ये प्रकाशित याच लेखाचे हे कात्रण

Monday 18 July 2011

ईला अरूण

देल्ही बेली चित्रपटातील मुक्त शिविगाळीची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. या चित्रपटातील 'डी के बोस' या गाण्याला विरोध होत आहे. मात्र आधुनिकतेचे दाखले देऊन या गाण्याचे समर्थनही सुरू आहे. अशीच खळबळ विस वर्षांपुर्वी सुभाष घईने जेव्हा खलनायकसाठी चोली के पीछे क्या है...असे आनंद बक्षींकडून लिहून घेतले तेव्हा माजली होती. त्या वेळी या गाण्याची गायिका ईला अरूणला देखील नकारात्मक प्रसिद्धीला सामोरं जावं लागलं होतं. आपल्याकडे एकदा ईमेज बनली, की त्यातून बाहेर निघणे कठीण जाते, याचा प्रत्यय ईला अरूणला अनेक वर्षांपर्यंत येत राहीला.
एक आंतरराष्ट्रीय दर्जाची रंगकर्मी, शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण घेतलेली पहाडी आवाजाची गायिका, भारतातल्या अनेक राज्यांतील लोकसंगीताची अभ्यासक, राजस्थानी लोकसंगीताची तर अनभिशिक्त सम्राज्ञीच, एक उत्तम दिग्दर्शक, लेखक, नाटककार, नृत्यांगना आणि गीतकार असलेली ईला अरूण केवळ 'उथळ चालीची लोकगितावर आधारीत गाणी' म्हणणारी गायिका म्हणुन अनेक वर्ष परिचीत होती. मात्र रंगदेवतेवरील निस्सिम भक्ती आणि कलेप्रती असणारा अभ्यासपुर्ण दृष्टीकोण या सर्वांनी ईला अरूणला एक जेष्ट अष्टपैलू कलावंत म्हणुन ओळख मिळवून दिली. राजस्थान या आपल्या जन्मभुमीवर तीचे मनापासून प्रेम आहे आणि म्हणुनच ती खर्र्या अर्थाने या राज्याची सांस्कृतीक राजदूत आहे.
महाराजा आणि महाराणीच्या या राज्याच्या राजधानीत म्हणजे जयपूरला ईला अरूणचा जन्म झाला तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात. दोन भाऊ, बहिणींमध्ये ती थोरली. शिक्षणाचे आणि कलेचे वातावरण घरात होतेच. महाराजा स्कुल मध्ये शालेय शिक्षण घेत असतांनाच अभिनयाची गोडी लागली. संगीतातदेखील रूची होती. हौशी कलावंत म्हणुन नवनाटक, पथनाट्य, आणि लोकनाट्य करत करतच ईला अरूण ने संगीत विषय घेऊन बि ए केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना लोकसंगीता बद्दल आदर असला, तरीही राजस्थानच्या या परंपरेची गोडी तीला नंतरच्या काळात लागली जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनकरीता तीने थेट दिल्ली गाठली.
सत्तरच्या दशकात दर शनिवार-रवीवारी दिल्ली ते जयपूर बसने प्रवास करतांना ईलाने लोककलांमध्ये रमलेला राजस्थान पाहीला. बंजारा तांड्यांपुढे त्यांची गाणी ऐकत ती तासनतास उभी रहात असे. राजस्थानी लोकसंगीतावरील तीचा सगळा रिसर्च याच काळात तीने पुर्ण केला. या दरम्यान लोकसंगीताची प्रगल्भता, शास्त्रीय बैठक, मिष्कीलपणा, ईत्यादी गुण तीने हेरले आणि अंगीकारले. आज छोटेछोटे चमचमणारे आरसे असणारी राजस्थानी पॅटर्नची रंगीत साडी, त्यावर विणलेले जयपूरी नक्षी, जरासा भडक मेक-अप, मुळातच मोठ्या डोळ्यांना अधीक ठळकपणे व्यक्त करणारे काजळ, आणि कपाळावरची नवरंगी बिंदी, ही ईलाजींची ओळख झाली आहे.
