Tuesday 20 March 2012

कमला प्रसाद बिसेस्सर

जानेवारी महिन्यात जयपूरला झालेल्या प्रवासी भारतीय महोत्सवाच्या समारोपिय सोहळ्यादरम्यानची ही गोष्ट. सोहळा रंगात आला होता. अध्यक्ष होत्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील आणि मुख्य अतीथी होत्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर. परदेशी पाहूण्या असल्या तरीही कमलाप्रसाद यांनी त्या दिवशी पारंपारिक राजस्थानी वेषभुषा केलेली होती. रेशमी साडी, आणि सोन्याचे राजेशाही दागीने! राष्ट्रपती प्रतिभाताईंनी त्यांचं स्वागत आणि सत्कार केला, आणि पुढच्याच क्षणी, अगदी सहजपणे कमलाप्रसाद यांनी प्रतीभाताईंना वाकून नमस्कार केला. अगदी पायाला हात लावून. अर्थात प्रतीभाताईंनीही लगेच त्यांचे हात धरून त्यांना  आलींगन दिलं आणि त्रिनिदादच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांची जागा पायाशी नसुन मनात असल्याचं दाखवून दिलं.
खरं म्हणजे मूळच्या भारतीय वंशाच्या असल्यामुळे कमलाप्रसाद यांचे वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने ज्येष्ठ अश्या प्रतिभाताईंना नमस्कार करणे हा त्यांच्या संस्कारांचा भाग होता, परंतू या गोष्टीचे पडसाद त्रिनिदादमध्ये बरेच वेगळे उमटले. विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने अश्याप्रकारे चरणस्पर्ष करणे हा त्रिनिदादचा अपमान असल्याची बोंब करून बिसेसर यांच्या विरोधात आगडोंब उसळवला. त्यांच्या विरोधात सभा, रॅली आणि संमेलनं झाली. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. मात्र कमलाप्रसाद यांनी या मुद्यावर कसलीच तडजोड केली नाही. 'हे माझे संस्कार आहेत, आणि यात काहीही गैर नाही,' या आपल्या मतावर त्या शेवटपर्यंत ठाम राहिल्या. विरोधाचं वादळ आता शमलंय. प्रवासी भारतीय महोत्सवादरम्यानच्या या 'चरणस्पर्षाने' जींकून घेतलेली अवघ्या जगभरातील भारतीयांची मनं मात्र कायमची कमलाप्रसाद बिसेस्सर यांच्याकडे राहून गेलेली आहेत. १०१ वा जागतीक महिला दिन आपण नुकताच साजरा केला. अश्यावेळी आपली ओळख अशी मनामनांमध्ये कायमची कोरून ठेवणा-या कमलाप्रसाद बिसेस्सर यांची आठवण येणं मग सहाजीकच नाही का?
अर्थात 'ओळख बनवणे' ही गोष्ट अनेकजण करून दाखवतात, मात्र कमलाप्रसाद यांची सुरूवात झाली ती 'ओळख शोधण्यापासुन. होय. ८४५ ते १९१७ या कालावधीत भारतातून वेस्ट इंडिज बेटांवर आणलेल्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार वेठबिगारांमध्ये त्यांचे पूर्वज होते. भारताच्या कुठल्याश्या खेड्यातून एका समुहाबरोबर ईंग्रजांनी त्रीनिदादला आलेल्या कुण्या एका मिश्रा नावाच्या माणसाची आपण वंशावळ आहोत, एवढीच काय त्यांना स्वतःबद्दल माहिती होती. चार पिढ्या त्रीनिदादमध्येच होवून गेलेल्या. तब्बल १२२ वर्ष झाली होती. आपले पुर्वज नेमके कुठले? भारतातल्या नेमक्या कुठल्या गावचे? ही माहिती त्यांच्याकडे नव्हती. मात्र आपली मुळं माहिती करून घेण्याची ओढ कुणाला बरं नसते? लिलराजप्रसाद नावाच्या एका छोट्याश्या तेलकंपनीच्या मालकाच्या मुलीला, कमलालादेखील ही ओढ लहानपणापासूनच होती.
आधी त्रीनिदादमधल्या आपल्या सिपारिया नावाच्या जन्मगावी, आणि नंतर 'युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडिजमध्ये शिक्षण घेत असतांना, त्याहीनंतर इंग्लंडच्या नॉरवूड टेक्निकल कॉलेज आणि हय़ूज वूडिंग लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास करतांना,  मग जमैकामध्ये किंग्स्टनला सेंट अ‍ॅन्ड्रय़ूज हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणुन काम करतांना, जमैका कॉलेज ऑफ इन्शुरन्समध्ये मानद प्राध्यापक म्हणून शिकवतांना आणि अगदी त्रिनिदादच्या पहिल्या महिला अ‍ॅटर्नी जनरल बनल्यावरही त्यांच्या मनात ही ओढ कायम राहिली. पण मार्ग काही मिळाला नाही. दरम्यान ग्रेगरी बिसेस्सर यांच्याशी विवाह झाला आणि कमला प्रसाद ही कमलाप्रसाद बिसेस्सर झाली. 
