Sunday 11 March 2012

उषा उत्थुप

मनं जिंकण्याची कला काही लोकांना थेट देवाकडूनच मिळालेली असते. जेथे जातील तेथे त्यांचे चाहते तयार होतात आणि जे काही करतील त्याचं उत्साहाने स्वागतच होतं. "रोको ना, रोको ना, मुझको प्यार करने दो!" असं म्हणत ज्येष्ट गायिका उषा उत्थुप यांनी यंदाचं सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचं फिल्मफेअर अवार्ड स्विकारलं आणि ईंडिपॉपच्या अध्वर्यु; भारतीय संस्कृतीच्या वैश्वीक राजदूत असलेल्या उषाजींच्या अगणीत चाहत्यांनी जगभर याचा आनंद साजरा केला. खरं म्हणजे १९७८ साली जेव्हा 'वन टू चा चा चा' या गाण्यासाठी त्यांचं नामांकन झालं होतं तेव्हाच हे फिल्मफेअर उषाजींना मिळायचं होतं. त्यानंतरही 'हरी ओम हरी' आणि 'रंबा हो!' या गाण्यांसाठी त्यांचं नामांकन झालं होतं, पण फिल्मफेअरने हुलकावणी दिली ती तब्बल चाळीस वर्षे. अर्थात पंचवीस भाषा, पन्नास वर्ष, शेकडो गाणी, हजारो कार्यक्रम, लाखोंमध्ये अल्बम्सची विक्री, कोट्यावधी चाहते आणि अब्जावधी शुभेच्छांनी खच्चुन भरलेल्या त्यांच्या वाटचालीला अवॉर्डची गरजच ती काय म्हणा?
मात्र आनंद, मग तो कितीही छोटासा का असेना, पुरेपूर अनुभवायचा, साजरा करायचा आणि सगळ्यांना वाटायचा हे सुत्र कायम जपलेल्या उषाजींनी फिल्मफेअरचा आनंदही आपल्या 'ईश्टाईल' मध्ये सगळ्यांबरोबर साजरा केला. सगळ्यांना, अगदी सगळ्यांनाच आपल्याबरोबर गायला, थिरकायला लावणं ही त्यांची खासियतच  आहे. ते सहाजीकही आहे. कारण चेन्नईचं मुळ, मुंबईचा जन्म, दिल्लीला करिअरची सुरूवात आणि कलकत्त्याला (आता कोलकाता) लग्न -- असं भारताच्या चारही महानगरांशी त्यांचं अतुट नातं आहे.  हल्ली त्यांच्या मुंबई-कोलकाता वा-या सुरू असतात. कोलकात्यात लोकांना दोनच दिदी ठाऊक आहेत. एक म्हणजे ममता बॅनर्जी आणि दूस-या उषा उत्थुप. त्यांच्या ठसठशीत डिझाईनर बिंदी, भरपूर दागीने, आणि थोडा भडक मेक-अप यांमुळे बंगाली लोकांना त्या बंगालच्या संस्कृतीचं प्रतिक वाटतात, तर कांजीवरम साडी, केसात माळलेले भरमसाठ गजरे यामुळे मद्रासी लोकांना त्यांच्या ऍंबेसेडर वाटतात. मुंबईत येऊन जेव्हा छानसं मराठी बोलतात तेव्हा त्या बॉर्न मुंबईकर वाटतात आणि दिल्लीत गेल्यावर जेव्हा ओबेरॉय इंटरकाँटिनेंटल हॉटेलात गात असतानांच्या आपल्या उमेदवारीच्या दिवसांच्या आठवणी सांगतात तेव्हा दिल्लीकरांना त्यां  आपल्या वाटतात. उषाजी मात्र अवघ्या भारताच्या आहेत, असं त्या नेहमी सांगतात. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्यांच्या कपाळावरची बिंदी राष्ट्रध्वजातील तीन रंग धारण करते, त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमांचा शेवट 'वंदे मातरम' ने होतो आणि चॅरिटीसाठी घेण्यात येणा-या गाण्याच्या कार्यक्रमांना त्या आवर्जुन  उपस्थीत असतात. अर्थात आयोजकही त्यांना निमंत्रण देतातच, कारण भारतात सध्या असलेल्या काही आघाडीच्या 'क्राउड पुलर्स' मध्ये त्यांचं नाव अग्रणी आहे.