एनएसडीमधील वर्गमित्रांनी दिल्ली सोडून मुंबई गाठल्यावरही ईलाने मात्र दिल्लीतील रंगमंचावरच बरेच दिवस काम केलं. उद्देश एवढाच, की राजस्थानपासून दूर जावे लागू नये. १९८२ मध्ये चुलत भाऊ संगीतकार समिर सेन यांच्या आग्रहावरून ती मुंबईला आली. कधीकाळी रेडिओवर गाणं गायल्याचे पाच रूपये मिळाले होते, तेवढाच काय तो संगीत क्षेत्रातला व्यावसायिक अनुभव. या काळात लतादिदि आणि आशाताईंसारखं गाता यावं असाच प्रयत्न प्रत्येक नवोदित गायीकेचा असायचा. ईलासाठी ते शक्यच नव्हतं. त्यामुळे तीने मुंबईला प्रायोगीक रंगभुमीवर काम शोधायचं ठरवलं.
एनएसडीची विद्यार्थी असल्यामुळे श्याम बेनेगल यांच्याशी भेट झाली. बेनेगल तेव्हा 'मंडी' चित्रपट बनवत होते. अंबरिश पुरी, ओम पुरी, शबाना आझमी, स्मीता पाटील या समांतर सिनेमातील महान कलावंतांबरोबरच निना गुप्ता, अनिता कंवर आणि रत्ना पाठक ईत्यादी वर्गमैत्रीणींच्याही भुमिका या चित्रपटात होत्या. समांतर सिनेमातील ही तीची सुरूवात ठरली. कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या सहवास ईलामधील अष्टपैलू कलावंताला घडवत गेला. आज संगित, नृत्य, अभिनय आणि लेखन या सर्व कलांमध्ये तीला गुरू मानले जाते.
दरम्यानच्या काळात मर्चंट नेव्हीमध्ये ऑफीसर असलेल्या अरूण वाजपेयी यांच्याशी विवाह झाला, आणि ईला पांडेची ईला अरूण झाली. स्वतः एक उत्तम व्हिडिओग्राफर असलेल्या अरूणजींना कलाक्षेत्राची उत्तम जाण आहे. त्यांची मुलगी ईशीता नुकत्याच एनडिटीव्हीवर गाजलेल्या 'दिल जीतेगी देसी गर्ल' या रिऍलिटी शो मध्ये बरिच लोकप्रिय झाली.
गायिका म्हणुन राजस्थानी लोकसंगीताला रणरणत्या वाळवंटाच्या बाहेर काढून पॉप आणि रॉकच्या सुत्रात बांधून जगभर प्रसिद्ध करण्याचे श्रेय ईलाजींनाच जाते. चित्रपटात त्यांना संधी मिळाली ती यश चोप्रांच्या लम्हे चित्रपटातील 'मोरनी बागा मे बोले' या गाण्याच्या माध्यमातून. कुठल्याश्या आकाशवाणी केन्द्रावर ऐकलेला हा आवाज संगितकारजोडी शिव-हरी यांनी अचुक हेरून ठेवला होता. यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी खलनायक चित्रपटातील 'चोली के पिछे' या गाण्यासाठी बोलावल. आणि मग ईला अरूण ने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
राजस्थानी लोकसंगितावर आधारीत त्यांचे अनेक अल्बम्स येत गेले. 'घागरो जो घुम्यो' किंवा 'निगोडी कैसी जवानी है' सारखी गाणी वादग्रस्तही ठरली आणि गाजली देखील. द्वयर्थी गाण्याचा आरोप हसत हसत स्विकारणार्र्या ईलाजींच्या मते काही गाणी द्वयर्थी असली, तरीही त्यांच्या माध्यमातून राजस्थानी संगीताचा श्रीमंत वारसा लोकांपुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या म्हणतात की 'अल्बमध्ये नऊ गाणी असतात. ती सर्वच ऐकली की एखाद्या द्वयर्थी गाण्याकडे आपोआपच दुर्लक्ष होईल ईतकी ती चांगली असतात.'