अ‍ॅटर्नी जनरल असतांनाच त्यांना सक्रीय राजकारणात येण्याची संधी प्राप्त झाली. सुरूवातीपासुनच धाडसी वृत्तीच्या कमलाप्रसाद यांनी १९९५ मध्ये निवडणुक लढवली आणि सिपारिया या आपल्या जन्मगावातूनच त्या निवडूनही आल्या. त्रिनिदादमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या एकुण लोकसंख्येच्या ४४ टक्के आहे, मात्र अजुनही हवं तसं प्रतिनिधित्त्व भारतीय वंशाच्या लोकांना मिळालं नव्हतं. नाही म्हणायला एकदा वासुदेव पांडे नावाचे भारतीय वंशाचे पंतप्रधान या देशाला मिळाले. मात्र त्यांचा कार्यकाळहे वादग्रस्तच होता. कमलाप्रसाद यांच्या युनायटेड नॅशनल काँग्रेसने जवळपास ४३ वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसुन घालवली होती. पांडे यांच्यानंतरची वजनदार नेता म्हणुन कमलाप्रसाद यांचीच निवड पक्षाने केली, आणि त्यांनी पक्षात नवचैतन्य निर्माण केलं.  काँग्रेस ऑफ द पीपल, ‘नॅशनल जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी, ‘टोबॅगो ऑर्गनायझेशन ऑफ द पीपल आणि मूव्हमेंट ऑफ द सोशल चेंज या पक्षांबरोबर आघाडी उभी करत २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत झंझावाती प्रचार करून त्यांनी तेव्हाचे पंतप्रधान पॅट्रिक मॅनिंग यांच्या पीपल्स नॅशनल मूव्हमेंटया पक्षाला पराभूत केलं. आघाडीने कॅरेबियन नॅशनल पार्लमेंटमधील ४१ जागांपैकी २९ जागांवर विजय मिळविला. कारण बिसेसर यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्याही एकाच जमातीचे देशावर वर्चस्व प्रस्थापित होणार नाही याची काळजी घेईल अशी आशा जनतेला आहे.  त्रिनिदादच्या ईतीहासातील त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
पंतप्रधान झाल्यावरही त्यांच्या पुर्वजांप्रती असलेली ओढ मनात कायम होती. वासुदेव पांडे पंतप्रधान असतांना त्यांनी आपल्या भारतीय पुर्वजांचा शोध लावण्यासाठी शम्सुद्दीन नावाचे एक तज्ञ शोधकर्ते बोलावले होते. बिसेस्सर यांनीही त्यांनाच पाचारण केलं. प्रसाद आणि बिसेस्सर यांच्या घरी असलेली काही कागदपत्रे, सिपारिया गावी असलेल्या सरकारी नोंदींतून मिळालेले काही पुरावे आणि ईतर बरंच साहित्य जमवून शम्सुद्दीन यांचा शोध सुरू झाला.
पण हे काम मोठं जिकरिचं होतं. पुरावा म्हणुन शम्सुद्दीन यांच्याजवळ व्होल्गा नावाच्या प्रवासी जहाजाचं एक तिकिट आणि नाही म्हणायला ऑक्टोबर २१, १८८९ ही एक तारिख होती. यावरून या जहाजावरून आलेल्या ५५५ वेठबिगारांपैकीच कुणीतरी पंतप्रधानांचा पुर्वज असला पाहिजे हे कळलं. त्यांचं आडणाव मिश्रा होतं, ही ओळख वापरून जहावरच्या सर्व प्रवाशांची यादी मिळवली असता, जवळपास पन्नास मिश्रा नावाचे लोक जहाजावर सापडले. व्होल्गा हे जहाज कलकत्यावरून निघालं असल्याचं कळल्यावर तीकडे चौकशी झाली. बिहारच्या बक्सरमधल्या लोकांना रिपब्लीकन बेटावर घेऊन जाण्याची जबाबदारी या जहाजावर होती असं कळल्यावर बस्तरमध्ये शोध सुरू झाला. कलकत्ता, बस्तर, त्रिनिदाद, अशी आणखी काही कागदपत्रं मिळत गेली, आणि बिहारमधल्या भेलपूर गावातले रामलखन मिश्रा हेच पंतप्रधानांचे पणजोबा ही ओळख पटली.
मिश्रा १८८९ मध्ये त्रिनिदादला आले आणि त्रिनिदादमध्ये ईथल्याच मुलनिवासी मुलीशी विवाहबद्ध झाले. त्यांना चिरोंजीप्रसाद नावाचा मुलगा झाला. त्यांनी मुळच्या भारतीय वंशाच्या सुमित्रादेवींशी विवाह केला आणि कमलाप्रसाद यांच्या वडिलांचा, लिलराजप्रसाद यांचा जन्म झाला. पिढी दरपिढी परिस्थीती सुधारत गेली आणि लिलराज यांनी स्वतःची तेल कंपनी काढली. कमला या आपल्या मुलीलाही त्यांनी सुरूवातीपासूनच उत्तम शिक्षण दिलं. अगदी विदेशातही पाठवलं. ही वंशावळ माहिती झाल्यावर कमला प्रसाद बिसेस्सर भारत दौ-याची वाट पाहू लागल्या.
प्रवासी भारतीय महोत्सवादरम्यान त्यांना ही संधी मिळाली. बक्सरमधल्या भेलपुर गावातल्या लोकांनी त्यांचं स्वागत अगदी माहेरवाशीण मुलीसारखं केलं. त्यांना साडी, दागिने अहेर म्हणुन देण्यात आले, आणि सुवासिनिंनी त्यांची ओटीही भरली. या भेटीदरम्यान त्यांना आपल्या आसवांना आवर घालणं मोठं कठीण होउन बसलं होतं. आज आपण जी काही हिम्मत मिळवली आहे, ती सगळी याच मातीतुन आलेली असल्याचं त्यांनी साश्रृ नयनांनी मान्य केलं. त्यांच्या पणजोबांच्या ईतर नातेवाईकांचे वंशजही भेलपुरमध्ये त्यांना भेटले. एकुणच काय तर हा सोहळा त्यांच्या मनात कायम घर करून केला. हा आनंद मिळवून देणा-या भारताच्या भुमीच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या प्रतिभाताईंच्या पायाला हात लावून नमस्कार करावासा वाटणं हे मग खुपच सहाजीक होउन बसतं. नाही का?

No comments:

Post a Comment