गर्दी खेचण्याची ही क्षमता त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वामुळे, गाणं म्हणण्याच्या आणि सादरिकरणाच्या त्यांच्या वैषिष्ट्यपुर्ण शैलीमुळे, त्यांच्या सुपरडुपरहिट गाण्यांमुळे तर  आलेली आहेच, शिवाय  उषाजींबद्दल भारतीय प्रेक्षकांच्या मनात असलेला आदर आणि सन्मानाची भावना ही त्यांना लाभलेली खुप आगळी देणगी आहे. हा आदर मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आधी उषा सामी अईयर आणि नंतर उषा जानी चाको उत्थुप यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे, हे विसरून चालायचं नाही.
त्यांचा जन्म मुंबईचा आणि वडिल पोलीस अधिकारी. बालपण गेलं ते भायखळ्यातल्या पोलीस क्वार्टरमध्ये. पारंपारिक तामिळ ब्राम्हण घरात शास्त्रीय संगीत शिकण्याची पद्धतच असते. मात्र मुळात उषाचा आवाजच वेगळ्या पठडितला. त्यामुळे संगीत शिकताच येणार नाही, असं शिक्षकांनीच घोषित करून टाकलं होतं. उषाच्या मोठ्या बहिणी आणि भाऊ मात्र संगीताचा रियाझ करायचे. त्यांचं पाहून थोडंफार संगीत शिकता आलं, तेवढंच काय ते शास्त्रीय प्रशिक्षण.  रॉक, पॉप, जॅझ या पद्धतीची गाणि सिलोन रेडिओवर ऐकत असतांना आपल्या आवाजाला साजेसं संगीत हेच असावं, अशी अनुभुती झाली. शिकवणारं तर कुणी नव्हतंच. मग स्वतःच ऐकून ऐकून शिकणं सुरू झालं. शास्त्रीय संगीत शिकणा-या उषाच्या मोठ्या बहिणी कधीमधी रेडिओवर गात असत. त्यांच्याबरोबरच रेडिओस्टेशन वर आलेल्या नऊ वर्षाच्या उषाचा आवाज अमिन सयांनींनी ऐकला आणि तीला एक गाणं गाण्याची संधी दिली. 'मॉकींगबर्ड हिल' हे रेडिओवर गाजणारं गाणं सादर झालं. आणि त्यानंतर बरेचदा रेडिओवर पॉप संगीत म्हणण्याची संधी मिळाली. रंगमंचावर गाणं सादर करण्यासाठी मात्र आपल्या मुळगावी, चेन्नईला जावं लागलं. तेव्हा उषाचं वय असेल उणंपुरं विस वर्षे.
चेन्नईमध्ये च्या माऊंट रोडवरच्या नाईन जेम्स नाईटक्लबमध्ये सहज म्हणुन नातेवाईकांबरोबर गेलेल्या उषाने त्यांच्या आग्रहास्तव क्लबच्या बॅंण्डबरोबर गाणं सादर केलं. मॅनॅजरला ते ईतकं आवडलं, की तीने आठवडाभर क्लबमध्ये रोज गाणं म्हणावं अशी गळ त्याने घातली. सात दिवसांच्या गाण्याचं मानधन म्हणुन कांजीवरमची साडी मिळाली. तेव्हापासुनच मग हीच साडी उषाजींचा ट्रेडमार्क बनली.