रंगभुमी असो, गायन असो, अल्बम्स असो, सिनेमा असो, किंवा टिव्ही सिरिअल्स असो -- ईला अरूण यांनी नेहमी आपल्यातील कलेचा आणि कलावंताचा सन्मान केला आहे. टिव्हिवर श्याम बेनेगल यांच्या 'यात्रा', 'डिस्कवरी ऑफ ईंडिया', गोविंद निहलानींच्या 'तमस', विजया मेहतांच्या 'लाईफलाईन' या मालिका त्यांनी निवडल्या आणि सास बहू मालीकांचा जमाना आल्यावर हळूवारपणे काढता पाय घेतला.
खलनायकनंतर आलेली तत्सम गाण्याची शेकडो ऑफर्स त्यांनी नम्रपणे धुडकावून लावली. मधल्या काळात लोकसंगिताच्या नावाखाली ढासळलेल्या दर्जाची गाणी लोकांपुढे आणल्यामुळे या संगीताची, आणि पर्यायाने राजस्थानची बदनामी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी अल्बम बनवणेच बंद केले. पायरसी, आणि उथळपणा यांच्या विरोधात त्यांनी अनेक वर्ष कामही केलं नाही. मात्र ईलाजींमधील उत्कृष्ट गायिकेची ओळख असणार्र्या ए आर रहमान सारख्या संगीतकाराने 'छैय्या छैय्या' पासून ते 'रिंगा रिंगा' पर्यंत अनेक हिंदी आणि तामीळ गाणी त्यांच्याकडून आवर्जुन गावून घेतली. जगभरातील अनेक भाषांमधून गायलेल्या आणि उत्तम मराठीची जाण असलेल्या ईलाजींनी  निर्माते सतीश कुलकर्णी यांच्या 'जमलं हो जमलं'मध्ये मराठीतही गाणं म्हटलं.
चित्रपटांतूनही त्यांनी त्यांनी भुमिका केल्या, त्याही 'ऑफबिट' च्!. 'चायनागेट', 'घातक' किंवा जोधा अकबरमधील त्यांची भुमिका आठवा, किंवा 'वेलकम टु सज्जनपूर', 'वेल डन अब्बा,' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'वेस्ट ईज वेस्ट' हे चित्रपट पहा! ईलाजींची एक कलावंत म्हणुन असलेली निष्टा सिद्ध होते. सिनेमासाठी त्यांनी गीतेही लिहली आहेत.
रंगभुमीवर कार्य करणारी त्यांची 'तमाशा' ही संस्था आहे. अनेक उदयोन्मुख कलावंतांना या माध्यमातून संधी प्राप्त होते आहे. ईंग्रजी रंगभुमिवरील 'ईन द हाउस ऑफ बिल्कीस बिबी' हे त्यांचं नाटक खुप गाजतंय. शिवाय 'हौले हौले' या एका धमाकेदार अल्बमसह ईलाजी आपल्या जुन्या रंगात परत येत आहेत. मायावती, आणि ममता बॅनर्जी यांच्या भुमिका करण्याची ईच्छा असल्याचं ईलाजींनी नुकतंच बोलून दाखवलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपल्याला निळ्या काठाची सुती साडी आणि स्लीपर घालून झपझप चालणार्र्या ममतादिदि मोठ्या पडद्यावर दिसतील अशी आशा करू या.
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित झालेले प्रस्तूत लेखाचे हे कात्रण. दि. १७ जुलै, २०११)

Sunday 10 July 2011

श्री बाबामहाराज सातारकर

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकजीवनाचा मंगलकारी प्रवाह. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळा. चंद्रभागेच्या या वाळवंटात भागवत धर्माचा पाया रचणार्र्या ज्ञानेश्वरमाउलींपासून कळस सजवणार्र्या संतश्रेष्ट तुकाराम महाराजांपर्यंत सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी रंगली, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली. आज याच वाळवंटात नाचत, जयघोष करत, हजारो वारकरी फेर धरतात तो हरिभक्तीपरायण श्री बाबामहाराज सातारकरांच्या किर्तनांच्या तालावर. किर्तनकलेचा परिपुर्ण आविष्कार म्हणावे, हजारो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान म्हणावे, भागवत धर्माचा वैश्वीक राजदूत म्हणावे, की आधुनिक काळातील माउली महावैष्णव! -- श्री बाबामहाराज सातारकरांचं कर्तृत्त्व, वक्तृत्त्व, नेतृत्त्व आणि व्यक्तीमत्त्व त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तीस्वर होण्याचा मान प्रदान करतात.
सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात.
नुकताच पाच फेब्रुवारी रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस भक्तमंडळींनी उत्साहात साजरा केला. "जीवनाच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत कीर्तन करण्याची इच्छा आहे," हेच मागणं त्यांनी या वेळी पांडुरंगाच्या चरणी मागीतलं. तसेही तीन पिढ्यांपासुन तरी किर्तन आणि भागवत धर्माची पताका हेच सातारकर घराण्याचं ब्रिद राहिलेलं आहे. गेल्या दिडशे वर्षापासुन वारकरी परंपरातील प्रमुख फड म्हणुन सातारकर फडाचे नाव घेतले जाते.
मुळात सातारकर घराण्याचे आडणाव गोरे असे आहे. (बाबामहारांचे मुळ नावदेखील निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे.) सातारा परिसराचे आधिपत्य या घराण्याकडे पिढिजात चालत आलेले होते. त्यामुळे सगळी भौतीक सुखे पायाशी लोळण घेत होती. मात्र ऐश्वर्य आणि बुद्धीमत्ता याबरोबर श्रद्धाळू मनाच्या लोकांनी या कुळात जन्म घेतला. भक्तीपरंपरेची वाटचाल सुरू झाली. "जसे दुःख पचवावे लागते, तशी श्रीमंतीही पचवावी लागते." असं बाबामहाराज नेहमी सांगत असतात, याचा परामर्श त्यांच्या पिढीजात कोट्याधीश कुळाने अविरत चालवत आणलेल्या भक्तीपरंपरेत आहे.
श्री सदगुरु दादामहाराज सातारकर यांनी सुरू केलेल्या या फडाशी निगडित लाखोचेवर मंडळी  आज महाराष्ट्रभर तसेच आंध्र, तामिळनाडू, गुजरात व परदेशा मध्येदेखील पसरली आहेत. असं म्हणतात की श्री दादामहारांना प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनीच दृष्टांत देऊन या परंपरेची धूरा त्यांच्याकडे सोपवली होती. हरिविजय, श्रीभक्तिविजय या ग्रथांवर ते प्रवचने करीत असत. त्यांच्यानंतर त्यांचे व्दितीय चिरंजीव श्री संत अप्पा महाराजांनी अत्यंत निष्ठेने ही परंपरा चालविली. त्यांनी पंचवीस वर्ष श्री एकनाथी भागवताची पारायणे केली व सात वर्ष अमृतानुभव सांगितला. १९६२ साली त्यांनी देह ठेवला आणि त्यांचे पुतणे बाबामहाराज गादीवर आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा आज चढत्यावाढत्या क्रमाने सुऱु आहे.
संस्कृत, संगित आणि कायद्याचे रितसर शिक्षण घेतलेल्या बाबामहाराज यांनी ज्ञानेश्वरीची एक विषेश आवृत्ती 'ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी' या नावाने प्रकाशित केली आहे. शिवाय 'ऐश्वर्याची वचनाक्षरे' हा संत तुकारामांच्या गाथेवरील ग्रंथ, आणि उध्दवगीत अर्थात 'ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत' ह्या दोन ग्रंथांचं संपादन केलेलं आहे. 'ऐश्वर्य' या शब्दामुळे ते टिकाकारांचे लक्ष्य़ झाले. 'ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी'ची किंमत दोन हजार रूपये होती. कारण त्याच्या मुखपृष्टावर सोन्याची नक्षी काढलेली होती. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर 'ज्या ज्ञानेश्वरांनी त्यांचे आयुष्य संन्यासी म्हणून घालवले, त्यांच्या विचारांची सातारकरांनी पार वाट लावली' अशी टिकेची झोड त्यांच्यावर उठली. मात्र ग्रंथात दिसणारं हे 'ऐश्वर्य' किंवा श्रीमंती ही पिढीजात चालत आलेली आहे, ते प्रदर्शन करण्यासाठी आणलेलं उसनं अवसान नव्हे, हे सगळे टिकाकार विसरले.
