Sunday 8 April 2012

सॅम पित्रोडा

फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही. सॅम पित्रोडा म्हटलं तर मात्र ब-याचजणांना आठवण येइल त्यांच्या वैषिष्ट्यपुर्ण केशरचनेमुळे डॉक़्टर ए पी जे अब्दुल कलामांची आठवण करून देणा-या एका भन्नाट व्यक्तीमत्त्वाची. भारतातील संचारक्रांतीचे प्रणेते, दूरसंचार क्षेत्रातील अनेक नव्या आविष्कारांचे जन्मदाते, नव्या कल्पनांचे जनक, आणि सध्या पंतप्रधानांचे तंतज्ञानविषयक सल्लागार असलेल्या सॅम पित्रोडांचं नाव नुकतंच पुन्हा एकदा चर्चेत आलं ते येत्या जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या निमित्ताने.
चर्चा आहे की पित्रोडांचं नाव कॉंग्रेसतर्फे पुढं केलं जाण्याची दाट शक्यता आहे. जर तसं झालं, तर या नावाला क़ुणाचाच विरोध असण्याचं काहीच कारण असणार नाही. भारताला डॉक्टर कलामांनंतर  आणखी एक परिणामकारक आणि प्रभावी राष्ट्रपती प्राप्त होईल यात शंकाच नाही. शिवाय पित्रोडांचा स्पष्टवक्ता तसेच मार्मिक स्वभाव, विविध विषयांवरील त्यांचा प्रगल्भ व्यासंग आणि मुख्य म्हणजे संवाद साधण्याची अचंबीत करणारी क्षमता या सगळ्या गोष्टी त्यांना एक 'डायनॅमिक' प्रेसीडेंट बनवायला मदतच करतील. जन्म गुजराती कुटुंबातला असल्यामुळे मातृभाषा गुजराती; कुटुंब ओरिसातल्या तितलागढ येथे स्थायिक झालेले असल्यामुळे ओरीया आणि बंगाली; आधी शिकागो आणि मग दिल्ली ही कर्मभुमी असल्यामुळे ईंग्रजी आणि हिंदी; शिवाय आयुष्याच्या अनुभवाने आलेल्या जर्मन आणि रशियन सह  अन्य अनेक भाषांमध्ये पित्रोडा बिनधास्त संवाद साधू शकतात. मुळात संवाद साधणे हाच या माणसाचा मुळ पिंड आहे. म्हणुनच आपल्या कल्पना आणि संकल्पशक्तीच्या जोरावर अवघ्या भारत देशाला संवाद साधणं सोपं करून देण्यात ते यशस्वी झालेत.
पित्रोडांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे सुतारकाम. त्यांच्या वडिलांना या कामानिमित्त गुजरात सोडून ओरिसात स्थायिक व्हावं लागलं होतं. तेथेच १९४२ साली सत्यनारायणचा जन्म झाला. शिक्षणासाठी मात्र वडिलांनी मोठ्या भावासह त्यांना गुजरातमध्ये पाठवलं. याचं कारण म्हणजे गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. गुजरात ही गांधीजींची जन्मभुमी असल्यामुळे मुलांना गांधी विचारांचं बाळकडू शिक्षणाबरोबरच मिळेल या उद्देशाने वडिलांनी त्यांची रवानगी वडोद-याला केली.
ईथल्या सयाजीराव विद्यापिठातुन भौतिकशास्त्रात पदवी घेऊन सत्यनारायणने थेट शिकागो गाठलं. सांगायचं कारण होतं उच्च शिक्षणासाठी! मात्र मुळात २२ वर्षाच्या या तरूणाला ओढ लागली होती ती अमेरिकेच्या चांद्रमोहिमेची. अमेरिका मानवाला चंद्रावर पाठवणार या कल्पनेनंच तो भारावून गेला होता. या मोहिमेत आपणही काहीतरी करून सहभागी व्हावं याच उद्देशाने त्याने शिकागोच्या ईलिय़ॉनिस ईन्स्टीट्युटमधून ईलेक्ट्रॉनिक ईंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. अमेरिकेचं नागरिकत्त्वही मिळालं. सत्यनारायण पांचाल चा सॅम पित्रोडा झाला.
शेवटी चंद्रावर मात्र निल आर्मस्ट्रॉंग गेला.  सॅमने घेतलेलं शिक्षण डिजिटल टेलिकॉम स्विचिंगचं मशिन बनवण्याच्या कामी आलं. काही दिवस वेगवेगळ्या ईलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी काम करता करताच १९७०च्या सुरूवातीला काही मित्रांसमवेत त्यांनी स्वतःची वेसकॉम नावाची कंपनी स्थापन केली. एकामागोमाग एक अशी पन्नासहून अधीक टेलीकॉम उपकरणे त्यांनी तयार केली. त्या सर्वांचं पेटंटही घेतलं. दहा वर्षांनंतर ही कंपनी रॉकवेल ईंटरनॅशनल्स मध्ये विलीन करतांच सॅम पित्रोडा करोडपती झाले. त्यानंतर सहज म्हणुन भारत भेटीवर आले असता तो प्रसंग घडला, ज्याने पित्रोडांचं जीवन आणि आपलं संचारविश्व बदलवून टाकलं.
ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पित्रोडा थांबले होते, तीथून त्यांच्या पत्नीला काही केल्या फोन लागेच ना. शेवटी त्यांना घरी जाऊनच बायकोला भेटावं लागलं. तेव्हाच त्यांनी निश्चय केला, की  आता बास झालं पैशाच्या मागे धावणं. आता मातृभुमीसाठी काम करण्याची वेळ आली. भारतातली संचारसेवा अद्ययावत करण्याची एक प्रभावी योजना त्यांनी तयार केली, आणि ती  ऐकवण्यासाठी सरळ पंतप्रधानांचीच म्हणजे ईंदिरा गांधींची भेट मागीतली. त्यांची भेट १० मिनिटांच्या वर मिळे ना, आणि पित्रोडांना हवा होता एक तास! मग मंत्रालयाच्या वा-यांवर वा-या सुरू झाल्या. अनेकदा वाट पाहून परत जावं लागलं, तर अनेकदा ईंदिराजींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ठरलेली मिटिंग रद्द झाली. दरम्यानच्या काळात नुकतेच राजकारणात आलेले, देशोदेशी फिरलेले आणि तंत्रज्ञान ब-यापैकी कळणारे राजीव गांधी पित्रोडांच्या संपर्कात आले, आणि दोघांची मैत्री झाली. राजीवजींच्या मध्यस्तीने त्यांनी ईंदिराजींची भेट मिळवली आणि आपलं पहिलंवहिलं प्रेझेंटेशन केलं. यानंतर ईंदिराजींनी त्यांना आपल्या नवरत्नांमध्ये स्थान दिलं, ते नेहमी करीताच. "मॅडम, तिकडे शिकागोला माझ्याकडे लोकांना भेटायला वेळ नाही. सहा सहा महिने लागतात माझी अपॉईन्टमेन्ट मिळवायला. आणि ईकडी मी तुमची वेळ घेण्यासाठी सहा महिन्यांपासुन अक्षरश: फे-या मारल्यात," अशी शालजोडीतून सुरवात करून सुरू केलेलं पित्रोडांच पहिलंच प्रेझेंटेशन गांधीं मातापुत्रांचं मन जींकून गेलं. यानंतर घडला तो ईतीहास.
राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या 'पीसीओ ' क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले.
आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ' पब्लिक टेलिफोन बूथ ' च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत. राजीव गांधींच्या घातपाती मृत्यूनंतर , जवळची सर्व बचत संपत आल्यानंतर पित्रोडा १९९३ साली अर्थार्जनासाठी अमेरिकेला परतले व तेथे स्थायिक झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने मागास देशांत टेलिकॉम सेवेचा प्रसार करण्यासाठी स्थापलेल्या ' वर्ल्डटेल ' या संस्थेचे ते अध्यक्ष झाले.  या संस्थेच्या अनेक उत्पादनां ची पेटंट्स त्यांचीच आहेत. शिकागोत स्वत:च्या मालकीच्या काही छोट्या तंत्रज्ञान कंपन्या पित्रोडा आपल्या कुटुंबाच्या (पत्नी व दोन मुलांच्या) चरितार्थासाठी चालवित होते. भारतातील घडामोडींवरही त्यांची नजर होतीच. शिवाय त्यांच्यावर नजर होती भारतातील नेतेमंडळींची. म्हणुनच डॉक्टर मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यावर पित्रोडांना परत एकदा भारतात येण्याचं निमंत्रण मिळालं. विज्ञान महामंडळाचे ते अध्यक्ष झाले. पंतप्रधानांचे तत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार बनले. आता वेळ होती मोबाईल आणि ब्रॉडबॅण्ड क्रांतीची!
ही क्रांती आपण अनुभवतो आहोतच. अगदी वानगीदाखल सांगायचं झालंच तर आज लक्षावधी लोक मोबाईलवरून आर्थीक व्यवहार (फंड ट्रान्सफर, ऑनलाईन बॅन्कींग, बिल पेमेन्ट ई.) करण्यासाठी वापरतात ते 'वन वॉलेट' तंत्रज्ञान पित्रोडांचंच पेटंट आहे.
'पॉलीसी मेकींग़' अर्थात योजना बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. म्हणुनच भारत सरकारच्या रेल्वे नविनिकरणापासुन ते ऑनलाईन लायब्ररीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्या त्यांचा एक पाय भारतात, एक अमेरिकेत असतो. शिवाय लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतही शिक्षणविषयक योजनांकडे ते लक्ष देतात. भारतातही शाळांचे संगणकीकरण, ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्डने जोडणे, भारतीय पारंपारीक वैद्यकशास्त्राचे पुनरुज्जीवन ईत्यादी सामाजीक महत्त्वाचा तांत्रीक कामामध्ये हल्ली त्यांनी लक्ष घातले आहे. तंत्रज्ञानातून सर्वांगीण प्रगतीचा हेतू साध्य करणारे पद्मभुषण सॅम पित्रोडा पुढे येऊ पाहणा-या मोठ्या जबाबदारीलाही याच आत्मविश्वास आणि स्मीतहास्यासह सामोरे जातील, यात शंका नाही.             

No comments:

Post a Comment