मुळात पॉप, जॅझ या पाश्चात्य गाण्याला, त्यातही नाईटक्लबमध्ये गाणी म्हणण्याला त्या काळी अजीबातच प्रतिष्ठा नव्हती. उषाजींच्या 'सादगी' मुळे या क्षेत्राता भारतात मानाचं स्थान मिळवता आलं. साडी, गजरा, दागीने ही त्यांची वेषभुषा त्यांचं भारतीयत्त्व जपत गेली, आणि पाश्चात्य संगीत सादर करणारी ही तरूणी देखील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणा-या कोणत्याही घराण्याच्या गायिकेपेक्षा वेगळी नाही, हे लोकांना लक्षात येऊ लागलं. कलकत्त्याच्या त्रींकास नाईट क्लब मध्ये गात असतांनाच त्यांची गाठ जानी चाको उत्थुप यांच्याशी पडली. मुळच्या केरळमधील कोट्टायमच्या असलेल्या या युवकाशी विवाह करूनच त्या उषा उत्थुप झाल्या. कलकत्ता, मुंबई, दिल्लीत नाईट क्लब्समध्ये गाण्याचे कार्यक्रम होतच होते. दरम्यान काही अल्बम्सही रिलिज झाले. नाव मात्र व्हायचं राहिलं.
१९७० च्या सुमारास दिल्लीतल्या ओबेरॉय इंटरकाँटिनेंटल हॉटेलात गात असताना त्याच हॉटेलात देवआनंद आणि त्यांच्या नवकेतनमधील काही सहका-यांचा मुक्काम होता. त्यात संगीतकार राहुलदेव बर्मनही होते. हरे राम हरे कृष्णमध्ये हिप्पींच्या दम मारो दमगाण्याची जुळवाजुळव सुरू होती. नेहमीपेक्षा वेगळ्या आणि हिप्पी संस्कृतीशी जुळेल अशा आवाजाच्या शोधात आरडी होते. उषाचा आवाज त्यांच्या मनाला एकदम भिडला आणि मग ही मंडळी उषाला भेटली. हरे राम हरे कृष्णमधल्या आवाजाने चांगलीच धूम मचवली आणि उषाचं नाव देशभर झालं. सत्तर आणि ऐशींच्या दशकात आरडी आणि बप्पी लेहरी सारख्या संगीतकारांकडे उषाजींनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली. खुप गायला मिळालं नाही, पण जेवढं मिळालं ते खुप गाजलं. म्हणुन मग स्टेज शो करण्यावर भर दिला.
स्टेज शो च्या निमित्ताने  भारतभर फिरायला मिळालं. अनेक स्थानिक भाषा यामुळे आत्मसात करता आल्या. तामिळ, तुळू, तेलुगु, मराठी, कोकणी, बंगाली, पंजाबी, कन्नड, मल्याळम, गुजराती, ओरीया, आसामींसह सतरा भारतीय भाषा आणि ईंग्लीश, डच, फ्रेंच, जर्मन, ईटालियन, सिंहली, स्वाहिली, रशीयन, स्पॅनिश, नेपाळी, झुलुसह अनेक विदेशी भाषांमधून त्यांनी गाणी गायली. यापैकी अनेक भाषा त्यांना बोलताही येतात.
उषाजींना अभिनयाचंही अंग आहे. बॉम्बे टू गोवामध्ये एका गाण्यात त्यांनी दर्शन दिलं होतं. नंतर काही दाक्षिणात्य चित्रपटांतूनही छोटी छोटी कामं केली. मल्याळी चित्रपटही केले. सात खून माँफमध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाजने मोठी भूमिका देऊन त्यांच्या अभिनयक्षमतेचा चांगला वापर करून घेतला.
पुर्वापारापासुन चालत आलेल्या साम्राज्यावर आपल्या कर्तृत्त्वाने अधिकार प्राप्त करणं हे नक्कीच मोठं यश आहे. मात्र आपलं स्वतःच ईंद्रप्रस्थ तयार करून त्याला पुर्वापारच्या साम्राज्याच्या तोडीस नेऊन ठेवण्याचा पराक्रम प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा असणारे वीरच करू शकतात. इंडिपॉपच्या साम्राज्याची मुहुर्तमेढ भारतात रोवून त्याचं ईंद्रप्रस्थ करणा-या उषाजींवर असलेली ईश्वरी क़ृपा आणि देवाने त्यांना दिलेलं मनं जिंकण्याचं वरदान येती अनेक वर्ष आपलं संगीतभावविश्व समृद्ध करत राहिल, हे नक्की.

No comments:

Post a Comment