याचप्रमाणे 'दुधिवरे' या आपल्या मुळगावी त्यांनी उभारलेली 'प्रतिपंढरपूर' 'चैतन्यधाम' नगरी आणि 'मंत्रमंदिर' ह्या तिर्थक्षेत्राची निर्मिती देखील वादाच्या भोवर्र्यात अडकली होती. दुधिवरेला विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. यासाठी लोहगडच्या पायथ्याशी, पवना धारणा जवळ निसर्गरम्य परिसरात २२ एकराची जागा त्यांनी कशी मिळवली? या पासून वाद सुरू झाला. लोखंड विरहित बांधकाम, भव्य कमानी, वारकरी भगव्या रंगाशी जवळीक साधणा-या धोलपुरी दगडाच्या राजस्थानी कलाकुसरीने तयार केलेली या देवालयाची पाच मुख्य शिखरे ईत्यादींची भव्यदिव्यता अनेकांच्या डोळ्यात न भरली असती तरच नवल. शिवाय लोणावळ्यापासून अवघ्या आठ किलोमीटरच्या अंतरावर या ठीकाणी निवासासाठी सर्वसोयीयुक्त इमारती आहेत. आगावू बुकिंगने राहण्याची भोजनाची व्यवस्था होते. या माध्यमातून सातारकरांनी नवा व्यवसायच उभारल्याची टिका त्यांच्यावर झाली. मात्र आठशे वर्षापासुन महाराष्ट्रात अस्तीत्त्वात असलेल्या भागवत धर्माला आणि वारीच्या परंपरेला वैश्वीक पातळीवर नेणारं असं एक मुख्यालय या मंदिराच्या रूपाने उभं राहिलेलं आहे, या माध्यमातुन वारी जगभर जाणार आहे, या सत्याचा मात्र टिकाकारांना विसर पडला.
सातारकरांनी मात्र आज मार्केटिंगचा जमाना आहे आणि त्याला पर्याय नाही हे अचुक ओळखलं. म्हणुनच कार्याच्या प्रसारासाठी सर्व प्रकाराची साधने, आधुनिक विचारसरणीचा त्यांनी अवलंब केला. ईंटरनेटवर त्यांचे व्हिडिओज, स्लाईड शोज आहेत. त्यांचे ग्रंथ नेटजालावर उपलब्ध आहेत. त्यांची वेबसाईटदेखील आहे. महाराज फेसबुकवरही आहेत.
किर्तनाच्या अगणीत सिडिज, डिव्हीडिज निघालेल्या आहेत. कॅसेटच्या विक्रमी विक्री बाबत प्लॅटिनम डिस्क देऊन गौरविलेले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. टिव्हीवर त्यांचे कार्यक्रम होतच असतात. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संतसाहित्यावर लेखनही केलं आहे. पुणे विद्यापीठाच्या श्री ज्ञानेश्वर अध्यासनावर ते निमंत्रित तज्ञ आहेत. व्यावसायिकता त्यांनी जपली, मात्र त्याला धंदेवाईकतेचा स्पर्ष होउ दिलेला नाही. त्यांच्या जाहीर किर्तनाचे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण हक्क त्यांनी कधीही विकले नाहीत. त्यांच्या प्रवचनांना कधीच प्रवेश शुल्क नसते.
वैयक्तीक आयुष्यातील पुत्र, पती, पिता, मित्र, बंधु या सगळ्या भुमिकाही त्यांनी चपखल पार पाडल्या आहेत. पत्नी रुक्मीणी यांच्या सेवा, सहकार्यांबरोबरच जेष्ट बहिण कौसल्या (माईं) यांचं मार्गदर्शन त्यांना आहे. त्यांची जेष्ठ कन्या भगवती आणि तीचा मुलगा चिन्मय हे महाराजांचे दोन शिष्य़ आहेत. फडाचे ऊत्तराधिकारी म्हणून महाराजांनीं चिन्मयवर आताच जबाबदारी घोषित केली आहे. एक म्हणजे महिला किर्तनकार घडवणे, आणि दूसरे म्हणजे आपल्या परंपरेची धूरा मुलीच्या मुलाकडे सोपवणे हे दोन धाडसी निर्णय घेऊन सातारकरांनी आपलं पुरोगामित्त्वच सिद्ध केलं आहे.
श्रीमंती पचवणार्र्या सातारकरांनी दुःख पचवलंच नाही असं नाहीये. त्यांचा एकुलता एक तरूण मुलगा चैतन्य त्यांना अकस्मात गमावावा लागला. त्याच्याच स्मृतिप्रित्यर्थ देवालयाचे नामकरण श्रीचैतन्यधाम असे करण्यात आले आहे.
मग पिकलिया सुखाचा परिमळु। कीं निवालिया अमृताचा कल्लोळु। तैसा कोंवळा आणि रसाळु। बोलु बोलिला॥ या माउलींच्या उक्तीप्रमाणे निसर्ग, प्राणी, माणसे, कला, संगीत, भजनकीर्तन, परमेश्वर, आणि एकुणच जीवनावर भरभरुन मनस्वी प्रेम करणारे कलंदर दिलखुलास, तरीही अति परखड, समर्थ, राजस, लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना खिळवून ठेवते, हे मात्र वास्तव सत्य आहे.

तरूण भारत च्या आसमंत पूरवणी मध्ये प्रकाशित झालेले प्रस्तूत लेखाचे हे कात्रण (दि. १० जुलै, २०११)


Monday 4 July 2011

निरूपमा राव

२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यानंतर थांबलेली भारत-पाकिस्तान द्विपक्षीय वार्ता भारताच्या पुढाकाराने नुकतीच पुन्हा सुरू झाली. पाकिस्तानकडून सलमान बशिर तर भारताकडून निरूपमा राव या उभय देशाच्या परराष्ट्र सचिवांनी काश्मीरसह अनेक विषयांवर चर्चा केली. आपल्या करारी बाण्याबरोबरच चेहर्र्यावर सतत प्रसन्न स्मीतहास्य जपणार्र्या; अत्यंत नेटकी नेसलेली प्रिंटेड जॉर्जेट साडी, व्यवस्थित सेट केलेले केस, हलका मेकअप आणि सुस्पष्ट संभाषणकौशल्य या सगळ्यांमुळे एका प्रभावी व्यक्तीमत्त्वाच्या धनी झालेल्या निरूपमा राव यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर एव्हाना आपला जबरदस्त ठसा उमटविला आहे. मुदत संपल्यामुळे त्यांना येत्या ३१ जुलैला परराष्ट्र सचिव पदावरून निवृत्त व्हावे लागणार आहे. असे जरी असले तरी त्यांची लगेच अमेरिकेत राजदूत म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊन भारत सरकारने त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. मात्र आपल्यासमोर आलेल्या आव्हानांचा सस्मीत सामना करायचा, आणि यशस्वीपणे ती पेलून दाखवायची, हा निरूपमा राव यांचा स्वभावच आहे. अगदी सुरवातीपासून.
जागतिक व्यवहारात भारताचा एक सुसंस्कृत, अभ्यासू व समंजस चेहरा म्हणुन नावारूपास आलेल्या निरूपमा राव उत्तम कवयित्री आहेत. पत्रकार मंडळींनी शब्दांची फिरवाफिरव करून मांडलेल्या प्रश्नांना ठामपणे उत्तरे देणार्र्या निरूपमा राव कर्नाटक व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायक आहेत, तसेच पाश्चात्य संगिताच्याही अभ्यासक आहेत. परराष्ट्रधोरणाचा मसुदा ठरवतांना संगणकावर सामर्थ्याने फिरणारी त्यांची बोटं तितक्याच अधीकाराने गिटार आणि पियानो यांवरती देखील फिरतात. आणि म्हणुनच केवळ एक वरिष्ट प्रशासकिय अधीकारी म्हणुन नव्हे, तर एक आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणुनही त्या आपल्यावर छाप सोडून जातात. या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण सुरू झाली ती निसर्गरम्य केरळमधील मालापूरमच्या एका छोट्याशा सरकारी निवासस्थानापासून. 
कर्नल व्ही पी एन मेनन यांच्या तीन मुलींपैकी निरूपमा ही थोरली. चौकस अभ्यासु वृती, चाणाक्षपणा, आणि धाडस हे उपजत मल्याळी गुण अंगी होतेच. वडिलांचं योग्य मार्गदर्शनही होतं. त्यांची ज्या ज्या ठीकाणी पोस्टींग होत गेली, त्या त्या ठीकाणच्या शाळेत तीचं शिक्षण होत गेलं. बंगलोर, पुणे, लखनऊ, आणि मसुरीच नव्हे तर औरंगाबादमध्येही शिक्षण झालं. मराठवाडा विद्यापिठातून ईंग्रजी साहित्यात एम ए केलं. तेथे असतानाच भारतीय प्रशासकिय सेवेच्या (युपिएससी) परीक्षा द्यायचा निर्णय झाला. वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आय ए एस च्या परिक्षेत भारतातून पहिला क्रमांक प्राप्त केला. वडिलांच्या सल्ल्यानुसार थेट परराष्ट्र मंत्रालय गाठलं आणि आय एफ एस ऑफिसर म्हणुन प्रोबेशनवर रूजू झाल्या.
साल होतं. १९७३. स्थळ - निसर्गश्रीमंत मसुरी. आपल्या बॅचमॅटसबरोबर गिटार वाजवून 'दोज वेअर द डेज माय फ्रेन्ड, वि थॉट दे वुड नेव्हर एन्ड!' या ओळी एखाद्या सराईत गायिकेच्या थाटात गाणार्र्या २३ वर्षाच्या निरूपमाचे सुर सुधाकर राव नावाच्या देखण्या आणि हुशार वर्गमित्राबरोबर जुळले. १९७५ मध्ये निरूपमा मेननची ती निरूपमा राव झाली, आणि वैयक्तीक जिवनाबरोबरच व्यावसायिक जिवनातील नव्या वाटचालीला देखील सुरूवात झाली.
भारतातील प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांच्यावर पहिली जबाबदारी आली ती व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) मधील भारतीय दूतावासाची. यानंतर श्रीलंकेतील भारतीय उच्चालयातील पहिल्या सचिव म्हणुन त्यांनी काही दिवस काम पाहिलं. या दरम्यान भारत आणि चिन यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांबाबत त्यांनी विषेश अभ्यास केला. विदेश मंत्रालयाच्या पुर्व आशिया विभागाच्या सहसचिव या पदावर कार्यरत असतांना १९८८ साली त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर ऐतीहासिक चिन भेटीदरम्यान दोन्ही देशांतील तणावाचे संबंध संपुष्टात आणण्यात पुढाकार घेतला. वॉशिग्टन, मॉस्कॉ, ईत्यादी आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या केन्द्रांवर भारताचे प्रतिनिधित्त्व करतांनाच त्यांनी हॉवर्ड विद्यापिठात १९९२-९३ दरम्यान फेलोशिपही केली. १९९५-९८ दरम्यान त्यांनी पेरूमधील भारताच्या राजदूत म्हणुन काम पाहिलं. गेली ३७ वर्षे परराष्ट्र खात्यात विविध पदांवर काम करीत असल्या तरी त्यांची कारकीर्द खरी बहरली ती त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणुन कार्यभार स्विकारला तेव्हापासून.
ते वर्ष होते २००१-०२. भारत-पाकिस्तान आग्रा शिखर वार्तेदरम्यान निरूपमा राव हा चेहरा सर्वपरिचित झाला. वृत्तांत देताना मीडियाला काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही याचं अचूक भान त्यांनी सांभाळलं होतं. त्यांच्या करारीपणाला कंटाळून पाकिस्तानच्या काही काही उर्दू पत्रकारांचा संयम सुटला आणि त्यांनी राव यांच्याविषयी असभ्य उद्गार काढले. तेव्हा खुद्द मुशर्रफ यांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती.
यानंतर २००४-०६ पर्यंत श्रीलंकेत आणि २००६-०९ पर्यंत चिन मध्ये त्या भारताच्या राजदूत होत्या. या काळात दोन्ही देशांतील संबंध कमालीचे सौहार्दाचे झाले, जे अजूनही आहेत. बिजींग आणि मॉस्कोशी त्यांचे ऋणानुबंध ईतके जुळले, की त्यांच्या पहिल्या कवीतासंग्रहाचा  -- रेन राईजिंग चा रशियन आणि चायनिस अनुवाद लगोलगच प्रकाशित झाला.
राजदूत आणि त्यानंतर परराष्ट्र सचिव म्हणुन अतीशय तणावाच्या जबाबदार्र्या सांभाळतांनाच वयाच्या १२ व्या वर्षापासुन जपलेला कवीतांचा छंद राव यांनी  आजही कायम ठेवला आहे. शास्त्रीय संगिताबरोबरच पाश्चात्य संगिताचं शिक्षण त्यांनी घेतलंय. जॅझ, व्हायोलीन आणि १८व्या शतकातील पाश्चात्य संगीत हे त्यांचे  आवडते पासटाईम आहेत. मे २००३ मध्ये दिल्लीला झालेल्या 'समरटाईम' म्युझिक फेस्टीवल मध्ये त्यांनी पियानोवर पाश्चात्य संगिताचा एक धडाकेबाज पर्फोमन्सही दिला होता. मात्र हा पहिला आणि शेवटचाच जाहिर कार्यक्रम. हल्ली निरूपमा राव गातात ते फक्त काही मोजक्या जवळच्या मित्रांच्या कंपुमध्ये, किंवा आपल्या छोट्याश्या परिवाराबरोबर असतांना. आय ए एस ऑफीसर म्हणुन सेवानिवृत्त झालेले त्यांचे पती सुधाकर राव, आणि दोन मुले निखिलेश आणि कार्तिकेय यांच्याबरोबर राहाण्याची संधी त्यांना क्वचितच प्राप्त होते.
"आय एफ एस तर मी नंतर झाले, कवीता आधीपासूनच करायचे," असं सांगतांनाच कवीता, संगीत, वाचन हे सगळे छंद जोपासले असले, तरीदेखील आपलं काम हेच आपलं पहिलं प्रेम असल्याचंही त्या नेहमी सांगत असतात. त्यामुळेच परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी स्विकारल्यावर पाकिस्तानबरोबरचा तणाव वाढू न देता, त्याला दहशतवादाच्या प्रश्नावर कोंडीत पकडायचे, त्यासाठी अमेरिकेचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा; हे करत असतांना चीनच्या आघाडीवर कोणताही नवा तणाव निर्माण होऊ न देता त्याच्याशी व्यापारी व आर्थिक संबंध वाढवायचे; शिवाय अमेरिकेलाही भारताशी अधिक खुलेपणाने व्यवहार करण्यास भाग पाडायचे -- अशी अनेकविध कामगिरी निरुपमा राव यांच्यासारखा कुशल मुत्सद्दीच करू जाणे.
दोन वर्षाची मुदत संपल्यामुळे त्यांना येत्या ३१ जुलैला परराष्ट्र सचिव पदावरून त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे. त्यांचे ज्युनिअर १९७४ च्या आय एफ एस बॅच चे रंजन मथाई यांची नियुक्ती नवे परराष्ट्र सचिव म्हणुन करतांनाच सरकारने राव यांची लगेच अमेरिकेत राजदूत म्हणून रवानगी करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिवाखालोखाल सध्या ती महत्त्वाची जागा आहे. येत्या काळात भारत आणि अमेरिका संबंधात मोठे बदल होणार आहेत, त्या बदलांना योग्य तो आकार देण्याची कामगिरी निरुपमा राव आता पार पाडतील.
शिवाय संगित, साहित्य यांच्या सहवासाबरोबरच बर्र्याच कालावधीनंतर आता त्यांना आपल्या परिवाराबरोबर रहायला मिळेल. याच दरम्यान त्यांचा दुसरा काव्यसंग्रहदेखील प्रकाशित व्हावा, अशी अपेक्षा करू या!
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पुरवणीत प्रकाशित झालेल्या याच लेखाचे हे कात्रण. दिनांक ३ जुलै २०११)